शेतकरी संघटनेचे नेते पहिले आणि खर्या अर्थाने शेतकर्यांचेच असलेले नेते शरद जोशी यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. खर्या अर्थाने हे ठासून सांगण्याचे कारण म्हणजे आजकाल नेते स्वत:ला शेतकर्यांचे कैवारी म्हणून घेतात पण लाल दिव्यावर नजर ठेवून ते काम करत असतात. शेतकर्यांचे भले झाले काय नाही काय याच्याशी त्यांना काही देणेघेणे नसते. पण शरद जोशी हे निस्पृह आणि निरपेक्षपणे शेतकर्यांसाठी झटणारे शेतकरी नेते होते. म्हणून ते पहिले आणि एकमेव शेतकरी नेते होते. हा देश शेतकर्यांवर चालतो हे सांगणारे आणि जाणणारे ते नेेते होते. शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे ते लढवय्ये होते.शरद जोशी हे २००४ ते २०१० या काळात राज्यसभेचे सदस्य होते. शेतकर्यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला असून, शेतकरी चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. शरद जोशी यांचा जन्म सातार्यात झाला होता ही आपणास निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाउराव पाटील यांनी ज्याप्रमाणे सामान्य आणि भूमिपुत्रांचा कैवार घेतला होता तसाच कैवार शरद जोशी या सातारच्या सुपुत्राने घेतला होता आणि शेतकर्यांच्या न्यायासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले होते.प्रशासकीय सेवेतील एक अधिकारी, अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेल्या शरद जोशी यांना भारतीय अर्थव्यवस्था ही खर्या अर्थाने कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे हे समजले होते. त्यामुळेच शेतकर्यांच्या प्रश्नांवर त्यांनी कायम लढा दिला. शेतकर्याला येथील अर्थव्यवस्थेत न्याय मिळाला पाहिजे यासाठी शेतकर्याला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे ही त्यांची कायम भूमिका होती. प्रत्येक व्यापारी आपल्या मालाची, उद्योजक आपल्या उत्पादनाची किंमत ठरवतो आणि शेतकरी मात्र आपल्या मालाची किंमत ठरवू शकत नाही, याची सतत खंत शरद जोशी यांना होती. त्यासाठी त्यांनी कायम लढा दिला. शरद जोशी यांनी व्यक्तिस्वातंत्र्याला महत्व दिले होते. समाजाच्या कारभारातील अनावश्यक सरकारी हस्तक्षेप कमी करणे याला त्यांनी महत्व दिले. यातूनच ९ ऑगष्ट १९७९ रोजी चाकण येथे संघटनेच्या कार्यालयाचा शुभारंभ केला. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकर्यांचे प्रश्न उचलून धरले. १९७९ पासून ’शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा, उस, तंबाखू, दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले. त्यासाठी उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने घेवून शेतकर्यांमध्ये जनजागृती निर्माण केली. देशभरातील शेतकर्यांच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना १९८२ मध्ये त्यांनी केली. हा फार महत्त्वाचा टप्पा होता. शेतकर्यांना केवळ आपली व्होट बँक समजणार्या आणि त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार्या तत्कालीन सरकार आणि राजकीय पक्षांना हा फार मोठा हादरा होता. महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यात शेतकरी आंदोलने करून शरद जोशी यांनी खर्या अर्थाने रान पेटवून दिले होते. चांदवड (जि. नाशिक) येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन घेण्याचे काम शरद जोशी यांनी केले होते. या अधिवेशनात सुमारे दोन लाख महिलांची उपस्थिती होती. त्यामुळे केवळ देशाचेच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष शरद जोशी यांनी वेधून घेतले होते. स्त्रीयांच्या प्रश्नांवरही त्यांनी खूप आवाज उठवला होता. स्त्रीशक्तीच्या जागरणात स्त्री-पुरूषमुक्ती आणि समानतेला त्यांनी कायम प्रोत्साहन दिले होते. शेतावर काम करणार्या महिलांची त्यांनी खर्या अर्थाने कदर केली होती. आत्महत्या करणारे शेतकरी या देशात घडले पण एकाही शेतकरी महिलेने आत्महत्या केली नाही. कारण स्त्रियांमधील असणारी ताकद, सहनशक्ती, कार्यक्षमता त्यांनी ओळखली होती. यासाठी त्यांनी शेतकरी महिला आघाडीची स्थापना केली. महिलांच्या राजकीय सहभागाची योजना त्यांनी आखली. आज जे महिला आरक्षण, स्त्रियांना सत्तेत वाटा वगैरे नेते बढाया मारतात, त्यांच्या अगोदर स्त्रियांना ही संधी मिळाली पाहिजे यासाठी शरद जोशींनी मागणी केली होती. महिलांच्या संपत्ती अधिकाराची फेरमांडणी करण्याचे काम शरद जोशींनी केले. ’लक्ष्मीमुक्त’ अभियानाद्वारे स्त्रियांच्या नावे शेती करण्याचे धाडस सर्वात प्रथम करून पुरूषी मक्तेदारी संपवण्याचे काम त्यांनी केले होते. स्त्रियांची नावे जमिनीच्या सातबारा उतार्यावर नोंदवण्याचे आंदोलन सर्वात प्रथम त्यांनी केले. दारू ही शेतकर्यांची, कष्टकर्यांची वैरीण आहे. त्यापायी कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. यासाठी दारूदुकानबंदी आंदोलन करून त्यांनी महिलांना बळ दिले. राष्ट्रीय कृषीनितीचे जनक आणि खर्या अर्थाने शेतकर्यांचे नेते असलेले शरद जोशी यांच्या निधनाने आज शेतकरी पोरका झाला आहे.
गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५
शेतकरी पोरका झाला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा