- कार्यालयात कधी पण मनाप्रमाणे येणार, मधूनच दांड्या मारणार, कार्यालयाच्या वेळेतच कँटिनमध्ये गप्पा ठोकत बसणार, कागदी घोडे नाचवणार आणि पगार मात्र पूर्ण महिन्याचा घेणार, असा कामचुकारपणा करायला सोकावलेल्या केंद्राच्या कर्मचार्यांना केंद्र सरकारने आता चांगलाच चाप लावला आहे. हे कार्यक्षम प्रशासनाच्या दृष्टीने योग्यच झाले. केंद्रिय खात्यांमधील सर्वात महत्त्वाची असलेले पण अत्यंत निष्क्रिय अशी ख्याती असलेले खाते म्हणजे पोस्ट खाते. ग्राहकांना सर्वात वाईट सेवा देण्यात हे खाते अग्रेसर आहे. ग्राहकांशी उर्मटपणे बोलणे, त्यांच्यावर आपण उपकार करतो आहोत असे दाखवणे आणि चेहरा कधीही प्रसन्न नसणे हे या खात्यातील कर्मचार्यांचे वैशिष्ठ्य आहे. त्यामुळे सर्वात प्रथम पोस्ट खाते सुधारण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे.
- पोस्ट वगळता केंद्रीय सरकारी कर्मचार्यांना पाच दिवसाचा आठवडा असतो. सोमवार ते शुक्रवार असे पाचच दिवस काम. शनिवार रविवार पूर्ण सुट्टी. याशिवाय वर्षातल्या चाळीस पन्नास सुट्ट्या. महिनाभर हक्काची रजा. पंधरा दिवस किरकोळ रजा. आवश्यक तर आजारपणाची रजाही मिळतेच. म्हणजेच वर्षातले 135 ते 140 दिवस सुट्ट्याच मिळतात. सुट्टीला जोडून रजा घ्यायची आणि चैन करायची असे करणारे हजारो बहाद्दरही केंद्र सरकारच्या विविध खात्यांत आहेत. शिपायापासून ते वरिष्ठांपर्यंत चांगले वेतन असणारे केंद्र सरकारचे सर्व कर्मचारी मात्र आपल्या कामाशी प्रामाणिक आणि निष्ठावान नाहीत. डिसेंबर महिन्यात या सुट्ट्या संपवण्यासाठी बहुतेक कर्मचारी रजेवर जातात. त्यामुळे नागरिकांची कामे पेंडिंग राहतात. ती करण्यासाठी कोणीही वाली नसतो.
- दररोज कार्यालयात उशिरा येणे. कधीही मधूनच निघून जाणे. अशा कामचुकार कर्मचारी-अधिकार्यांमुळे कामावर परिणाम होतो. जनतेची कामे रेंगाळत राहतात. त्यात पुन्हा काही खात्यात लाचखोरी घुसलेली आहेच. या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरपासून केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयात हजेरी आणि कामासाठी बायोमेट्रिक कार्ड पद्धती अंमलात येणार असल्याचे पंतप्रधानांच्या कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी जाहीर केले आहे. ही नवी योजना 26 जानेवारीपासून देशातल्या केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयात लागू होईल. या नव्या योजनेनुसार कर्मचार्यात शिस्त तर येईलच, पण कामचुकार कर्मचार्यांना कार्यालयात पूर्ण वेळ उपस्थितीबरोबरच त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदारीचे कामही पूर्ण करावे लागेल. कामावर येताना या कार्डवर नोंदणी करावी लागेल. कार्यालयातून बाहेर जाताना म्हणजेच कामाची वेळ संपल्यावर पुन्हा नोंदणी करावी लागेल. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी किती वेळ कार्यालयात कामावर होता, याची नोंद आपोआपच संगणकाद्वारे होईल आणि त्यानुसार त्याच्या कामाचे मूल्यमापन करूनच त्याचा दरमहाचा पगार निघेल. वर्षअखेर बढती आणि वेतनावाढीसाठीही याच नोंदीचा विचार केला जाईल.
- दररोज उशिरा यायला सोकावलेल्या लेट लतिफ आणि कार्यालयातून गायब होणार्या सरकारी बाबूंना ते कामावर असतील तेवढ्याच तासाचे वेतन मिळेल. कार्यालयात अर्धा तास उशिरा आल्यास अर्धा दिवसाचा पगार कापला जाईल. हे बायोमेट्रिक कार्ड भारत संचार निगम लि.,(बी. एस. एन. एल.) आणि महानगर टेलिफोन निगम लि., (एम. टी. एन. एल.) च्या सर्व्हरशी जोडलेले असल्यामुळे जो कामचुकार कर्मचारी कार्यालय सोडून बाहेर गप्पा ठोकायला किंवा खाजगी कामे करायला गेला असेल, त्याचा शोधही अचूक लागू शकेल. कार्यालयाच्या वेळेत कामच करायची सवय सर्व कर्मचार्यांना असती तर केंद्र सरकारला शिस्तीचा हा बडगा उगारावा लागला नसता.
- नव्या सरकारने प्रशासनाला शिस्त आणि लोकाभिमुख प्रशासनाचा धडा शिकवण्यासाठी घेतलेला हा निर्णय योग्य आणि लोकहिताचाच आहे. लोकांकडून कर रूपाने जमलेल्या निधीतूनच या लक्षावधी कर्मचार्यांचे वेतन दिले जाते. भरभक्कम भत्तेही दिले जातात. विविध सवलतीही मिळतात. पण, आपण मायबाप जनतेचे सेवक आहोत याची जाणीव, सरकारी प्रशासनातल्या हजारो कामचुकार गणंगांना नसल्यामुळेच सरकारला हे पाऊल उचलावे लागले. सरकारच्या या निर्णयाचे स्वागतच करायला हवे. पण केंद्र सरकारच्या पोस्ट खात्याबाबत सरकारने आणखी विशेष धोरण आखले पाहिजे. पोस्ट खात्यातील कर्मचारी हे अत्यंत उर्मट आणि ग्राहकांना छळणारे आहेत. त्यांना ग्राहकांशी काही देणेघेणे नाही. पोस्ट खात्याचा व्यवसाय वाढला पाहिजे याकडे त्यांचे लक्ष नाही. उलट हे खाते जेवढे बंद पडेल तेवढा फुकटचा पगार आपल्याला कसा मिळेल अशी मानसिकता पोस्ट कर्मचार्यांची झालेली आहे. बहुसंख्य वेळेला पोस्टात तिकीटांचा तुटवडा असतो. तिकीटे नाहीत म्हणून जादा किमतीची तिकीटे गळ्यात मारण्याचा प्रकार केला जातो. पण आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडे कळवून आपल्याला आवश्यक तितका तिकीटांचा साठा ठेवण्याची जबाबदारी कोणताही अधिकारी घेत नाही. पोस्टाची बचत खाती, नॅशनल सेव्हींग सर्टीफिकेट, इंदिरा विकास पत्र, किसान विकास पत्र या ग्राहकांना तर पोस्टाकडून अत्यंत वाईट वागणूक मिळते. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. नाहीतर गेल्या वर्षी तारखाते बंद केले तसे पोस्ट खाते बंद करावे लागेल.
- आज कुरीअर सेवा अतिशय वेगवान झालेली आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. घराघरात इंटरनेट आहे. इमेल पाठवून संवाद जलदगतीने साधला जातो. अशा परिस्थितीत पोस्टाच्या टपालसेवेकडे दुर्लक्ष केले जात आहे. पोस्ट खात्याने जलद पोस्टसेवा देण्याऐवजी पोस्टमनच्या डिलीव्हरी सेवा कमी केल्या. पोस्टमनची भरती करण्याकडे दुर्लक्ष केले. जेवढा व्यवसाय कमी होईल तेवढा बरा अशी मनोवृत्ती पोस्ट कर्मचार्यांची झाली. काही झाले तरी ग्राहक आपल्याकडे येणार. काही विशिष्ठ कामांमध्ये पोस्टामार्फतच टपाल पाठवणे आवश्यक असते. पण त्याबाबत चांगली सेवा देण्याचे काम पोस्टाने न केल्यामुळे पोस्ट खाते विश्वासार्हता गमावून बसले आहे. कर्मचार्यांच्या कामचुकारपणामुळे अनेकांना फटका बसला आहे. नोकरीसाठी मुलाखतीला आलेले पत्र वेळेत न मिळाल्यामुळे अनेकांचे आयुष्याचे नुकसान झाले आहे. अनेकठिकाणी भरावयाची फी ही पोस्टल ऑर्डर स्वरूपात मागवली जाते. पण पोस्टात पोस्टल ऑर्डर उपलब्ध नसतात. त्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोणताही अधिकारी घेत नाही. विशेष म्हणजे कोणत्याही पोस्ट कर्मचारी अधिकार्याबद्दल कोणीही तक्रार केली तरी त्याची दखल घेणाराच कोणी नसतो. मागच्याच आठवड्यात डोंबिवलीत पोस्टमास्तरच्या अनुपस्थितीत महिला कर्मचार्यांनी निष्क्रियता दाखवून ज्येष्ठ नागरिकांचे एनएसएसचे पैसे अडवून ठेवले. कोणतेही कारण नसताना हे पैसे नाकारण्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. केवळ बायोमेट्रीक यंत्रामुळे उपस्थिती दिसून येईल. पण उपस्थित राहूनही काम करण्याची मानसिकता नसेल तर करणार काय? जे बाहेर बसत होते ते कार्यालयात बसतात, एवढाच फरक दिसेल. पोस्टाच्या या निष्क्रियतेचा गैरफायदा अनेकदा एजंट आणि कर्मचार्यांनी उठवला आहे. ग्राहकांचे सीटीडीचे, सर्टीफिकेटचे पैसे वेळेत न देता ते चार दोन दिवस वापरण्याचा प्रकार सातत्याने होत आहे. या गोष्टीला चाप बसला पाहिजे. ब्रिटीशांच्या काळात सुरू झालेले पोस्ट खाते हे ब्रिटीशांना 1857 च्या बंडात मदतीचे ठरले होते. वेळेत संदेशवहन करण्याच्या पद्धतीने हे खाते महत्त्वाची भूमिका बजावत होते. पण आज तेच खाते भारताला मागे नेण्याचा प्रकार करत आहे. पोस्टाने बदलत्या काळाप्रमाणे जलदसेवा, इमेलसेवा, विमा, बचत, डिपॉझिट या सेवा दिल्या पाहिजेत. पण त्यासाठी कोणताही कर्मचारी आग्रही नाही. उत्साही नाही. मेहरबानी करण्यासाठी आपण इथे आलो आहोत या वृत्तीने ही माणसे काम करत आहेत. त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. पोस्टातल्या कर्मचार्यांनी आयुष्यात एकदा तरी हासले पाहिजे. चेहर्यावर समाधान आणले पाहिजे. प्रेमाने वागले पाहिजे. ग्राहकांशी समजूतदारपणे वागले पाहिजे. एक दिवस जरी त्यांनी असा प्रयोग केला तरी तरी किती कामाचा आनंद मिळतो हे त्यांना समजेल. बायोमेट्रीक यंत्राबरोबर त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.
शनिवार, २० डिसेंबर, २०१४
पोस्ट कर्मचार्यांची मानसिकता बदलणे गरजेचे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा