गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

अजरामर कवितांच्या बादशहाला सलाम

 महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी आणि मराठी कवितेतील अविभाज्य अंग असलेल्या मंगेश पाडगांवकर यांचे काल निधन झाले. मराठी कवितेत पाडगांवकर यांचे एवढे मोठे आणि भरीव योगदान आहे की त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून येणार नाही. या मंगेश पाडगांवरकरांवर मराठी माणसाने अतिशय मनापासून प्रेम केले. वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगांवकर या त्रिकुटाने मराठी माणसांमध्ये आपली कविता रूजवली.   पाडगांवकर यांच्या सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. पण खर्‍या अर्थाने त्यांची कविता जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देणारी अशी होती. समाजातील व्यंग त्यांनी दाखवले त्याचप्रमाणे कवितेतून खरे प्रेम म्हणजे नेमके काय असते तेही त्यांनी दाखवून दिले होते. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सर्वांचे सेम असते’ या कवितेतून त्यांनी प्रत्येक माणसाच्या हृदयाचा कोपरा जाणला आहे असे जाणवते. कारण प्रेमाची कबूली देण्याचे धाडस फार कमी लोकांमध्ये असते. त्यांच्या जिप्सी या कवितासंग्रहाच्या तब्बल पंधरा आवृत्त्या निघाल्या. या काव्यसंग्रहाने गेली पासष्ठ वर्ष मराठी वाचकांना विचार करायला लावला आहे.  याशिवाय निंबोणीच्या झाडामागे, छोरी, शर्मिष्ठा, उत्सव हे कवितासंग्रह खूप गाजले. वात्रटिका या कवितासंग्रहातील मार्मिक कवितांनी त्यांनी सामान्य माणसांना आणि प्रस्थापितांना चांगलेच चिमटे घेतलेले दिसतात.समर्थ रामदासांच्या दासबोधाने जेवढे ज्ञान माणसांना दिले आहे तेवढेच ज्ञान फक्त अंजन घालून उदासबोध या कवितासंग्रहातून त्यांनी दिले आहे. गेली पाच दशके सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ? हे गाणे अत्यंत लोकप्रिय ठरले आहे. पूर्वी शाळांच्या स्नेहसंमेलनात हे गाणे हमखास बसवलेले पहायला मिळायचे. आकाशवाणीवर हे गाणे ऐकताना सगळे मंत्रमुग्ध होवून त्याचा आस्वाद घेत असत. शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय, हे भोलानाथला विचारून लहान मुलांची मानसिकता त्यांनी अचूक टिपली आहे. लहान मुलांना शाळा बुडवावीशी का वाटते आणि त्यासाठी ते कारणे काय काय शोधतात याचे नेमके वर्णन या भोलानाथमधून आले आहे. त्यामुळेच ती अतिशय लोकप्रिय ठरललेली बाल कविता आहे. लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही आनंद देणारी अशी ती कविता आहे. मंगेश पाडगांवकरांच्या शब्दांना अरूण दाते यांनी खर्‍या अर्थाने न्याय दिला. त्यामुळे मंगेश पाडगावकर यांची कविता भावगीत झाली. कवितेचे भाव श्रोत्यांच्या हृदयाला भिडले. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रिती. या प्रेम भावगीतातून मंगेश पाडगांवकर यांच्या लेखणीची कमाल दिसून येते. भावगीतांबरोबरच निसर्गाचे वर्णन करणारे सुंदर असे कोळीगीतही त्यांनी लिहीले आहे. त्या गीताला लता मंगेशकर यांनी अक्षरश: अजरामर केले आहे. असा बेभान हा वारा, नदीला पूर आलेला या गीतातून अंगाला झोंबणारा वारा जाणवतो इतकी ताकद त्या शब्दांमध्ये आहे. भावगीत, प्रेमगीत आणि नवकाव्याच्या छंदमुक्त कवितांनाही मंगेश पाडगांवकर यांनी एका विशिष्ठ उंचीवर नेवून ठेवले होते. श्रीनिवास खळे आणि मंगेश पाडगांवकर, यशवंत देव आणि मंगेश पाडगांवकर या जोड्यांनी अरूण दाते यांच्या मुखातून कवितेचे शब्द मनाला भिडवण्याचे काम केले. मराठी गाण्यांचा भावमधुर आनंद घेण्याचे कसब त्यांनी दाखवले. गाण्याची चाल, संगीत यांची शब्दांवर कुरघोडी होणार नाही याची दक्षता घेत शब्दप्रधान गायकीतून मराठी कवितेतील भाव प्रकट करणारी खर्‍या अर्थाने भावगीते निर्माण केली. ही कधीही न मिटणारी, अविट अशी गोडीची अजरामर गाणी आहेत. वरवर मिश्किल वाटणार्‍या मंगेश पाडगांवकर यांचा व्यवस्थेतील गलथानपणावर प्रचंड राग होता. खटकणार्‍या गोष्टी, संताप त्यांनी ‘सलाम’ या कवितासंग्रहातील कवितांमधून काढला. अभिव्यक्तीचा तो सर्वोत्कृष्ठ नमुना म्हणायला हरकत नाही. कोणाची भीडभाड न ठेवता कवितेतील मुक्तछंदातून त्यांनी परिस्थितीला सलाम केला आहे. सलाम, सबको सलाम, ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम, लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम, या कवितेतून त्यांनी अत्यंत भेदकता दाखवून दिली आहे. म्हणूनच या कवितेला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. बघणार्‍याला सलाम, न बघणार्‍याला सलाम, विकत घेणार्‍याला सलाम, विकत घेण्याचा इशारा करणार्‍यांना सलाम, यातून विकल्या गेलेल्या षंढ व्यवस्थेवर फटकारे मारण्याचे काम पाडगांवकरांनी केले आहे. वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम, शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम, लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम, देवळातल्या देवाच्या धाकाला सलाम, रिकाम्या हातातून उदी काढणार्‍या बुवाला सलाम, हवेतून अंगठी काढणार्‍या बडे बुवाला सलाम, शनीला सलाम, मंगळाला सलाम, भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम, या ओळींमधून व्यवस्थेत लूडबूड करणार्‍या दहशतीवर, गुंडगिरीवर फटकारे मारण्याचे काम पाडगांवकर यांनी केले आहे.  समाजपुरूष षंढ झालेला असताना त्यांच्या नाकर्तेपणावर ओरखाडे ओढण्याचे काम या सलामने केले. बंडाची ठिणगी टाकण्याचे काम या लेखणीतून झाले. म्हणूनच बडबडगीतांपासून प्रेमभावगीतांच्या विश्‍वात संचार करणार्‍या आणि सामाजीक भान ठेवून आपली कविता अजरामर करणार्‍या त्या पाडगांवकरांना सलाम. अजरामर कवितांच्या बादशहाला सलाम...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: