कोणत्या तरी घटनेला निमित्त किंवा कारणे शोधणे हा माणसाचा स्वभाव असतो. मग कामावर जायला दांडी मारायची असली तरी किंवा शाळा बुडवायची हुक्की आलेली शाळकरी पोरही निमित्त शोधत असते. अपयशाचे खापर फोडण्यासाठी काहीतरी कारण माणसाला लागते त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षात आता होवू लागले आहे. शिमगा संपला तरी कवित्व शिल्लक राहतेच. या म्हणीचा अनुभव सध्या भाजप घेत आहे. बिहारमध्य निवडणुकीत वाटेल तशा वल्गना केल्या. बेफाट भाषणे ठोकली आणि पैशांचा चक्काचूर झाला तरी भाजपला बिहारमध्ये यश मिळवता आले नाही. त्या दारूण पराभवाचे अपरिहार्य परिणाम आठवडाभरात गर्जू लागले आहेत. अत्यंत शिस्तबद्ध म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेणारा भाजप सध्या अंतर्गत लाथाळ्यांच्या चक्रव्यूहात सापडला आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे भाजपचा कॉंग्रेस झाला आहे. कॉंग्रेस हा जसा गटातटांचा पक्ष आहे तसाच भाजप हा गटातटांचा पक्ष झालेला आहे. म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात कॉंग्रेस ही नेहरूवादी आणि पटेलवादी या गटातून सुरू झाली ती नंतर समाजवादी, सिंडीकेट, इंडिकेट, आय कॉंग्रेस, एस कॉंग्रेस, चड्डी कॉंग्रेस, त्यानंतर समाजवादी, राष्ट्रवादी, तृणमूल असे किती तुकडे पडले हे आता कॉंग्रेसलाही सांगता येणार नाही. त्यातूनच जनता दलाची निर्मिती झाल्यानंतर पुन्हा त्या जनता दलाचे खंडीभर तुकडे पडले. आज त्याच रस्त्यावरून भाजपची पावले पडताना दिसत आहेत. बिहार निवडणुकीनंत भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. पण ‘बिहार पराभवाला कुणीच जबाबदार नाही’ असा निष्कर्ष कार्यकारिणीने काढला. कोणत्याही घटनेला, यशा अपयशाला कोणीच जबाबदारी कसे असू शकत नाही. काही तरी कारण हे असतेच की. पण कोणत्याही कारणाशिवाय हा पराभव झाल्याचे भाजपचे मत पडले. याचा अर्थ सिंहाच्या तोंडाला येणार्या दुगर्र्ंधीबाबत सांगण्याचे धाडस कोणाचे झाले नसावे. बैलाप्रमाणे खरे बोलले तर इसापनितीतील कथेप्रमाणे आपला बळी जाईल या भितीने सगळ्या लबाड कोल्ह्यांना सर्दी झाली आणि असा निष्कर्ष काढला गेला. भारतीय जनता पक्षातील अनेक ज्येष्ठांना ही पळवाट पटली नाही. मोदीनाममहिमा नामोहरम झाला असे तर त्यांना वाटले. पण बोलणार कोण? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? दिल्ली पाठोपाठ बिहार पराभवाची जबाबदारी पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडेच जाते असे ज्येष्ठांच्या निवेदनातून स्पष्ट सूचित केले गेले आहे. माजी पक्षाध्यक्ष नितीन गडकरीसुद्धा त्या निवेदनाने अस्वस्थ झाले असावेत. उतावळेपणाने निवेदन देणार्या ज्येष्ठांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली. हे भाजपमध्ये काय घडते आहे? हाच का तो सिद्धांतावर चालणारा पक्ष? हाच का तो पक्ष की ज्याला अटलबिहारी बाजपेयी यांचा चेहरा होता. अर्थात नंतर त्या उतावळेपणातील चूक गडकरींच्य लक्षात आली असावी. सारवासारवीचा प्रयत्न गडकरींनी केला. पण अंतर्गत खदखद यातून स्पष्ट झाली. आता पक्षातील खदखद तेवढ्यावर थांबायला तयार नाही. पक्षाध्यक्ष अमित शहा भलतेच बेचैन असावेत. त्यानंतर ज्येष्ठांचा ‘आवाज’ बंद करणारा ‘रामबाण’ त्यांनी परवा सोडला. तो म्हणजे ‘साठी पार केलेल्या ज्येष्ठ नेत्यांनी राजकारण सोडून समाजकारण करावे’ असा रोखठोक सल्ला त्यांनी दिला. ज्यांच्या कृपेने आपली पक्षाध्यक्षपदी वर्णी लागली ते पंतप्रधानच या बाणाचे पहिले लक्ष्य ठरू शकतात हे अमित शहांच्या लक्षात आले नसेल का? की पंतप्रधान आणि त्यांच्या दरम्यानही एकवाक्यता राहिली नसेल? अमित शहांनी साठी पार केलेल्या मोदींनाच हद्दपार करण्याचा विचार केला असेल तर तो प्रकार म्हणजे शंकराने वरदान दिलेल्या भस्मासूरासारखा प्रकार म्हणावा लागेल. काय असेल ते असो; पण साठी ओलांडलेल्या किमान डझनभर अनुभवी नेत्यांना एकसोबत राजकारणातून बाहेर हुसकण्याचा अमित शहांचा इरादा त्या विचाराने आता उघड केला. पक्ष कार्यकारिणी आणि खुद्द पंतप्रधान अमित शहांच्या मौलिक सल्ल्याची कशी, किती व कोणती दखल घेतात याकडे देशाचे लक्ष लागल्यास आश्चर्य नाही. सध्या भाजपचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी तसेच मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, शांता कुमार, गोविंदाचार्य आदी नेत्यांशिवाय केंद्रीय मंत्री राजनाथ, अरुण जेटली, मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू आदी नेत्यांवर शरसंधान करणार्या अमितज शहांच्या धाडसाचे कौतुकच करावे लागेल. भाजपमध्ये साठी बुद्धी नाठी झालेले नेते जमा झाले आहेत म्हणून त्याना निवृत्त करण्याचा विचार त्यांच्या मनात येतो आहे काय असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. साठी पार झालेल्या सर्वांना एकाचवेळी पक्षातून गचांडी देण्याचा शहांचा डाव कुणाच्या गुप्त वा सुप्त पाठिंब्यावर आधारलेला असावा हा प्रश्न आहे. याचवेळी ज्येष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनी पुढील पक्षरचनासुद्धा जाहीर केली आहे. गडकरींना उपपंतप्रधानपद, राजनाथांना पक्षाध्यक्षपद तर अमित शहांना गुजरातचे मुख्यमंत्रिपद बहाल करण्याची मागणी त्यांनी पुढे रेटली आहे. ही असली अंतर्गत गटबाजी भाजपमध्ये सुरू झाली तर पुन्हा पाच वर्षांनी सत्ता हस्तगत करणे कठीण होईल. असा एखादा जरी मउ दुवा हाताला लागला तरी त्याचा फायदा कॉंग्रेस आणि शरद पवारांसारखे मातब्बर उठवल्याशिवाय राहणार नाहीत.
मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५
सगळ्या कोल्ह्यांना एकदम सर्दी कशी झाली?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा