- संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा जागतीक योग दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारे योगाचा दिन साजरा करण्याची मागणी केली होती. 27 सप्टेंबरला केलेली ही मागणी संयुक्त राष्ट्रसंघाने मान्य करून हा दिवस जाहीर केला. नरेंद्र मोदींच्या या मागणीचे जगभरातील मान्यवर देशांनी केलेले हे स्वागत म्हणजे भारताचा बहुमान आहे. आजपर्यंत आपण इतर देशांनी मागणी केलेले विविध दिवस साजरे करत आलो आहोत. पण भारताचा असा हा एकमेव योग दिन साजरा होणार असल्याने भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा जागतीक पातळीवर गौरव केला जात आहे असेच समजायला लागेल.
- संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानामध्ये विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, अशी विश्वकल्याणाची प्रार्थना केली होती. संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब आहे याची कल्पना तेव्हा मांडली होती. त्या योगीराज ज्ञानेश्वरांचा, योगेश्वर श्रीकृष्णाचा हा बहुमान आहे असे यातून दिसत आहे. भारताच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली गोष्ट आहेच. पण यामध्ये योगसाधनेत जर जास्तीत जास्त आणि प्रत्येकजण गुंतला तर त्यामध्ये जगाचे कल्याण आहे हा संदेश भारताने जगाला दिला आहे.
- योगाबद्दल आपल्याकडे प्रचंड गैरसमज आहेत. योगाचा संबंध हा धर्माशी, अध्यात्माशी जोडला जातो. पण योगाचा संबंध हा आरोग्याशी, शरीरधर्माशी आहे. त्याचा संबंध वैद्यकशास्त्राशी आणि निरोगी जीवनाशी आहे, हे जगाला पटवून देण्याचे कार्य इथून पुढे भारताला करावे लागणार आहे. भारत हा जगाचा अध्यात्मिक गुरू आहे असे पूर्वीपासून बोलले जाते. ते सिद्ध करण्याची ही संधी आहे.
- आज या गर्दीच्या जगामध्ये, धकाधकीच्या जीवनात माणसाला मोकळा श्वास घेता येत नाही. शुद्ध हवा त्याच्या शरीरातील आतल्या भागांपर्यंत पोहोचत नाही. साथीचे रोग, कमी होत गेलेली प्रतिकारशक्ती यामुळे सातत्याने नवे रोग येत आहेत. माणसे मृत्यूमुखी पडण्यासाठी काही कारणे निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत जेवढे आयुष्य हातात मिळाले आहे तेवढे निरोगी आणि स्वच्छ मनाने जगण्यासाठी योग हा माणसाला आधारभूत ठरणार आहे. योग हा रोगनिवारक असा आहे. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यामुळे मिळणारी प्रेरणा ही जगाचे शुद्धीकरण करणारी असेल.
- आज माणसाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सतत युद्धजन्य परिस्थिती त्याच्यापुढे आहे. तणाव, टेन्शन आणि काळजी, भिती यामुळे सेकंदासेकंदाला तो मरण जवळ ओढवून घेत आहे. अशा परिस्थितीत योग हा त्याच्या मदतीला धावून येणार आहे. हे मोदींनी जगाला पटवून दिले ही अभिमानाची गोष्ट आहे.
- योगाची माहिती आपल्याला भगवतगीतेत श्रीकृष्णांनी सांगितली. योगाची पूर्णता ही रणभूमीवर शिकवली गेली आहे. ही योगपद्धती अर्जूनासारख्या एका योद्ध्याला एका घनघोर युद्धाची सुरूवात होण्यापूर्वी श्रीकृष्णाने सांगितली आहे. सर्व योगपद्धती श्रीकृष्णाने अर्जूनाला सांगितल्यावर अर्जूनाचा भ्रमनिरास झाला आणि तो कर्तव्य करण्यास तयार झाला. आज निराशेच्या वातावरणात माणसाच्या मनावर फुंकर घालण्याचे काम अशाच योगातून होणार आहे. आज त्यावर उलट सुलट चर्चा होतील. त्यावर टिकाही होईल. त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जाईल. त्याला भगवीकरण म्हटले जाईल. पण योगाचा जन्मच तसा आहे. अर्जूनाला जेव्हा भगवान कृष्णाने या योगाची माहिती दिली तेव्हा त्यानेही असेच प्रश्न उपस्थित केले होते. सामान्य माणसाच्या शंकाच त्याने प्रातिनिधीक स्वरूपात विचारल्या होत्या. अर्जून हा प्रचंड बुद्धिमान असूनही त्याने या शंका विचारल्या होत्या. याचे कारण त्याचा प्रसार सामान्यांपर्यंत झाला पाहिजे याची त्याला जाणिव होती. श्रीकृष्णाने सांगितलेल्या ध्यानयोग या पद्धतीबद्दल जेव्हा अर्जूनाने ऐकले तेव्हा त्याने विचारले होते, या पद्धतीत जमिनीवर कसे बसावे, शरीर ताठ कसे ठेवावे, डोळे अर्धे मिटून चित्त विचलीत होवू न देता नाकाच्या अग्राकडे दृष्टी कशी लावावी आणि हे सर्व एकांतस्थळी करायचे. हे ऐकल्यावर अर्जूनाचा प्रश्न होता की,
- “योयं योगस्तवा प्रोक्तं, साम्येन मधुसूदन।
- एतस्याहं न पश्यामि, चंचलत्वात स्थितीं स्थिराम ॥”
- याचा अर्थ हे मधुसूदन, तुम्ही सांगितलेली योगपद्धती मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते. कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे.
- हेच याठिकाणी अत्यंत महत्त्चाचे आहे. आपण भौतिक परिस्थितीत वावरत आहोत. इथे प्रत्येक क्षणाला आपलं मन अशांत होत असतं. आपण अनुकूल परिस्थितीत नसतो. आपल्याला वाटत असते की आपण ही परिस्थिती बदलू, या मानसिक अशांततेवर मात करू. जेव्हा आपण एखाद्या विशिष्ठ अवस्थेस पोहोचतो तेव्हाच मानसिक अशांततेची समाप्ती होईल. पण या भौतिक जगाचा स्वभाव असा आहे की आपण काळजीपासून मुक्त होवू शकत नाही. आपण अडचणी सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो पण या अडचणींचे निराकरण आपण करू शकत नाही. या सगळ्याचा विचार करून अर्जूनाने अत्यंत निर्मळपणे आपले मत व्यक्त केले. ते स्वत:साठी नाही तर या जगासाठी केले. सगळं जगच युद्धभूमीवर होते त्यामुळे त्याला जगाचाच विचार करायचा होता. त्यामुळे आजच्या परिस्थितीत मोदींनी केलेले काम हे महत्त्वाचे आहे. जगाच्या कल्याणाचे आहे.
- या श्लोकामध्ये अर्जूनाने श्रीकृष्णाचा उल्लेख ‘मधुसूदन ’असा केला आहे. श्रीकृष्णाची अगणित नावे आहेत. पण याठिकाणी मधुुसूदन असेच म्हटले आहे. मधू सूदन म्हणजे मधू नावाच्या राक्षसाला ठार मारणारे श्रीकृष्ण असा त्याचा अर्थ आहे. त्यावरून पडलेेले हे नाव आहे. अर्जून हा कृष्णाचा मित्र आहे. म्हणूनच तो त्याला सरळ हे कृष्ण न म्हणता मधुसूदन म्हणतो, त्यामध्येच अर्थ दडलेला असतो. याठिकाणी अर्जून आपल्या मनाला मधुसूदन नावाच्या महाराक्षसारखा समजतो आहे. या राक्षसरूपी मनाला ठार मारणे कृष्णाला शक्य झाले तरच योगाची सिद्धी प्राप्त होईल, पूर्णता होईल हे यातून तो सांगतो. हे कृष्णा, माझं मन हे या राक्षसापेक्षाही बलवान आहे. त्या मनाला ठार मारलेत, शांत केलेत तर या योगपद्धतीचा वापर मला करता येईल. म्हणजे अर्जूनासारख्या महान व्यक्तिचे मन अशांत होते तर सामान्य माणसांचे काय? म्हणून अर्जून पुढे म्हणतो,
- “ चंचल ही मन: कृष्णप्रमाथि बलदृढम।
- तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम॥”
- म्हणजे, हे कृष्ण, मन हे चंचल आहे. उच्छृंखल आहे. दुराग्रही आहे. तसेच ते अत्यंत बलवान आहे. या मनाचा निग्रह करणे म्हणजे वायूला नियंत्रीत करण्यासारखे आहे. सामान्य माणसांचे विचार याठिकाणी अर्जूनाने व्यक्त केले आहेत.
- पण योगाचा उद्देशच तो आहे. या चंचल मनाला संयमित करणे हेच योग पद्धतीचे उद्दीष्ट आहे. सध्याच्या जगात आपल्या वयाच्या पन्नास किंवा साठ वर्षापर्यंत जगताना किती तरी समस्यांना तोंड द्यावे लागते. सर्वसाधारणपणे आपण जास्तीत जास्त 80 वर्षापर्यंत जगू शकतो. याच काळात आपल्याला युद्ध, रोगराई, दुष्काळ अशा अनेक प्रकारच्या अडचणींनी चिंताग्रस्त करून टाकलेले असते. अशा परिस्थितीत अशांत मन शांत केले तर माणसाचे आयुष्य सुखी होईल. बहुतेक सगळे रोग हे मनाशी संबंधीत असतात. भितीने पोटात गोळा उभा राहतो असे आपण म्हणतो. पोटाला कसलाही स्पर्श झालेला नसताना पोटात गोळा का उभा राहतो? हे अशांत मनाचे हल्ले असतात. ते विविध रोगराईकडे घेवून जातात. म्हणून योगपद्धतीचा अवलंब करून, ध्यानधारणा आणि मोकळा श्वास घेवून, प्राणायामयोगाद्वारे शुद्ध हवा आपल्या संपूर्ण शरिरात पोहोचवण्याचे काम केले जाते. हे सगळ्या जगाने करावे. संपूर्ण जग निरोगी व्हावे. शरीरानेही निरोगी आणि मनानेनही निरोगी राहण्यासाठी हा जागतीक योग दिन साजरा केला जाणार आहे, ही भारताची संपूर्ण जगाला देणगी आहे. ते देणारे दाते आहेत नरेंद्र मोदी.
शनिवार, १३ डिसेंबर, २०१४
अशांत मनाला शांत करण्यासाठी ‘मोदीयोग’
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा