गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

दीड वर्षांचे प्रगतीपुस्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कारकीर्दीला दीड वर्ष पूर्ण झाले आहे. दीड वर्षात मोदी सरकारवर सोशल मिडीया, विरोधकांनी प्रचंड टिका केली असली तरी त्यांची कामगिरी निश्‍चितच समाधानकारक आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या जमेच्या बाजू पाहणे अत्यंत आवश्यक आहे. दीड वर्षांचा विचार यासाठी की आजपर्यंत विरोधी पक्षाचे सरकार कधी दीड वर्षांच्यापेक्षा जास्त काळ टिकू शकले नव्हते. अस्थिर असल्यामुळे बिगर कॉंग्रेस सरकारला काही चमक दाखवता आली नव्हती. त्यामुळे पहिलेच स्पष्ट बहुमत असलेले बिगर कॉंग्रेस सरकार किती चांगली कामगिरी करू शकते यासाठी हे अवलोकन करणे आवश्यक आहे.   या  दीड वर्षांच्या कालावधीत जनतेला आकर्षित करण्यासाठी नवनव्या योजना सरकारने जाहीर केल्या. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. त्यामुळे या सरकारवर होत असलेल्या टिकेकडे दुर्लक्ष करून जे काही चांगले केले आहे त्याकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे. मोदी सरकारने दीड वर्षात आपली वेगळी छाप उमटवण्याचा प्रयत्न केला आहे हे मान्यच करावे लागेल. म्हणजे पंतप्रधान जनतेशी संवाद साधू शकतात, त्यांना बोलता येते हे तरी किमान मोदींनी दाखवून दिले आहे. त्यापूर्वी दहा वर्षात कॉंग्रेसने डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारख्या बुद्धिमान माणसाचा फक्त मौनीबाबा करून टाकला होता.  अर्थात मोदी सरकारची कामगिरी चांगली असली तरी विरोधकांनी मात्र सरकार निष्क्रिय असल्याचा सूर लावला आहे. तो आजही कायम आहे. ते विरोधकांच्या जागी योग्य आहे. पण सामान्य माणसाने वास्तव समजून घेणे गरजेचे आहे.   भरभक्कम जनादेश लाभूनही संसदेत सरकारची कोंडी करण्यात विरोधक यशस्वी ठरत आहेत. अशा वातावरणात पंतप्रधानांनी ‘मन की बात’मधून जनतेशी सुसंवाद साधण्यात सातत्य राखले आहे. म्हणजे नरेंद्र मोदींनी उपेक्षित आणि दुर्लक्षित झालेल्या गोष्टींकडे लक्ष वेधले आहे हे सर्वात महत्वाचे आहे. वाहिन्या आणि टिव्हीचा अतिरेक चालू असताना मागे पडत असणार्‍या आकाशवाणीला संजिवनी देण्याचे कामच नरेंद्र मोदींनी केले आहे. मन की बातमुळे रेडिओ ऐकणार्‍यांची संख्या वाढली आहे, हे विशेष म्हणावे लागेल. म्हणजे मोदींच्या स्पर्शाने फक्त भाजपलाच बहुमत मिळते असे नाही तर उपेक्षित होत असलेल्या आकाशवाणीलाही बहुमत मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.    नरेंद्र मोदी यांचे दीड वर्षातील परदेश दौरे हा टिकेचा विषय ठरला. सोशल मिडीया आणि विरोधकांनी त्यावर प्रचंड टिका केली. पप्पू राहुल गांधी तर म्हणाले की मोदी फक्त कपडे बदलण्यासाठी भारतात येतात. म्हणजे राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांचे परदेश दौरे असेच गाजत होते. तेच धोरण मोदींनी राबवले की ते वाईट आहेत असे राहुल गांधींना वाटते. पण या परदेश  दौर्‍यांतून भारताची प्रतिमा उंचावण्याचा मोदींनी प्रयत्न केला आहे हे नाकारून चालणार नाही. ब्रिक्ससारख्या देशांमध्ये वाढवलेले वजन, रशिया अमेरिका यांची एकाचवेळी मिळवलेली साथ यातून मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खूप उंचावली आहे यात शंका घेण्याचे कारणच नाही. मोदींच्या कामाचे रिझर्ल्ट मिळतील ते अजून दोन वर्षांनी. त्यांनी जे आज पेरले आहे ते उगवण्यासाठी कालावधी हा लागणारच. पण ज्यांच्याकडे दृष्टी आहे त्यांना दीड वर्षातही हे काम चांगले आहे हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.  अशक्यप्राय असा वाटणारा भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. तो किती यशस्वी होणार याबद्दलची जनतेची साशंकता कायम आहे. तितकाच त्यांचा आत्मविश्‍वासही कायम आहे. आजवरच्या सरकारपेक्षा काही वेगळे करण्याचा त्यांचा ध्यास स्पष्ट जाणवतो. त्यासाठी नव्या कल्पना व नवे विचार शोधले जात आहेत. अफगाण दौर्‍यावरून परतताना पंतप्रधानांनी पाकिस्तानात थांबून पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली. ते नियोजन भेट होईपर्यंत गुप्त ठेवले. पाकभेटीच्या धक्कातंत्राने आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात आश्‍चर्याचा सूर उमटला. देशवासीयही अचंबित झाले. भारत-पाक संबंधांतील दरी व कटूपणा कमी व्हायला या भेटीने किती मदत होते ते आजच ठरवणे कठीण आहे. अफगाणच्या संसद उभारणीत भारताने मोलाचे योगदान दिले. त्या इमारतीच्या उद्घाटनाचा सुयोग पंतप्रधानांना लाभला. भारत नवनिर्माण करतो व विकासाला प्राधान्य देतो हाच संदेश यानिमित्त जगभर पोहोचला. दीडशे वर्षे राज्य करणार्‍या ब्रिटिशांनी भारतभूमीत आपल्या अस्तित्वाच्या अनेक खुणा कोरून ठेवल्या आहेत. त्या पुसून अस्सल भारतीयत्वाचा आविष्कार घडावा हा विचार पंतप्रधान आणि त्यांच्या सरकारच्या मनात घोळत आहे हे निश्‍चित. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी नवी संसद इमारत उभारण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. हा त्याच विचाराचा धागा आहे. संसदेसाठी नवी इमारत उभारण्याच्या प्रस्तावामागची कारणे काहीही सांगितली जात असली , ती खरी वाटत असली तरी ब्रिटीशकालीन छाप पुसून भारतीयत्वाची नवी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. स्वयंस्फूर्तीने व स्वयंभूपणे काही वेगळे करण्याइतके आम्ही सक्षम आहोत हा आत्मविश्‍वास यातून स्पष्ट होतो. अफगाण संसद उभारणीनंतर आता देशाची संसद उभारण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू झाली आहे. नववर्षाची सुरुवात होताना देशाला शांतता व विकासाच्या मार्गावर नेण्याची आश्‍वासक पावले टाकण्यावर पंतप्रधान अधिक भर देतील अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. पण दीड वर्षांच्या कालावधीत नरेंद्र मोदींनी बरेच काही चांगले काम केले आहे ते समजून घेण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: