- घुमान येथे होणार्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली. संत साहित्याचे गाढे अभ्यासक असलेल्या डॉ. मोरे यांची यासाठी निवड झाली ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. याचे कारण सदानंद मोरे हे संत तुकारामांचे वंशज आहेत. तुकारामाचा वंशज असलेले साहित्यीकांचे उतस्थितीत घुमान येथील संत नामदेवांच्या कर्मभूमीत होणारे साहित्य संमेलन ही अतिशय ऐतिहासिक गोष्ट आहे.
- खरंं म्हणजे या साहित्य संमेलनासाठी होणारी अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होणे अपेक्षित होते. संतांनी सर्वांना आपले भाऊबंध मानले आहे. तीथे कोणतीही भाऊबंदकी, अहमहमिका असत नाही. प्रत्येक संतांनी परस्परांचा आदर केला आहे. एकमेकांचे थोरपण मानले आहे. त्यातून सदानंद मोरे हे तर संतश्रेष्ठ तुकोब्बारायांचे वंशज. त्यामुळे या साहित्य संमेलनाची निवड ही बिनविरोध होईल अशी अपेक्षा होती. पण निवडणूक झाली. अर्थात या निवडणुकीत मोरे विजयी झाले ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल.
- भारतीय संस्कृती आणि भगवत गीतेचे गाढे अभ्यासक असे डॉ. सदानंद मोरे आहेत. गीतेचा संबंध वारकरी संप्रदायाशी जवळचा आहे. कारण वारकरी संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ही गीतेवरची टिका आहे. गीतार्थ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारा तो ग्रंथ आहे. अशा भगवतगीतेचा अभ्यास करून गीतेचे तत्वज्ञान ही किती महान आहे, मानवी जीवनाशी निगडीत आहे याचा अभ्यास करून डॉ. सदानंद मोरे यांनी आपला प्रबंध सादर केला आहे. याच विषयावर पीएचडी मिळवली आहे.
- वीस वर्षांपूर्वी आळंदीत मराठी साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनाच्या अध्यक्षा या शांताबाई शेळके होत्या. शांताबाई खूप मोठ्या होत्या. पण त्या संत नव्हत्या. त्यांनी सर्वप्रकारचे साहित्य प्रकार हाताळले होते. तरीही या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे संत साहित्याचे अभ्यासक असलेल्या कोणीतरी मिरवावे अशी सदानंद मोरे यांची इच्छा होती. ती इच्छा प्रत्यक्ष संतकुळातील मोरे यांनाच अध्यक्षपद मिळून घुमानच्या साहित्य संमेलनात मिळाली आहे ही आनंदाची बाब आहे.
- डॉ. सदानंद मोरे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. संशोधनात्मक लेखनाबरोबरच त्यांनी नाटक या प्रकारातही लेखन केले आहे. साहित्याची विविध अंगे हाताळणारे साहित्यिकाला हा बहुमान मिळाला आहे. भेदभावाच्या, प्रांतवादाच्या भिंती तोडून चांगला विचार सर्वत्र पसरवण्यासाठी आणि भक्तीमहिमा आणि श्रद्धा भाव पसरवत संत नामदेव पंजाबपर्यंत पोहोचले होते. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी केलेले हे कार्य अत्यंत महान असे होते. पंजाबमधील ज्या घुमान भागात हे साहित्य संमेलन आयोेजीत केले आहे त्या पंजाबात गुरू ग्रंथसाहिबामध्ये संत नामदेवांच्या श्लोकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील संतांनी पोहोचवलेला आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा केलेला हा प्रयत्न कित्येक शतकांपूर्वी झालेला आहे. याचा प्रत्येकाला अभिमान आहे. त्याच्या गौरवाप्रित्यर्थ होत असलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे एका संतांच्या वंशजाला मिळावे यासारखा दुग्धशर्करा योग कुठलाही नाही. श्रीमदभगवतगीतेवर संशोधन करून त्यातील तत्वज्ञान समजलेला साहित्यिक हा संतपदालाच पोहोचलेला असतो. प्रवचन कीर्तन या प्रकारातही मोरे यांनी कार्य केले आहे. आपण तुकोबाचे वंशज आहोत हे त्यांनी सिद्ध करून दाखवले होते. तुकारामांनी वेदांताचा अर्थ जाणला होता. आपल्या साध्या सोप्या भाषेतून त्यांनी आपल्या अभंगांमधून लोकांपर्यत पोहोचवला होता. अशा अभंगगाथेत त्यांनी 5 हजारांपेक्षा जास्त अभंगांची रचना केली होती. त्यांच्याच वंशजाने आता गीतेचा मानवी जीवनाशी कसा संबंध आहे याचे सप्रमाण संशोधन करून फार मोठे कार्य केले आहे. त्यामुळे डॉ. सदानंद मोरे हे अध्यक्षपदासाठी असलेले अतिशय योग्य व्यक्तिमत्व आहे.
- डॉ. सदानंद मोरे हे सतत संशोधन आणि अभ्यासक म्हणूनच गाजले आहेत. लोकमान्य टिळकांनी लिहीलेल्या गीतारहस्यावरही त्यांनी संशोधन केले आहे. गीतेवर ज्यांनी ज्यांनी अभ्यास केला त्या प्रत्येकाच्या ग्रंथावर डॉ. सदानंद मोरे यांनी अभ्यास आणि संशोधन करून हे तत्वज्ञान आत्मसात केलेले आहे. गीता हा खरं तर धर्मग्रंथ नाहीच. तो मानवी जीवनाचा एक भाग आहे. ते ज्ञान आहे, हे सदानंद मोरे यांनी जाणले आहे. चार दिवसांपूर्वी गीता या ग्रंथावरून संसदेत गोंधळ माजला होता. सूषमा स्वराज गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यावरून राजकीय वाद निर्माण झाले होते. पण त्यामध्ये कसलाही अभ्यास न करता केलेली ती उथळ विधाने होती. पण असल्या कसल्याही गोष्टींकडे लक्ष न देता डॉ. सदानंद मोरे यांनी गीतेचे महत्त्व जाणले होते. त्यामुळेच प्रवचन असो वा कीर्तन सदानंद मोरे यांचे विचार नेहमीच प्रबोधनाचे ठरले आहेत. घुमानसारख्या पंजाबमधील पवित्र भूमित डॉ. सदानंद मोरेंइतका पवित्र माणूस दुसरा शोधूनही सापडणार नाही.
- आपण संतश्रेष्ठ तुकारामांचे वंशज आहोत याचा कधीही फायदा डॉ. सदानंद मोरे यांनी उठविलेला नाही. आपल्या पूर्वजांच्या पुण्याईवर आणि कर्तबगारीवर जगणार्या अनेक पिढ्या या महाराष्ट्रात या देशात असताना डॉ. सदानंद मोरे यांचे वागणे हे निस्पृहपणाचे आहे. अमूक यांचा वंशज म्हणून त्याला नमस्कार करा, तमूक यांचा वंशज म्हणून त्याला सत्तेवर बसवा असले राजकारण सुरू असताना आपण तुकोब्बारायाचे वंशज आहोत याचे कसलेही भांडवल डॉ. सदानंद मोरे यांनी केले नाही. हेच त्यांचे संतपण होते. गीतेचा खरा अर्थ समजलेले ते अभ्यासक संशोधक आहेत. गीतेतला कर्मयोग त्यांना समजला आहे. गीतेतील तत्वज्ञान त्यांनी अंगिकारले आहे. त्यामुळेच योग्यठिकाणी योग्य व्यक्ति असली पाहिजे अशी त्यांची नेहमीच अपेक्षा राहिली आहे. आपले गुरू, मित्र असलेल्या बहिरट यांना आळंदीच्या साहित्य संमेलनात संधी मिळायला पाहिजे होती ही त्यांची अपेक्षा होती. पण ते स्वप्न वीस वर्षानंतर पूर्ण झाले. आळंदी ही संत ज्ञानेश्वरांची भूमी होती. या आळंदीतील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद संत साहित्याचे अभ्यासकाला मिळावी अशी मोरेंची वीस वर्षांपूर्वी इच्छा होती. महाराष्ट्रात ते शक्य झाले नाही. पण पंजाबमध्ये मात्र ते शक्य झाले आहे. घुमानच्या साहित्य संमेलनात संत साहित्यिकाचा सन्मान झाला आहे.
- डॉ. सदानंद मोरे यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा महाराष्ट्राच्या राहतील. पंजाबमध्ये फारसे मराठी भाषिक नसतील, पण पंजाब आणि महाराष्ट्राचे संबंध अधिक जिव्हाळ्याचे करण्याचे काम सदानंद मोरे यांना करावे लागेल. पंजाब आणि महाराष्ट्राचा संबंध फार जुना आहे. संत नामदेवांनी पंजाबपर्यंत आपली विचारधारा, भक्तीभाव पोहोचवला. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य लढ्यातही लाल बाल पाल यातील लाला लजपतराय आणि बाळ गंगाधर टिळक हे महाराष्ट्र आणि पंजाबचे एकविचाराचे क्रांतिकारक होते. आताही घुमानमधील साहित्य संमेलनातून हे संबंध अधिक दृढ होतील.
- डॉ. सदानंद मोरे हे कर्मयोगी आहेत. कीर्तनकार आहेत. त्यांच्याकडून साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदाचे भाषण ऐकणे ही फार मोठी पर्वणी असणार आहे. 2015 मध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. यामध्ये साहित्य संमेलन पंजाबमध्ये होत आहे. याच वर्षी विश्वचषक स्पर्धा आहेत. याच वर्षात अधिक मास देखिल आहे. त्यामुळे अधिकाधिक चांगल्या गोष्टींचे दर्शन या वर्षात होणार आहे. त्यामुळे डॉ. सदानंद मोरे यांचे पंजाबमधून होणारे भाषण ऐकणे ही एक चांगली सुवर्णसंधी रसिक आणि साहित्यप्रेमींना असणार आहे. अशा या सदानंद मोरे यांचा जयजयकारही सदानंदाचा यळकोट म्हणून करावा लागेल.
शुक्रवार, १२ डिसेंबर, २०१४
सदानंदाचा यळकोट
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा