गुरुवार, २५ डिसेंबर, २०१४

मन करा रे मोठे

  • वाजपेयी आणि मालवीय या दोन विभूतींना भारतरत्न जाहीर झाल्याने अनेकांच्या पोटात पोटशूळ उठला. पण त्यांचे मोठेपण समजण्यासाठी मन मोठे करण्याची गरज आहे हे काँग्रेसी प्रवृत्तीला सांगावेसे वाटते.
  • अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मोदी सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ किताब जाहीर केला आहे. त्यांच्यासोबत हाच किताब स्वातंत्र्यसैनिक मदनमोहन मालवीय यांनाही देण्यात आला आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या भारतरत्नने सर्वांनाच आनंद झाला. त्याचे स्वागत सर्वांनीच केले. पण पंडित मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
  • बनारस हिंदू विश्वविद्यालयाची पायाभरणी करणार्‍या मालवीयांचा उचित सन्मान केला जाईल, असे आश्वासन मोदींनी बनारसवासीयांना दिले होते. त्याची पूर्तता त्यांनी केली. स्वातंत्र्य चळवळीत अनेक अंगांनी झळकणार्‍या व्यक्तींपैकी मालवीय हे एक होते. चळवळीत वादाचे मुद्दे असत. मतभेदाचे प्रसंग वारंवार येत. महात्मा गांधींच्या नेतृत्वाला आव्हानही दिले जात असे. मात्र यामागे स्वार्थाचा उद्देश नव्हता. देश घडवण्याचा ध्यास घेऊन पिढी उभी राहत होती, सर्वस्व खर्च करीत होती. मालवीय हे त्यांच्यापैकी एक होते. स्वातंत्र्य चळवळीत स्वयंतेजाने उजळून निघालेले त्यांच्यासारखे आणखी काही पुढारी होते. मात्र त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा उद्योग काँग्रेस राजवटीत सुरू झाला. त्यांचा उचित सन्मान मरणोत्तर केला गेला त्यामुळे समाधानाची बाब म्हणावी लागेल. फक्त त्यांचे निधन भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी झालेले असल्यामुळे हा पुरस्कार त्यांना द्यावा की नाही याबाबत चर्चा झाली.
  •  गांधी आणि नेहरू यांच्या पलीकडे अन्य कोणाचेही योगदान मानायचेच नाही, अशा पद्धतीने प्रचार सुरू झाला आणि त्याला मीडियाचीही साथ मिळाली. आता अशा दुर्लक्षित व्यक्तींंच्या कार्याची ओळख होत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. पण पंडितजींना हा पुरस्कार दिल्याने अनेकांच्या पोटात दुखू लागले हे दुर्दैव म्हणावे लागेल.
  • ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च सन्मान आहे. तारतम्य बाळगून, बारकाईने विचार करूनच एखाद्या व्यक्तीची या सन्मानासाठी निवड झाली पाहिजे. या सन्मानाने पहिले काही मानकरी नि:संशय त्या योग्यतेचे होते. तथापि, मधल्या काळात हे तारतम्यही सुटले व पक्षनिष्ठा वा जात, धर्म, पंथनिष्ठा यांचे निकष प्रत्यक्ष कार्यापेक्षा महत्त्वाचे ठरू लागले. त्यामुळे वाजपेयींनाही जो पुरस्कार पाच वर्षांपूर्वी मिळायला हवा होता तो आज मिळत आहे.
  • सत्ताधारी असतानाच भारतरत्न म्हणून स्वत:च स्वत:चा सन्मान करून घेण्यातही नेते कचरले नाहीत. आताही मालवीय व वाजपेयी यांचे काम भारतरत्न म्हणावे अशा तोडीचे होते काय, अशी शंका येऊ शकेल व यालाही पक्षीय वा वैचारिक रंग देण्याचा प्रयत्न होईल. मात्र यादीतील काही रत्ने पाहता मालवीय व वाजपेयी हे या सन्मानाला नक्कीच पात्र ठरतात. त्याबाबत कोणीही शंका उपस्थित करून त्या पुरस्काराचा अवमान करू नये हीच अपेक्षा.
  •  आजच्या परिस्थितीत वाजपेयी यांचा सन्मान होणे महत्त्वाचे आहे. वाजपेयी हे स्वतंत्र भारतातील वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. किंबहुना भारतीयत्व कशास म्हणावे, असा प्रश्न आल्यास वाजपेयींच्या नेतृत्वाकडे व पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेल्या कामाकडे बोट दाखवता येईल. निरनिराळे विचारप्रवाह सामावून घेऊन पुढे जाणे हे हिंदू संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हटले तर वाजपेयी यांच्यात ते पूर्णपणे सापडते. भारतीय लोकशाहीत आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी करून दाखवला होता. आघाडीच्या माध्यमातून अनेक घटक पक्षांना एकत्रित करून लोकशाहीची व्याप्ती वाढवली आणि हुकुमशाहीकडे झुकणारी लोकशाही, एकाधिकारशाही संपवण्याचे काम त्यांच्या काळात झाले आहे. लोकशाहीची प्रतिष्ठा त्यामुळे वाढली असे वाटते.
  •  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी अटलजी  निष्ठावंत आहेत. ही निष्ठा त्यांनी कधीच लपवली नाही. मात्र मर्यादेपलीकडे ती जाणार नाही याकडेही लक्ष दिले. नेहरूंची कारकीर्द डोळसपणे पाहणारे वाजपेयी हे पहिले पंतप्रधान. नेहरूंच्या कारभारापेक्षा त्यांची दृष्टी वाजपेयी यांनी आपलीशी केली. यामुळे हृदयात हिंदुत्व, पण कारभारात नेहरूंचा दृष्टिकोन असा वेगळा संगम त्यांच्यात आढळतो.
  • वाजपेयींनी आपल्या कारकीर्दीत कधीही आततायीपणा केला नाही. राजवट बदलली म्हणून जुनी चांगली धोरणेही मोडीत काढायची ही काँग्रेसी प्रवृत्ती आपल्या आचरणत आणली नाही. विरोधकांचेही चांगले गुण  कौतुकास्पद आहेत. भारताच्या परराष्ट्र राजकारणाचा मूळ ढाचा नेहरूंचा ठेवताना त्याला व्यावहारिक वळण देण्याचे काम वाजपेयी यांनी सहजपणे केले. नेहरूंची लोकशाहीवरील निष्ठा, जगण्याकडे रसिकतेने पाहण्याची वृत्ती यांचा प्रभाव वाजपेयी यांच्या वागण्याबोलण्यात दिसतो. असे असले तरी औद्योगिक धोरण व अमेरिकेशी संबंध यामध्ये त्यांनी नेहरूवाद आणू दिला नाही. 
  • अणुचाचणी केल्यानंतर रुष्ट झालेल्या अमेरिकेलाही भारत हा तुमचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे हे लक्षात आणून देण्यात वाजपेयी कचरले नाहीत. पाकिस्तानबाबत नेहरूंप्रमाणे उदार धोरण स्वीकारले असले तरी आग्रा येथे मुशर्रफ यांचा दबाव झुगारून दिला व त्याआधी स्वदेशात दहशतवादाला खतपाणी घालणार नाही, असे त्यांच्याकडून लेखी वदवून घेण्यात कुचराई केली नाही. 
  • पाकिस्तान आजही दहशतवादाला खतपाणी घालत असला तरी उघड त्याची तरफदारी करीत नाही ती वाजपेयींच्या धोरणीपणामुळे. नरसिंह राव यांच्या अर्थनीतीचा मार्ग प्रशस्त करून मनमोहनसिंग यांचे काम वाजपेयींनी सोपे करून ठेवले. 
  • नेहरूंच्या अभिप्रेत असलेल्या लोकशाहीत द्वेषाच्या राजकारणाला थारा नव्हता. मतभेद असले तरी परस्परांविषयी सन्मान होता. नेहरूंची ही विशेषता वाजपेयींनी आत्मसात केली होती. नेहरूंचा उदोउदो करणार्‍या काँग्रेसजनांना हे कधीही जमले नव्हते. काँग्रेसने कायम द्वेषाचे राजकारण केले. पण वाजपेयींनी विरोधकांच्या चांगल्या गुणांचेही कौतुक केले होते. हे मोठेपण फार कमी लोकांमध्ये असते. त्यामुळेच भारतातील सर्व पक्षांतच नव्हे, तर परदेशातील अनेक नेते त्यांचे मित्र बनले.
  •  नेतेपदाकडून मुत्सद्दीपदावर चढलेला संघ परिवारातील हा एकमेव नेता आहे. मुत्सद्दी असल्यामुळे बुद्धिमानांचे वर्तुळ त्यांच्याभोवती जमा होते. वाजपेयींचे पीएमओ हे सर्वात कार्यक्षम पीएमओ होते, अशी ग्वाही सर्व जाणकार देतात. ‘हिंदू तन-मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय’ असे उद्गार काढूनही विरोधकांना आपलेसे करण्याचा आत्मविश्वास ही वाजपेयींची खासियत. भारत हे हिंदू राष्ट्र असले तरी सरकार निधर्मी आहे अशी फोड ते करतात. आधुनिक भारतासाठी हा फरक फार महत्त्वाचा आहे. अटलजींचा सन्मान करण्याबरोबरच त्यांचा हा उदारमतवादी वारसा संघ परिवाराने आत्मसात केल्यास मोदींना कारभार करणे सुलभ होईल.
  • अशा वाजपेयींचा सन्मान भारतरत्नने केल्यामुळे लोकशाहीच्या विचारांचा सन्मान होणार आहे. याबाबत केवळ विरोधासाठी विरोध करणारांनी टिकास्त्र सोडले असले तरी त्या पुरस्काराची शान यामुळे वाढली हे निश्‍चित.
  • पंडित मदनमोहन मालवीय यांनी स्थापन केलेल्या बनारस हिंदू विश्‍वविद्यालयाची किर्ती ही जगभर पसरलेली आहे. इतिहास काळात तक्षशिला आणि नालंदा विद्यापिठांचे जे महत्त्व होते तेच महत्त्व आज या विद्यापिठाला आहे. त्याच्या संस्थापकाला हा भारतरत्न दिल्याने ज्यांच्या पोटात दुखते आहे त्या काँग्रेसी लोकांना सांगायला हवे की मालवीय हे काँग्रेसचे नेते होते. दुसर्‍या काँग्रेसच्या अधिवेशनात दादाभाई नौरोजींच्या काळापासून ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. अशा आपल्याच महान नेत्याचा विसर पडणे ही काँग्रेसी द्वेषमूलक संस्कृती आता संपवली पाहिजे. ज्यांचा उचित सन्मान होत आहे त्यांचे स्वागत केले पाहिजे आणि फालतू चर्चा थांबवल्या पाहिजेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: