बुधवार, ३ डिसेंबर, २०१४

एक वादळ शांत झाले

रायगडचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. अ. र. अंतुले यांचे निधन झाले. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आणि भौगालिक इतिहासात अंतुले यांचे नाव हे अजरामर राहणार आहे. राजकीय इतिहासात याचे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळणारे ते पहिले आणि बहुदा एकमेव मुस्लिम नेते होते. भौगोलिक यासाठी की  पूर्वीच्या कुलाबा या जिल्ह्याचे रायगड हे नामकरण करण्याचे काम अंतुलेंनी केले होते. महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान म्हणजे रायगड. या इतिहासाला भौगोलिक नामकरण करून वर्तमानात त्या स्वाभीमानाचे स्मरण करून देणारे मुख्यमंत्री म्हणून अंतुलेंचे नाव घ्यावे लागेल. बँ. अंतुले हे अतिशय चलाख, आक्रमक आणि त्याकाळात मुख्यमंत्री म्हणून आकर्षक असे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे गांधी टोपी आणि धोतरातील असला पाहिजे. पण  सुटाबुटातील आणि आधुनीक वेषभूषेतील मुख्यमंत्री म्हणून अंतुलेंची ओळख निर्माण झाली होती.   महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री असलेल्या बॅ. अंतुले यांच्या मुख्यमंत्रिपदाची एकूण कारकीर्द ती वादळीच होती. इंदिरा गांधींचे अत्यंत विश्वासू असलेल्या अंतुले यांनी आणीबाणीनंतरच्या पडत्या काळात इंदिरा गांधींना खंबीरपणे साथ दिली. यशवंतराव चव्हाणांसारखे नेते इंदिरा गांधींना सोडून गेले असताना इंदिरा गांधींच्या पाठीशी खंबीरपणे राहणारे नेते म्हणून अंतुलेंची ओळख होती. इंदिरा गांधींचा वाईट काळ सरल्यावर मुख्यमंत्रिपदाच्या रूपाने अंतुले यांना त्यांच्या निष्ठेचे फळ मिळाले. इंदिरा गांधी यांनी शरद पवारांचे पुलोद सरकार पाडल्यानंतर नव्याने आलेल्या सरकारची धुरा बॅ.अंतुले यांच्याकडे दिली. स्वभावाने आक्रमक असलेल्या अंतुले यांनी मुख्यमंत्रिपदी येताच धडाक्याने निर्णय घ्यायला सुरुवात केली. सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गडचिरोली या नव्या जिल्ह्यांची निर्मिती अंतुलेंनी केली. त्यामुळे महाराष्ट्राची भौगोलिक पुनर्रचना करण्याचे काम अंतुलेंनी केले होते.झोपडपट्टीतील, गरीब वर्गातील अनाथ, निराधार वृद्ध महिला पुरूषांसाठी संजय गांधी निराधार योजनेची मुहूर्तमेढ ही अंतुलेंनी घातली होती.अंतुले यांची निर्णयक्षमता प्रचंड होती. अनेक गटांचे नव्या तालुक्यात रुपांतर करण्यासारखे असे अनेक निर्णय अंतुले यांनी अत्यंत वेगाने घेतले.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आल्यास जिल्हाधिकार्‍यांनी उठून उभे राहून त्यांना सन्मान द्यावा, असा आदेशही त्यांच्याच काळात काढण्यात आला. तोपर्यंत जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी हे महसूल खात्याचे जिल्ह्याचे सर्वेसर्वा असल्याप्रमाणे ब्रिटीशकालीन धोरणानुसार वागत होते. यामुळे प्रशासन आणि शासन यांचे नाते जोडले गेले. प्रशासनावर शासनाचा अंकुश असतो. शासन चांगले असेल तर प्रशासनावर त्यांचा हुकुम चालू शकतो हे दाखवण्याचे काम अंतुलेंनी केले. अंतुलेंना कोकणाबद्दल प्रचंड प्रेम होते. इथल्या निसर्गसौदर्याची जागतीक पातळीवर दखल घेतली गेली पाहिजे याची जाणिव त्यांना होता. विलायतेत शिकलेल्या अंतुले यांनी म्हणूनच कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची घोषणा सर्वप्रथम दिली होती.    अंतुले यांच्या कामाचा धडाका सुरू असतानाच अचानक सिमेंट घोटाळ्याचे शुक्लकाष्ट त्यांच्या मागे लागले. सिमेंट टंचाईच्या काळात बिल्डरांना सिमेंट पुरविण्याच्या बदल्यात इंदिरा गांधी यांच्या ‘प्रतिभा प्रतिष्ठान’ला देणग्या मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या आरोपांमुळे अंतुले यांना मुख्यमंत्रिपदावरून अचानक पायउतार व्हावे लागले. पण त्याकाळात सिमेंटसारखी महत्वाची मूलभूत आणि पायाभूत गरजेची वस्तू सहज उपलब्ध नव्हती हे लक्षात घेतले पाहीजे. खुल्या बाजारात सहज सिमेंट मिळत नव्हते. त्यामुळे सामान्य माणसालाही घर बांधतान पांढर्‍या मातीत बांधावे लागायचे आणि जेवढे सिमेंट मिळेल त्याचा गिलावा करावा लागायचा. ही वस्तुस्थिती होती. सिमेंट खुल्या बाजारात असते तर हा शासकीय कोटा आणि घोटाळा झालाही नसता. सिमेंट हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने, विकासकामाचे दृष्टीने महत्वाचे आहे. पण तेव्हाच्या काळात बिल्डर लोकांना ते उपलब्ध करून देणे हे त्यांना महागात पडले इतकेच.      मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अंतले  फारसे सक्रीय नव्हते. त्यांनी दिल्लीच्या राजकारणात जाणे पंसत केले. केंद्रातील काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी आरोग्य व कुटुंबकल्याण व जलस्त्रोत खात्याचा कार्यभार सांभाळला होता. 2004 मध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए-1च्या काळात त्यांच्याकडे केंद्रीय अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी होती.काँग्रेसचे निष्ठावंत नेते असले तरी अंतुले यांचे सर्व पक्षातील लोकांशी उत्तम संबंध होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत अंतुले यांना जिव्हाळा होता. त्याविषयीचा त्यांचा चांगला अभ्यास होता. पक्षभेद विसरून त्यांनी याप्रश्नी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चाही झाली होती. अंतुले यांचा अभ्यास आणि आवाका लक्षात घेऊन बाळासाहेबांनी त्यांना सीमाप्रश्नावर जनजागृती करण्याचे आणि बॅरिस्टरचा काळा कोट चढवून महाराष्ट्राची बाजू मांडण्याचे आवाहनही केले होते. राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी जे आहे ते केले पाहिजे याची जाणिव अंतुलेंना होती. संपूर्ण देशभर काँग्रेसविरोधी लाट 2014 च्या निवडणुकीत होती. गेल्या पाच वर्षातील काँग्रेसच्या कारभारावर सर्वांची नाराजी होती. अशावेळी काँग्रेसच्या रायगडमधील तत्कालीन नेत्यांचे न ऐकता जनहिताची कामे करणार्‍या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे हे अंतुलेंनी ओळखले होते. लोकसभेसाठी उभ्या केलेल्या शेकापक्षाच्या दोनही उमेदवारांचे बाजूने अंतुलेंनी आपली ताकद लावली होती. त्यामुळे खर्‍या अर्थाने जनहिताचे निर्णय घेणारा आक्रमक नेता अशीच अंतुलेंची ओळख राहिली.महाराष्ट्राच्या राजकारणात दोनच वर्ष मुख्यमंत्री म्हणून असलेले अंतुले नावाचे वादळ नंतर आपले खारे वारे पुढची तीन दशके पसरवत राहिले. पण ते वादळ आज शांत झाले आहे. त्या वादळाला भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: