- शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे. हा वाढदिवस साधेपणाने साजरा करावा. कोणताही डामडौल करू नये, बॅनर लावू नयेत आणि पुष्पगुच्छ, बुके देवू नयेत असे आवाहन बाळाराम पाटील यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना केले आहे. हा होणारा खर्च दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी देण्यात यावा अशी सूचना स्वत: बाळाराम पाटील यांनी केलेली आहे.
- अशी भूमिका फक्त शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता, शेकापचा नेताच घेवू शकतो. कारण त्यांच्या अंगात शेकापचे रक्त सळसळते आहे. शेतकरी कामगार पक्ष हा शेतकर्यांसाठी झटणारा, शेतकर्यांचा पक्ष आहे. कष्टकर्यांचा पक्ष आहे. त्यामुळे शेतकर्यांचे दु:ख फक्त शेकापक्षालाच दिसू शकते. बाकीच्या पक्षांचे शेतकर्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा राजकारणाचा एक भाग असतो. पण शेकापक्षाचा दृष्टीकोन हा समाजकारणाचा, समाजसेवेचा, शेतकर्यांच्या प्रति असलेल्या आत्मियतेचा असतो. हे बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला समजल्याशिवाय राहणार नाही.
- आज उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या 50 कुटुंबांना बाळाराम पाटील यांनी, शेतकरी कामगार पक्षाने दत्तक घेतले आहे. अशा कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा, संगोपनाचा खर्च हा शेकापक्ष करणार आहे. कारण शेतकर्यांची कणव फक्त शेकापक्षालाच येवू शकते. संपूर्ण महाराष्ट्रात सरकारने मदत करावी म्हणून प्रत्येकजण सरकावर अवलंबून असताना सर्वात पहिली मदत पोहोचणार आहे ती शेतकरी कामगार पक्षाची. शेतकर्यांसाठी झटणारा पक्ष हीच तर खरी शेकापक्षाची ओळख आहे. या संस्कारात वाढल्यामुळेच बाळाराम पाटील यांनी असे आवाहन केले आणि शेतकर्यांना मदत पोहोचवण्याचा, त्यांना दत्तक़ घेण्याचा निर्णय घेतला.
- आज मराठवाड्यातील, विदर्भातील शेतकर्यांना आत्महत्या करावी लागते. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, नापिकी, कर्जबाजारीपणा अशा दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकर्यांना आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय नाही. कारण तेथील तग धरून राहिलेले पक्ष, नेते हे संवेदनशील नाहीत. मुर्दाड आहेत. आज आमच्या रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांना कितीही अडचणी आल्या तरी त्यांना आत्महत्या करायची वेळ येत नाही, कारण इथे शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. रायगडचा शेतकरी संकटांशी सामना करतो. इथल्या मातीत हा विचार रूजवला, ही संघर्षाची ताकद रूजवली ती शेतकरी कामगार पक्षाने. त्यामुळे संकटांशी मुकाबला करून यशस्वी होण्याची माती शेकापने निर्माण केली. तसेच बळ संपूर्ण महाराष्ट्राला मिळाले पाहिजे. यासाठी शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाची मदत मराठवाड्यात पोहोचवण्याचे आवाहन केले.
- आज देशाला अशा विचारांची गरज आहे. बाळाराम पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सातत्याने विकासाचे राजकारण केले. हा विकास ग्रामीण विकासाचा ध्यास होता. ग्रामीण भागातून शहराकडे लोंढे थोपवण्याचा विकास करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. आज अशा विचारांची माणसे ही महाराष्ट्राची गरज आहे. शेतकरी कामगार पक्षाचा विचार संपूर्ण महाराष्ट्रात रूजवला तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. शेतकरी कामगार पक्ष सत्तेपासून दूर असला तरी शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तोच एकमेव पर्याय आहे, हे बाळाराम पाटील यांच्या कृतीतून दिसून येते. मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांची केवळ औपचारीक भेट घेवून, त्यांचे कोरडे सांत्वन करण्याचे राजकारण शेकापक्ष कधीच करत नाही हे दाखवू देण्याचे काम बाळाराम पाटील यांनी केले आहे. राज्यातील बहुतेक सगळे पक्ष हे दुष्काळी दौरे करायचे, त्याचे फोटो काढायचे, सगळीकडे प्रसिद्ध करायचे आणि त्याचे राजकारण करायचे यात गुंतलेले आहेत. शेतकर्यांना मदतीचा हात घेवून कोणीही आले नाही. ती अपेक्षा फक्त सरकारकडून करायची. सरकारने पॅकेज कमी दिले आणि जास्त दिले यावर वायफळ चर्चा करायची. पण स्वत: मात्र काही करायचे नाही यात सगळे पक्ष गुंतलेले असताना एकमेव शेतकरी कामगार पक्ष स्वत:ची मदत घेवून शेतकर्यांच अश्रू पुसायला बाहेर पडला आहे. हाच शेतकरी कामगार पक्षाचा विचार आहे. तो बाळाराम पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे.
- शेतकरी कामगार पक्ष शाहू, फुले, आंबेडकरांची नावे फक्त भाषणांत घेत नाही, तर त्यांचा विचार कृतीत आणतो, हे बाळाराम पाटील यांनी दाखवून दिले आहे. शेतकरी कामगार पक्षाचा जन्म हा महात्मा फुले यांच्या विचारातून आलेला आहे. शेतकर्यांचा आसूड यातून महात्मा फुले यांनी शेतकर्यांवर होणारा अन्याय दाखवून दिला आहे. संकटं कुणावरही आली तरी आत्महत्या या शेतकर्यांनाच कराव्या लागतात यावर आसूड महात्मा फुले यांनी ओढले आहेत. आज सरकारकडे शेतकर्यांना कर्ज देण्याची क्षमता नाही. सावकारीच्या पाशातून शेतकर्यांना सोडवण्याची सरकारकडे यंत्रणा नाही. भूविकास बँका, जिल्हा बँका राजकारणात अडकून पडल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांचा वाली कोणी नाही. सावकाराकडे असलेले चक्रवाढ व्याज हे मृत्यूचा फास बनून शेतकर्यांच्या भोवती घोगावत आहे. अशातच निसर्गाची अवकृपा झाली तर शेतकर्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते. यातून शेतकर्याला वाचवले पाहिजे. हा महात्मा जोतीराव फुले यांचा वारसा जपण्याचे काम शेकापक्षाने केले आहे. त्यामुळेच बाळाराम पाटील यांनी कोणताही खर्च न करता तो खर्च शेतकर्याच्या मदतीसाठी द्या म्हणून आवाहन केले आहे. हे फक्त संवेदनशील मनाची व्यक्तीच करू शकते. बाळाराम पाटील यांच्या कृतीतून महाराष्ट्राने काही बोध घेणे आवश्यक आहे. आज लग्नसमारंभांवर फार मोठा खर्च होतो आहे. लाखो रूपयांचा अनावश्यक खर्च केला जात आहे. जकात कराप्रमाणे आता लग्न कर लावावा असे वाटू लागले आहे. इन्कम टॅक्सप्रमाणे लग्नाच्या खर्चातून पैसा वसूल केला पाहिजे असे वाटते. लग्नातील खर्च वाचवून आपल्या शेतकर्यांना मदत करण्याची गरज आहे. बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राने हा पायंडा पाडला पाहिजे.
- शेतकर्यांना वाचवण्यासाठी शेतकर्यांचा पक्षच पुढे येवू शकतो हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. आज रायगडात शेकापक्ष वर्षानुवर्षे आहे म्हणून इथल्या शेतकर्यांना आत्महत्या करायची वेळ आली नाही. इथल्या शेतकर्यांनी एकत्र येवून शेकापक्षाच्या नेतृत्वाखाली सातत्याने लढे दिले आहेत. आंदोलने केली आहेत. नवी मुंबई प्रकल्पातील अन्यायाविरोधात 1984 साली दिलेला लढा असो वा साडेबारा टक्केचा लढा असो, सेझ विरोधात आंदोलन असो हा न्याय शेतकर्यांना मिळवून देण्याचे काम शेकापक्षाने केलेले आहे. त्यामुळे लढायची ताकद देणारा पक्ष ही खरी शेकापक्षाची ओळख आहे. रायगडात शेतकरी संप करू शकतात हे स्वातंत्र्यपूर्व काळात ना. गो. पाटील यांच्या नेतृत्वाने दाखवून दिले आहे. जिथे शेकापक्ष पोहोचेल तिथला शेतकरी कधी आत्महत्या करणार नाही हा विश्वास आज बाळाराम पाटील यांनी मराठवाड्याला दिला आहे.
- बाळाराम पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक सर्व पातळीवर घेण्याची गरज आहे. आज अशाच नेतृत्वाची पनवेलला गरज आहे. बाळाराम पाटील यांना लाखो शेतकर्यांचे वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा.
रविवार, २८ डिसेंबर, २०१४
जिथे शेकापक्ष आहे, तिथला शेतकरी आत्महत्या करणार नाही
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा