तो निर्णय तालिबानी नाही, योग्यच आहे..
गाऊन घालून रस्त्यावर फिरणार्या महिलांना 500 रूपये दंड करण्याचा निर्णय नवी मुंबईतील गोठीवली येथील इंद्रायणी महिला मंडळाने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. मात्र प्रसारमाध्यमांनी त्याला तालिबानी फतवा म्हणून या महिलांच्या अस्मितेला नाहक धक्का पोहोचवला आहे. पण हा निर्णय तालिबानी नाही तर तो योग्यच आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या निर्णयाचे अनुकरण सर्वत्र झाले पाहिजे. वाढत्या बलात्काराच्या घटना बघता नवी मुंबईतल्या गोठीवली गावातल्या महिलांवर आता नवं बंधन घालण्यात आलं आहे. त्यामुळे काही नवस्वातंत्र्यवाद्यांनी गजहब केला आहे. पण इतकी ही गंभीर गोष्ट नाही. त्याचा तालिबानशी संबंध जोडणे किंवा तुलना करणे म्हणजे स्त्री सन्मानाचा अपमान करण्याचा प्रकार आहे. इंद्रायणी महिला मंडळाच्या आदेशानुसार आता महिलांना रस्त्यावर फिरताना मॅक्सी अर्थात गाऊन घालता येणार नाही. तसा आदेशच गावाच्या फलकावर लिहिला गेला आहे आणि जी महिला याचं उल्लंघन करेल तिला थेट आर्थिक दंडांचं फर्मान देखील या महिला मंडळानं काढलं आहे. गोठीवली गावातल्या या महिला मंडळाच्या बैठकीत, बदललेल्या वेशभूषेमुळे बलात्काराच्या घटना वाढल्याचं संशोधन करण्यात आलं. याच कारणामुळं देशभरात बलात्काराच्या घटना वाढल्याचं इंद्रायणी महिला मंडळाचं म्हणणं आहे. त्यामुळं गावातील महिलांनी मॅक्सी अर्थात गावून घालून रस्त्यावर फिरू नये असा आदेश इंद्रायणी महिला मंडळानं काढला आहे. ही खरोखरच कौतुकाची बाब असताना वर्तमानपत्र आणि वाहिन्यांनी त्याला तालिबानी फतवा संबोधून एका सुधारणेला अडसर टाकला आहे. या विषयावर जास्तीत जास्त चर्चा होवून हा घेतलेला निर्णय योग्य आहे हे समजून घेण्याची गरज आहे. इंद्रायणी महिला मंडळाचे जाहीर कौतुक करण्याची गरज आहे. कारण मंडळाचा आदेश मोडणार्या महिलेला तब्बल 500 रुपयांचा दंडही ठोठावण्याचा आदेशही मंडळानं काढला आहे. मंडळाच्या सदस्य महिला या सार्या प्रकारांवर लक्ष ठेवणार आहेत आणि नियम मोडणार्यांकडून दंड वसूल करतील. तशा आशयाचा फलकही गावात लिहिण्यात आला आहे. पण यावरून प्रसारमाध्यमांनी अकारण चर्चा करून महिलांच्या या समजूतदारपणाला आवर घालण्याचा प्रकार केला आहे. गाऊन हा घरात घालण्याचा वस्त्रप्रकार आहे. खरे तर तो शयनकक्ष किंवा बेडरूमपुरता मर्यादीत आहे. तो रस्त्यावर फिरण्याचा कपड्याचा प्रकार नाही. त्यामुळे या निर्णयाचे स्वागतच करायला पाहिजे. आज दुर्दैवाने सकाळच्या शाळांसाठी आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी अनेक महिला शाळांपर्यंत गाऊनवर येतात. हे अत्यंत ओंगळवाणे आणि हिडीस असे चित्र दिसते. मुले छानपैकी गणवेशात, गळ्यात टाय, पायात सॉक्स, बूट घातलेली आणि आई त्यांना गाऊनवर सोडायला येते. असे दृष्य बहुतेक ठिकाणी सकाळच्यावेळी दिसते. त्याचप्रमाणे घराच्या जवळच आहे म्हणून अनेक महिला भाजी आणायला किंवा वाणसामानासाठी दुकानात गाऊनवर जातात. हे चुकीचे आहे. त्यावर बंदी घालण्याची वेळ आली हेच चुकीचे आहे.प्रत्येक गोष्टीचे ठराविक असे ठिकाण असते. त्याठिकाणी तो ड्रेस घातला तर कोणाला काही वाईट वाटत नाही. स्विमिंग टँकवर बिकीनीत असलेली तरूणी पाहिल्यावर कोणी हुरळून जात नाही तर त्या तरूणीचे जलतरणाचे कौशल्य तो पहात असतो. परंतु त्याच बिकीनीवर अन्यत्र कुठे मुलगी आली तर तिच्याकडे वाईट दृष्टीने पाहिले जावू शकते. ते योग्य दिसत नाही. उद्या घराजवळच आहे म्हणून बिकीनी घालून घरातूनच स्विमिंग टँकवर जाणार का? ते दिसायला योग्य नाही म्हणून त्यावर बंधन असणे गरजेचे आहे. ते समाजाने किंवा कोणत्या संस्थेने बंधन घालण्याची वेळ येताच कामा नये.तसाच गाऊन हा घरात घालण्यासाठी, उंबरठ्याच्या आत घालण्यासाठी असतो. बर्याचवेळा महिला गाऊनवर बाहेर पडतात तेव्हा फक्त गाऊनच घालून येतात. आत आंतवस्त्रे, पेटीकोट, परकर घालण्याचे भानही ठेवत नाहीत. तशाच मुलांना शाळेला सोडण्यासाठी, भाजी आणण्यासाठी रस्त्यावर येतात. हे योग्य नाही. अशामुळे बलात्काराचे प्रमाण वाढते असे जरी या महिला मंडळाचे म्हणणे असले तरी ते फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. बलात्कारापेक्षाही अशाप्रकारे गाऊन घालून रस्त्यावर फिरणे योग्य नाही हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी एखाद्या महिला मंडळाने पुढाकार घेतला असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. याचा समतेशी किंवा पुरोगामी प्रतिगामित्वाशी संबंध जोडण्याचा कोणी आचरटपणा करू नये. त्याचा तालिबानशी संबंध जोडून महिला मंडळाच्या योग्य निर्णयाचा अपमान करू नये. हा तालिबानी निर्णय नाही तर तो योग्य निर्णयच आहे. महिलांच्या या निर्णयाला विविध महिला मंडळांनी समर्थन करावे अशी अपेक्षा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा