- पुराणात भस्मासूराची कथा आहे. आपल्या तपश्चर्येच्या जोरावर एखादा राक्षस जेव्हा परमेश्वराकडूनच वरदान घेतो तेव्हा ते वरदान देताना आपण कोणाला हे वरदान देत आहोत याचे भान नसल्यामुळे साक्षात शंकरालाही पळता भुई थोडी झाली होती. ज्याच्या डोक्यावर हात ठेवेन तो भस्म होईल असे वरदान दिल्यामुळे तो भस्मासूर शंकराच्याच डोक्यावर हात ठेवायला निघाला. आधी निरपराध माणसे, साधू, ऋषिमुनींना भस्मसात करून झाल्यावर स्वत:ला खूप शक्तीशाली समजणारा भस्मासूर शंकराच्याच डोक्यावर हात ठेवायला गेला. तेव्हा अशा राक्षसाला आपण वरदान द्यायला नको होते याची जाणिव शंकराला झाली. आज तोच प्रकार पाकीस्तानच्या बाबतीत घडतो आहे.
- पाकीस्तानात मंगळवारी घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. निषेधार्ह आहे. निरपराध शाळकरी मुलांचा केलेला संहार हा अतिशय वेदनादायक असा प्रकार आहे. पण हा प्रकार करणारे जे तालिबानी दहशतवादी आहेत त्यांना पोसणारी यंत्रणा ही सुरूवातीपासून पाकीस्तानची आहे. पाकीस्तानने त्यांना पोसल्यामुळे, शिरकाव दिल्यामुळे आज हाच तालिबानी भस्मासूर सगळ्या जगात धूमाकूळ घालून झाल्यावर पाकीस्तानात धूमाकूळ घालण्यासाठी आला. या निमित्ताने पाकीस्तानला भारतासारख्या अन्य देशांवर हल्ले झाल्यानंतर काय दु:ख असते, किती वेदना असतात हे समजले असेल असे म्हणण्यास हरकत नाही. पण त्यासाठी निरपराध शाळकरी मुलांचा बळी गेला हे अतिशय वाईट आहे.
- दहशतवाद हे परराष्ट्र धोरणातील अस्त्र बनवण्याचा प्रकार पाकिस्तानने केला होता. आता हा भस्मासुर पुरता उलटला आहे. ‘नॉन स्टेट क्टर’च्या नावाने भारताविरुद्ध दहशतवाद्यांचे कारखाने चालवत स्वतः नामानिराळे राहण्याचा प्रयत्न भयंकर रीतीने आता पाकिस्तानलाच हादरवून टाकतो आहे. किंबहुना भारतात दहशतवादी हल्ले करायचे आणि त्याचे भांडवल करून पाकीस्तानच्या सिंहासनावर बसायचे हे पाकीस्तानी राज्यकर्त्यांचे कायमचे राजकारण होते. या राजकारणाचा डाव आता त्यांच्यावरच उलटला आहे हे यातून दिसत आहे. दहशतवाद्यांनी शंभराहून अधिक शाळकरी मुलांची हत्या करून या पाकीस्तानी प्रवृत्तीचे दर्शन घडवले आहे.
- ज्या पद्धतीनेे ‘तेहरिक-ए- तालिबान’च्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केले ते मानवतेविरुद्धचे युद्धच मानले पाहिजे. नुसता निषेध नव्हे, तर या प्रवृत्ती नष्ट करेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार सगळ्या जगाने करायला हवा. पाकिस्तानी लष्कराने कारवाई सुरू केल्याचा सूड म्हणून सैनिकी शाळेत दहशतवाद्यांनी घातलेला नंगानाच धर्मांधता कोणत्या थराला नेते हेच दाखवते.
- अफगाणिस्तान-पाकिस्तान सरहद्दीच्या भागात दहशतवाद्यांचेच राज्य असल्यासारखी स्थिती आहे. आपल्या हितसंबंधांसाठी लहान मुलांचाही ढाल म्हणून वापर करणार्या या संघटना आणि त्यांचे समर्थक हा सुसंस्कृत जगापुढेच मोठा धोका आहे. या धोक्याची जळजळीत जाणीव करून देणारा हा हल्ला आहे. दोन दिवसांपूर्वी सिडनीत घडलेला प्रकार आणि पाठोपाठ पाकीस्तानील ही घटना. हा दहशतवाद जगाला कोणत्या दिशेने घेवून चालला आहे हे दाखवून देतो.
- काही दिवसांपूर्वीच सतरा वर्षांच्या मलाला युसूफजाईने तिच्यासारख्या मुलींच्या शिक्षणाचा हक्क जपण्यासाठी जे आवाहन केले, त्याने एक आशेचा किरण निर्माण झालेला असतानाच दहशतवाद्यांनी आपला भेसूर चेहरा दाखवून दिला. शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार मिळाल्यावर काही दिवसातच अशी अशांतता माजवली जाते याचा नक्की अर्थ समजला पाहिजे. पाकीस्तान सरकारही मलालाच्या पाठीशी ठामपणे राहिलेले नव्हते. तिचा लढा हा एकतर्फी होता. पाकीस्तान जर तिच्या पाठीशी असते तर तालिबान्यांचे मुलींच्या शिक्षणाला विरोध करणार्या कायद्यांना त्यांनी धुडकावून लावले असते आणि सगळ्या शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था केली असती. पण तसे घडले नाही. पण मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मलालाने स्विकारलेल्या नोबेलनंतर ही घटना घडते याचा नक्की अर्थ समजून घेतला पाहिजे.
- दहशतवादाशी लढण्यातील पाकिस्तानी कमकुवतपणाच या घटनेने ढळढळीतपणे पुढे आणला आहे. भारताबरोबरच्या सीमाभागात अस्तित्व व उपद्रव सतत दाखवून देणारे पाक लष्कर अफगाणिस्तानच्या सीमेवर गलितगात्र बनते. ज्यांना आपणच पोसले आणि ज्याचा अजूनही भारताविरुद्ध वापर करता येईल, अशी आशा वाटते त्या दहशतवाद्यांच्या टोळ्यांशी लढावे कसे, हा पाकिस्तानी लष्करापुढचा प्रश्न आहे. पण आता उसने अवसान आणून का होईना त्यांना लढावे लागत आहे. दुसर्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वत:लाच पडावे लागावे तसा प्रकार पाकीस्तानचे बाबतीत झाला आहे. अफगाणीस्तानातील दहशतवाद्यांच्या मदतीने भारताला नमवायचा विचार करणार्या पाकीस्तानला आता तालिबानींच्या हातचे बाहुले व्हावे लागले आहे.
- उत्तर वजिरीस्तानात पाकिस्तानी लष्कराची मोहीम सुरू आहे. त्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. परंतु त्यामुळेच चवताळलेल्या संघटनांनी आपण काय करू शकतो, हे दाखवून दिले. पाकिस्तानने गेली अनेक दशके राष्ट्रबांधणीचा प्रयत्न करण्याऐवजी द्वेषाचा एककलमी कार्यक्रम राबविला. त्यातही भारतद्वेषाने पाकीस्तान पछाडलेले आहे. मुशर्रफ असो वा नवाज शरीफ कोणाचीही सत्ता आली तरी प्रत्येकाची कार्यपद्धती तीच राहिली आहे. त्यातून फोफावलेले विषारी रसायन तेथील उरलेसुरले नागरी जीवन उद्ध्वस्त करण्याचा धोका स्पष्टपणे दिसतो. तो किती गंभीर आहे, याची कल्पना मंगळवारच्या शाळेत झालेल्या हल्ल्यातून येते.
- आजवर पाकिस्तानात कमी दहशतवादी हल्ले झाले नाहीत. अगदी श्रीलंकेचा संघ सात वर्षांपूर्वी सामना खेळण्यासाठी गेला होता तेव्हा त्यांच्यावरही असा हल्ला झाला होता. जगभरातील क्रिकेट खेळणारे देश पाकीस्ताना सामने खेळण्यास तयार नाहीत. तरीही ‘चांगला दहशतवादी’ आणि ‘वाईट दहशतवादी’, असला शब्दच्छल करण्यापर्यंत पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या कोडगेपणाची मजल गेली आहे. फक्त पाकिस्तानच्या हितसंबंधांविरुद्ध कारवाया करणार्या दहशतवादाशी आम्ही लढू, असे वक्तव्य त्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी केले. आपल्या पायाखाली काय जळते आहे, हे न पाहता त्याच चुका पुन्हापुन्हा करणारे पाकिस्तानी धोरणकर्ते अद्यापही भानावर आलेले नाहीत. अशा या पाकिस्तानवर अमेरिकेने दहशतवादविरोधी लढ्यासाठी भिस्त ठेवावी, ही मजबुरी होती. त्याचाही लाभ पाकिस्तानने हव्या त्या दहशतवाद्याना बळ देण्यासाठीच उठवला.
- पाकीस्तानला दहशतवादी राष्ट्र ठरविण्याची ही वेळ आहे. तशी मागणीही अनेकवेळा झालेली आहे. पण अमेरिकेने ते तितकेसे गांभिर्याने घेतले नाही. अमेरिकेची शस्त्रास्त्र इंडस्ट्री यावरच चालते. अशी युद्ध, हल्ले हे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे असल्यामुळे अमेरिकेने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. पण अमेरिकेलाही त्याचा फटका बसला होता हे अमेरिकनेने लक्षात घेतले पाहिजे. पण या घटनेनंतर भारतही असुरक्षित आहे. अशाप्रकारचे संकट आपल्यावरही नजिकच्या काळात येवू शकते यासाठी आपल्याला सज्ज राहिले पाहिजे.
- अफगाणिस्तानातील आपला कार्यभाग आटोपला, असे मानून अमेरिकेने तेथून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे; पण लादेनचा खात्मा वगळता अमेरिकेने ठरविलेल्या उद्दिष्टांचे तीनतेरा वाजले आहेत. 9/11 च्या हल्ल्यानंतर इराक आणि अफगाणिस्तानवर अमेरिकेने हल्ले केले. दोन्ही ठिकाणची अवस्था आज दशकानंतर अधिकच भयानक झाली आहे. त्यांनी इराक उजाड करून टाकलाच आहे . पण ‘इसिस’सारखी अत्यंत कडवी मूलतत्त्ववादी संघटना तेथे पाय रोवते आहे आणि जगभरात ‘इसिस’ छापाच्या मध्ययुगात वावरणार्या मूलतत्त्ववादाचा वणवा पसरविण्याचा खटाटोप करीत आहे. अल कायदाचा अस्त झाला तर इसिसची उदय होतो आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनीत निरपराध नागरिकांना ओलीस धरणार्या हल्लेखोराने ‘इसिस’च्या झेंड्याची मागणी केली होती. पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिकेत अनेक देशांमध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद आणि राजकारण यांचे घातक पडसाद उमटत आहेत. दहशतवादाची झळ सोसणार्यांमध्ये भारत आहे. धर्मांध व प्रतिगामी ‘इसिस’चा प्रचार करणारा तरुण बंगळूरमधील उच्चशिक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणारा असावा आणि त्याला अटक होताच, त्याच्यासारख्याच इतर काही उच्चशिक्षितांनी जाहीरपणे अश्रू ढाळावेत, यावरून परिस्थिती किती बिघडत आहे, याची कल्पना यावी. जागतिक दहशतवादविरोधी लढ्याचे हे अपयश आहे आणि त्याचे मुख्य कारण दहशतवादाच्या विरोधातील निःसंदिग्ध धोरणाचा अभाव हेच आहे.
- सरताझ अझीझ यांच्या मुलाखतीतून ते स्पष्टपणे उघड झाले आहे. पण दुर्दैव हे की अमेरिकाही या लढ्याकडे आपल्या हितसंबंधांच्या चष्म्यातूनच पाहते. आगीचे लोट जेव्हा माणसे आणि प्रदेश यांना भाजून काढू लागतात, तेव्हा ती आग कोणताही आप-पर भाव ठेवत नाही, याची जाण या सगळ्यांना जेवढ्या लवकर येईल, तेवढे बरे. भारतासाठी निर्माण केलेला भस्मासूर असाच आता पाकीस्तानच्या डोक्यावर हात ठेवतो आहे. भारताला निश्चितच याचे दु:ख आहे. पण पाकीस्तान यातून आपल्या विचारात बदल करणार का हा खरा प्रश्न आहे. भारतद्वेष जोपयर्ंत सोडला जात नाही तोपर्यंत पाकीस्तान नवे नवे दहशतवादी निर्माण करीतच राहणार. नव्या संघटनांच्या आहारी जाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण यापुढे भारताला अधिक सावध रहावे लागेल.
- 0000
शनिवार, २० डिसेंबर, २०१४
भस्मासूराचा हात त्यांच्याच डोक्यावर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा