भारतातील क्रिकेट हा आता जुगार झालेला आहे. खेळ जिंकण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी नाही तर पैसे कमावण्यासाठी खेळायचा असा प्रकार चालला आहे. दोनच दिवसांपूर्वी ‘आयपीएल’चे लिलाव जाहीर झाले. क्रिकेटपटू त्याचा लिलाव होऊन विकला जातो, ही संकल्पनाच अत्यंत किळसवाणी आहे. पैसे मिळायला लागल्यावर माणसे कोणत्या थराला जातील हे यातून दिसते. त्यामुळे आता मॅच फिक्सींग, स्पॉट फिक्सिंगमध्ये नाव येणे हे ही मोठेपणाचे लक्षण ठरेल काही दिवसांनी. कारण फिक्सिंगमध्ये एखादा अडकला तर तो चांगला खेळाडू आहे, निकाल बदलण्याची त्यामध्ये ताकद आहे असा अर्थ काढला जावू शकतो. पण यामुळे जुगाराला उत येणार हे निश्चित. आपल्याकडे राजकारण असो, शिक्षण असो, सहकार असो, निवडणूक असो, सगळे विषय पैशांनी व्यापून टाकलेले आहेत. क्रिकेटपटूंचा लिलाव हेच घृणास्पद आहे. एका देशाच्या संघातून खेळणारे खेळाडू या ‘आयपीएल’मध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळतात आणि एकमेकांना बाद केल्यावर टाळया वाजवतात. आता धोनीला बाद केल्यावर रैना टाळया वाजवणार. झटपटच्या नादात क्रिकेटची वाट लागली आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण अफ्रिकेबरोबरच्या मालिकेत एकही कसोटी सामना पाच दिवस चालला नाही. तितका वेळ खेळपट्टीवर थांबण्याची क्षमता नष्ट झाली आहे हे दिसून येते. पाच दिवसांच्या क्रिकेटचा पूर्ण चोथा झालेला आहे. पूर्वी भारतीय क्रिकेट संघ पाच-पाच दिवसांचे सामने अगदी निष्ठेने खेळत होता. सामना हरणे सामना जिंकणे काहीही असले तरी पाच दिवस टिकून राहण्याची कसोटी असायची. पैशाला महत्त्व नव्हते खेळाला महत्त्व होते. खेळातल्या डावपेचाला महत्त्व होते. आता सगळे फिक्सिंग झाले. राजस्थान, चेन्नईचे संघ यावेळी बाद झाले. त्यातल्या खेळाडूंनी लिलावात बोली होऊन मिळालेल्या पैशाच्या खेरीज खेळाचे इमान विकले आणि सामना जिंकण्याकरिता किंवा हरण्याकरिता बाहेर आणखी वेगळया बोली केल्या. हा जुगार सुरू झालेला आहे. आज परिस्थिती अशी आहे की, ज्यांना क्रिकेट कळत नाही आणि ज्यांनी राजकारणात घुसखोरी करून पदे मिळवली ते कोणी राजीव शुक्ला नावाचे व्यक्ती ‘आयपीएल’मध्ये प्रमुख आहेत. कधी क्रिकेट खेळला नाही, विषय समजत नाही, बॅट हातात धरता येत नाही, तो झाला ‘आयपीएल’चा अध्यक्ष. केवळ पैशाच्या जोरावर. पैसा कमावण्यासाठी. ‘आयपीएल’ हा सगळा विषय बदमाषांच्या हातातला विषय झाला आहे. कोटी कोटीच्या बोली करायच्या. हे पैसे काही घरातले कोणी घालत नाहीत. ‘आयपीएल’च्या विविध कंपन्यांनी या ‘आयपीएल’मध्ये घातलेला पैसा हा लोकांकडूनच उपसलेला पैसा आहे. स्वत:चे शौक पुरे करण्याकरिता आणि पुन्हा त्यातून पैसे मिळवण्याकरिता या ‘आयपीएल’चा जन्म झाला. एप्रिल महिन्यात सुरू होणारी २०१६ ची आयपीएल ९ वी आहे. २००८ ला हे नाटक सुरू झाले. त्यात आठ संघ खेळणार. त्या आठ संघात ५६ सामने आणि बाद फेरीतले ४ असा हा ९ एप्रिल ते १६ मे सव्वा महिन्याचा दंगा नुसता. विशेष म्हणजे जो भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० हरला ते आता विविध संघातून खेळणार आहेत. २०१५ साली आठव्या हंगामात युवराज सिंगची बोली १६ कोटी होती. एवढी प्रचंड रक्कम युवराज सिंगला मिळाली. पण त्या संपूर्ण मालिकेत तो पूर्णपणे अपयशी ठरला. ज्या अपेक्षेने त्याला १६ कोटी रुपये मोजले, त्या मानाने त्याला आपला खेळ उंचावता आला नाही. त्यामुळे युवराज मागे फेकला गेला. म्हणजे हे सगळे रेसचे घोडे झाले आहेत. रेसमध्ये धावू न शकणार्या घोडयांना नंतर गोळी मारून टाकले जात असे. ही सगळी जुगाराची ब्रिटीश संस्कृती आहे. ब्रिटीशांनी रेस आणि क्रिकेट हे दोन्ही पैसा कमावण्यासाठी काढलेले खेळ आहेत. त्यामुळे पैसा मिळवताना अपयश आले तरी चालेल पण पैसा मिळाला पाहिजे ही त्यांची नीती. त्यामुळेच आजपर्यंत विश्वचषक स्पर्धेत घरचा खेळ असूनही इंग्लंड कधी जिंकलेला नाही. सगळ्यांना उल्लू बनवण्याचे काम त्यांनी केले. यावर्षी ‘आयपीएल’मध्ये धोनीला साडेबारा कोटी रुपये बोली लागली. ही या हंगामातली सर्वोच्च बोली आहे. धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. २० षटकाच्या सामन्यात पाचव्या क्रमाकांवर खेळायला येणा-याला फार कमी षटके खेळायला मिळतात. त्यामुळे धोनीकडून मोठया खेळीची तर अपेक्षा तर नाहीच. धोनी सारख्याला जेव्हा साडेबारा कोटी रुपये बोली लागते तेव्हा ‘आयपीएल’चे जे सतरा सामने धोनीच्या वाटयाला येणार आहेत, त्या सतरा सामन्यांत धोनी खेळो न खेळो, एका सामन्याचे मानधन ९० लाख रुपये असणार आहे. खेळाचे महत्त्व अतोनात वाढवून ठेवलेले आहे. लोकांना वेडे करण्याचा हा प्रकार आहे. आपण नेमके काय करतो आहोत, कुठे पैसा खर्च?करतो आहोत, याचे भान राहिलेले नाही. जिथे पैसा फेकून खेळ खेळला जातो, तो खेळ किळसवाणा मानला पाहिजे. खेळामध्ये एक पावित्र्य आहे. त्या पावित्र्यापासून ‘आयपीएल’ने क्रिकेटला पूर्ण बदनाम करून टाकले आहे. खेळाशी बांधिलकी राहिली नाही. खेळाला सुरुवात होण्याच्या अगोदर बोलीत मिळालेल्या पैशाचे ड्राफ्ट हातात पडल्यामुळे खेळलेच पाहिजे, असा काही नियम राहिलेला नाही.
सोमवार, २१ डिसेंबर, २०१५
क्रिकेटचा जुगार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा