बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४

संकल्प न करण्याचाच संकल्प

2015 या नव्या वर्षाला आजपासून सुरूवात होत आहे. नवीन वर्ष  चांगले असले पाहिजे, काहीतरी छान घडले पाहिजे, आपल्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देणारे ठरले पाहिजे अशी प्रत्येकाची ईच्छा असते. पण वर्ष संपताना प्रत्येकजण त्याचा हिशोब करू लागतो. वर्ष सुरू होताना कधीच त्याचा विचार करत नाही. एक जानेवारीपासून मी अमूक एक करणार, मी तमूक एक करणार असे संकल्प करणारे आपल्याकडे खूप लोक असतात. पण किती जणांचा संकल्प पूर्ण होतो? काहीतरी निमित्त आणि अडचणी, सबबी सांगून तो संकल्प पूर्ण झालाच नाही, आता काय मोडलाच आहे तर जाऊ दे हे वर्ष असेच, असे म्हणत पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरू होतात. विशेषत: चांगल्या कामाचा संकल्प नसेल कदाचित पण अनेकजण ठरवतात की नवीन वर्ष सुरू झाले की मी धूम्रपान करणार नाही, मी मद्यपान करणार नाही, मी मांसाहार करणार नाही. पण काहीतरी सबब सांगून चोविस ते अठ्ठेचाळीस तासात तो संकल्प मोडतो. याचे कारण संकल्प पूर्ण करण्याचा आपला निर्णय आणि निश्‍चय दृढ नसतो.कोणताही निर्णय जेेव्हा दृढ असतो तेव्हा तो प्रामाणिकपणे केलेला असतो. असा निश्‍चय पूर्ण झाल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला नवीन वर्षासाठी कसलाही संकल्प करायचा असेल तर तो पूर्ण करण्यासाठी करा, मोडण्यासाठी संकल्प करू नका. आपण हा संकल्प पूर्ण करू शकू या विश्‍वासाने करा. आपण केलेला संकल्प हा कधी निसर्गावर अवलंबून राहणारा नसतो, तो सर्वस्वी आपल्या ईच्छेवर असतो. तो ईश्‍वरी इच्छेवर अवलंबून नसतो तर ती आपली ईच्छा असते. आपली ईच्छा संकल्पाद्वारे आपण पूर्ण करू शकत नसू तर आपल्यातच कुठेतरी कमीपणा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या या मनाच्या कमकुवतपणाला आवर घालता आला पाहिजे. 1 जानेवारीपासून नियमीत व्यायाम करेन, किंवा नियमीत योगा करेन असे एखाद्याने ठरवले असेल तर निसर्गाचे संकट आले, अतिवृष्टी झाली, कडक उन्हाळा आला तरी त्या संकल्पात बाधा निर्माण होेण्याचे काहीच कारण नसते. पण मनुष्यस्वभाव हा संकल्प पूर्ण करण्यापेक्षा कारणे शोधण्यात वेळ घालवतो. कोणत्या कारणांनी हा संकल्प पूर्ण होणार नाही याचा विचार करीत बसतो. त्या नकारात्मक विचारांनी मनातील संकल्पाला दाबून धरले जाते. संकल्प करण्यापेक्षा तो मोडण्याचे पाप आपण करत असतो. एकवेळ संकल्प केला नाही तरी चालेल पण केलेला संकल्प मोडणार नाही असा संकल्प करायला पाहिजे, तर चांगले काम उभारू शकते. संकल्पामागच्या आपल्या हेतुवर त्या संकल्पाची पूर्तता अवलंबून असते. एखाद्या तरूणाने ठरवले की त्याला अमूक एक मुलगी आवडती आहे. तिने आपल्यावर खूष झाले पाहिजे. तिच्यावर इंप्रेशन पाडण्यासाठी तो व्यायाम करून शरीर कमावण्याचा विचार करतो. परंतु ती मुलगी जेव्हा अन्य कोणावर तरी प्रेम करते असे समजते तेव्हा त्याचा व्यायामाचा, शरीर कमावण्याचा संकल्प सुटतो आणि व्यसनाच्या आहारी जातो. यामध्ये हेतु शुद्ध नव्हता. मला माझे आयुष्य निरोगी जगायचे आहे. त्यासाठी नियमीत व्यायाम केला पाहिजे. असा विचार करून व्यायामाला सुरूवात केली असती तर निश्‍चितच एखादी मुलगी आपण होवून मागे लागली असती.आपल्याला फळ आधी हवे असते. मूळे खोलवर रूजली पाहिजेत यासाठी प्रयत्न करण्याची तयारी नसते. पी हळद अन हो गोरी असले इन्स्टंट परिणाम हवे असतात. इथेच संकल्प तुटून पडतात. म्हणूनच नवीन वर्षात पूर्ण होणारेच संकल्प करावेत. आमच्या पनवेलच्या आमदारांनी मागच्या वर्षात संकल्प केला होता की खारघरचा टोलनाका रद्द करणार. तो रद्द झाला नाही तर पुन्हा निवडणूक लढवणार नाही. काँग्रेस सोडणार. पण निवडणूक लढवणार नाही हा संकल्प आठ दिवसही त्यांच्या मनात राहिला नाही. कारण हेतु शुद्ध नव्हता. मनाची आणि जनाची फसवणूक करण्यासाठी काहीतरी करायचे म्हणून केलेला तो संकल्प होता. आज त्यांचा हेतु शुद्ध असता तर उद्यापासून सुरू होणारा हा टोलनाका इथे उभा राहिला नसता. आपला संकल्प आहे हे भासवण्यासाठी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले. भाजपने आपल्याला टोलनाका रद्द करणारा असल्याचे वचन दिल्याचे भासवले आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून ते निवडूनही आले. आता त्यांचा संकल्प पूर्ण झालेला नाही त्याबाबत ते पुन्हा राजीनामा देतील का? शक्यच नाही. कारण त्यांना टोलनाका असला काय नसला काय , काहीही फरक पडणार नव्हता. केवळ लोकांना फसवण्यासाठी संकल्प करायचा होता. लोकांचे आपल्या भ्रष्ट, निष्क्रिय कामगिरीवरचे लक्ष हटवायचे होते म्हणून केलेला तो स्टंट होता.  या स्टंटला पनवेलकर बळी पडले, फसले. पण हाच स्टंट पुन्हा केला आणि राजीनाम्याचे नाटक केले तर काय होईल याची कल्पना असल्यामुळे आता लाचारपणे पाच वर्ष काढण्याव्यतिरीक्त त्यांच्याकडे काहीही असणार नाही. ही पाच वर्ष प्रत्येक क्षणागणिक जनतेच्या मनातून उतरण्याचे प्रकार घडतील यात शंका नाही. आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यात येतात. ज्यांच्या कृपेने, ज्यांनी आपल्याला लेबल लावले त्यामुळे आपण नवहिंदुत्ववादी झालो आणि विजयी झालो ते देवेंद्र फडणवीस अलिबागमध्ये येतात. रायगडातील आपण एकमेव आमदार आहोत. इतकेच नव्हे तर संपूर्ण कोकणातील एकमेव आमदार आहोत, आपल्याला अलिबागला त्यांना भेटायला गेले पाहिजे याचेही औचित्य पनवेलच्या नवहिंदुत्ववादी भाजपच्या आमदारांना सुचले नव्हते. अशा आमदारांकडून जनतेची कामे कशी काय होवू शकतील? त्यामुळे संकल्पामागचा हेतु शुद्ध असावा लागतो. तो तपासावा लागतो. तो शुद्ध असेल तरच सिद्ध होतो. आपल्याला या रस्त्याचा ठेका मिळाला नाही, म्हणून टोलनाका रद्द करायचा, तो आपल्याला मिळाला असता तर सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाला असता. हे वास्तव प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. 2014 मध्ये असे वास्तव लक्षात न आल्यामुळे चुकीच्या लोकांना निवडून दिले गेले हे लक्षात घेतले पाहिजे.आपल्या देशात प्रत्येकजण काही ना काही कारणाने खोटे बोलत असतो, बुरख्यांच्या जगात वावरत असतो, त्याचे वास्तव वेगळेच असते हे अमिरखानच्या पीके या चित्रपटातून चांगल्यापैकी दाखवून दिले आहे. पराग्रहावरून आलेला एक मनुष्य की ज्याला कपडे, पैसा हे काही माहित नाही. त्याला दुसर्‍याचे ओरबाडून घेणे माहित नाही. पण आपल्या देशात आल्यावर सर्वात प्रथम त्याला सामोरे जावे लागते ते चोरीला. इथे प्रत्येकजण कसा फसवत असतो, चुकीच्या मार्गाला कसा लागत असतो याचे उत्तम कथानकासह सादरीकरण पीके या चित्रपटात दाखवले आहे. आमच्या ग्रहावरील माणसे खोटं बोलत नाहीत, पण इथल्या ग्रहावरील माणसे खोटं बोलतात हे अमिरखान ठळकपणे नोंदवतो हे लक्षात घेतले पाहिजे. खोटं बोलण्याची, दुसर्‍याला खड्डयात घालण्याची, अडकवण्याची प्रवृत्ती आमच्यात मोठ्या प्रमाणात असते म्हणून आमचे संकल्प कधी पूर्ण होत नाहीत. हे खोटेपण पीकेच्या माध्यमातून जगाच्या समोर आणण्याचे धाडस अमिरखानने केल्यामुळेच काही लोक दुखावले आणि आमच्या धर्माच्या भावना दु:खावल्या असा कांगावा करू लागले. या चित्रपटात भावना दुखावण्यासारखे कोणतेही काम केलेले नाही. पण आपला बुरखा फाटला की काय या विचाराने, या भितीने त्याला विरोध होवू लागला. पण या चित्रपटामागचा आमिरखानचा हेतु शुद्ध असल्यामुळेच त्याचा या चित्रपटाचा संकल्प पूर्ण झाला आहे. त्याला आर्थिक यशही चांगले मिळत आहे.नवीन वर्षात संकल्प करायचाच असेल तर तो पूर्ण करण्यासाठी करा. दिखावूपणासाठी करू नका. कारण जगाला फसवलं तरी आपण मनाला फसवू शकणार नाही. त्याने अधिकाधिक दु:ख पदरात पडेल. त्यापेक्षा संकल्प न करण्याचाच संकल्प करा हे उत्तम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: