शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू शरद पवार

 महाराष्ट्राचे नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस आज आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. कारण एका चतुरस्त्र, चाणाक्ष आणि चलाख नेत्याला घडताना या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे जे आज हा दिवस पाहात आहेत ते भाग्यवान आहेत. कारण माणसं इतकी बहुरंगी, बहुढंगी कशी काय असू शकतात हे शरद पवार यांच्याकडे पाहिल्यावर समजते. शरद पवारांना पाहिल्यावर नेहमीच मला मांजराची आठवण होते. कारण या मांजराचे वैशिष्ठ्य असे की कुठूनही कसेही पडले, फेकले तरी ते चार पायांवरच पडते. हा फार मोठा गुण मांजरात असतो. शरद पवारांमध्ये आपल्याला नेमके तेच पहायला मिळते. सरकार कोणाचेही असो पण वट राहते, शान राहते ती शरद पवारांची. मोदी सरकारमध्येही शरद पवारांचा आशीर्वाद आहे, म्हणून तर त्यांचे गुणगान गायला मोदींना बारामतीला यावे लागते. महाराष्ट्रातही फडणवीस सरकारला पवारांच्या मागे धावावे लागते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाही आपत्ती निवारण मंडळाचे अध्यक्षपद शरद पवारांना त्यांनी दिले होते. बिगरगांधी- कॉंग्रेस सरकार असताना नरसिंहराव यांनी तर शरद पवारांना संरक्षण मंत्री केले होते. त्यामुळे सरकार कोणाचेही असो त्यात शरद पवारांचा सहभाग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा आहेच. कुठूनही पडले तरी चारी पायावर स्थिर असणार्‍या मांजराप्रमाणे ते आपले अस्तित्व टिकवून आहेत. गेली पन्नास वर्ष भारतीय लोकशाहीचा, राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग बनून राहिलेले शरद पवार म्हणूनच आगळेवेगळे व्यक्तिमत्व आहे.  यशवंतराव चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. १९६६ साली पवारांना युनेस्को शिष्यव्रुत्ती मिळाली. त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.   सर्वप्रथम १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या २९व्या वर्षी झाला. १९७८ सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हे ही पवारांचे मार्गदर्शक होते. पण कॉंग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. इथपासून कोणतेही सरकार असो ते चालवण्याचा जन्मसिद्ध हक्क आपला आहे या धोरणाने शरद पवार महाराष्ट्राचे राजकारण करू लागले. १८ जुलै १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर कॉंग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, कॉंग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात उत्तम कारकीर्द ही या काळातील सरकारची होती. शरद पवार हे राज्याचे सर्वांत तरूण मुख्यमंत्री होते.  लोकसभेची निवडणूक पवारांनी सर्वात पहिल्यांदा लढवली ती १९८४ साली.  मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले. १९८५ ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. यावेळी शरद पवार राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.  ९ वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे कॉंग्रेस(इंदिरा) पक्षात प्रवेश केला. जून १९८८ शंकरराव चव्हाणांचे जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसर्‍यांदा शपथ घेतली. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी कॉंग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला. निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. श्री.पी.व्ही.नरसिंह राव आणि अर्जुन सिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते, पण महाराष्ट्राला डावलण्याच्या केंद्रीय राजकारणाच्या प्रवृत्तीने ते नाव मागे पडले. त्यामुळे महाराष्ट्राचे पंतप्रधानपदाचे आशास्थान अजूनपर्यंत शरद पवार या रूपाने शिल्लक आहे. नरसिंह रावांनी पवारांना केंद्रिय मंत्रीमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. पण सहा मार्च १९९३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शरद पवार राज्यात परतले. तेव्हापासून केंद्र आणि राज्य अशा दोन्ही पातळीवरील राजकारण हलवण्याचे काम शरद पवार करत आहेत. पवारांची मुख्यमंत्रीपदाची चौथी कारिकिर्द अत्यंत वादग्रस्त ठरली. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत भीषण बॉंबस्फोट झाले. त्यात २५७ लोक ठार तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले. ३० सप्टेंबर इ.स. १९९३ रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले. या संकंटांबरोबरच राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावर अनेक आरोप केले. अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले. जळगाव येथील सेक्स स्कँडल मध्ये अनेक तरूणींवर लैंगिक अत्याचार झाले.त्यात कॉंग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला. २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर येथे गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला.त्यात चेंगराचेंगरी होऊन १२३ लोक मृत्यूमुखी पडले. त्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांनी वेळेत भेट न घेतल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली असाही आरोप झाला. जनतेत सरकारविरूध्द वाढलेली नाराजी आणि मोठया प्रमाणावर झालेली बंडखोरी यांचे प्रतिबिंब १९९५ च्या मतपेटीत उमटले. कॉंग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला.  १९९७ मध्ये त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरूध्द निवडणुक लढवली पण त्यांचा पराभव झाला. पवारांच्या आयुष्यातील हा एकमेव पराभव होता. त्यानंतर शरद पवार १२ व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले. १९९९ मध्ये पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी अशी मागणी केली की,१३ व्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे. उच्च शिक्षण, कर्तबगारी आणि पात्रता असलेल्या अनेक व्यक्ती असलेल्या या ९८ कोटी लोकांच्या देशात भारताबाहेर जन्म झालेली कोणतीही व्यक्ती सरकारचे नेत्रुत्व करणे योग्य होणार नाही. कारण हा प्रश्न देशाची सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि जागतिक राजकारणातील भारताच्या प्रतिमेबरोबरच प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेशी निगडीत आहे.’ त्या कारणावरून कॉंग्रेस पक्षाने शरद पवार,पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले. त्यानंतर शरद पवारांची प्रतिमा ही राष्ट्रवादी अशी निर्माण झाली. तेव्हापासून आजतागायत सरकार कोणतेही असो त्यावर अंकुश ठेवण्याचे काम आणि प्रत्यक्ष अप्रत्यप सहभाग अनिवार्य असणारे नेते म्हणून शरद पवार ओळखले जावू लागले.शरद पवारांचा आज अमृतमहोत्सव आहे. या देशात नेहरू युग, इंदिरा युग, चव्हाण युग अशा तर्‍हेने अनेकांची पर्व गौरवली गेली. पण शरद पवारांचे युग हे महायुग आहे. ते महापर्वच ठरेल. त्यांना अमृत महोत्सवानिमित्ताने हार्दीक शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: