फक्त एकट्या आपल्यावरच सार्या कार्याची मदार आहे, अशा भावनेने काम करा. भावी पन्नास शतके तुमच्या कार्याकडे डोळे लावून बसली आहेत. भारताचे भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे. कंबर कसून कामाला लागा. - स्वामी विवेकानंद..................................................
- खारघर टोलनाक्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरला आहे. आजचा दिवस हा शेतकरी कामगार पक्ष नवा इतिहास घडवणार आहे. ज्या ढोंगी नेत्यांनी मतदारांची फसवणूक करून खारघर टोलनाक्याचा प्रश्न हा जनतेचा न करता स्वार्थी राजकारणासाठी केला त्यांचा बुरखा आज फाटणार आहे. पनवेल उरणच्या स्थानिकांना टोलमधून मुक्ती देण्यासाठी शेकाप आज न भूतो न भविष्यती असा लढा देणार आहे. हा लढा शेकापक्षाच्या प्रतिष्ठेचा नाही तर सामान्य नागरिकांची झालेली फसवणूक आणि त्यांना न्याय मिळवून देणारा हा लढा आहे. त्यामुळेच या लढ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागल्याशिवाय राहणार नाही. आज संपूर्ण उरण आणि पनवेल तालुक्यातील जनतेची मदार ही शेकापक्षाच्या खांद्यांवर आहे. त्यांच्यावरच सर्वांचा विश्वास आहे. त्या विचारानेच आज शेकापक्षाला काम करायचे आहे. स्वामी विवेकानंदांनी वर मांडलेला विचार हा आज प्रत्यक्षात येण्याचा दिवस आहे.
- आंदोलन करणे, मोर्चा काढणे, निषेध करणे म्हणजे नक्की काय ते सगळ्या पक्षांनी शेतकरी कामगार पक्षाकडून शिकले पाहिजे. कारण शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा एकदिलाने काम करतो. आपल्या पक्षावर, आपल्या लाल बावट्यावर आणि आपल्या नेत्यांवर नितांत प्रेम करतो आणि आंदोलनात उतरतो. म्हणूनच शेतकरी कामगार पक्षाची आंदोलने ही कधीच यशस्वी झाल्याशिवाय रहात नाहीत. सत्तेत नसला तरी शेकाप जनतेच्या प्रश्नांवर लढतो आणि न्याय मिळवून देतो हेच शेकापक्षाने सातत्याने दाखवून दिले आहे. आजही तसेच घडणार आहे.
- जुलमी पद्धतीने स्थानिकांचा विचार न करता अचानक हा टोलनाका सुरू केल्यावर सगळ्या प्रसारमाध्यमांना आठवण झाली ती शेतकरी कामगार पक्षाची. शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांची. पहाटेपासून सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी भाई विवेक पाटील यांना फोन करत होते, त्यांच्या प्रतिक्रीया घेत होते. यातच एक आशेचा किरण शेतकरी कामगार पक्षात आहे हे दिसून येते. पनवेलचे भाजपचे आमदार निष्क्रिय आहेत, स्वार्थी आहेत ते काहीही करू शकणार नाहीत, टोलपासून स्थानिकांना कोण सोडवू शकतो तर फक्त आणि फक्त शेकापक्षच सोडवू शकतो हा विश्वास प्रसारमाध्यमांना वाटला. त्यामुळे मंगळवारी दिवसभर स्थानिक नागरिकांची, प्रसारमाध्यमांची, कार्यकर्त्यांची भाई विवेक पाटील, बाळाराम पाटील यांना भेटण्यासाठी रिघ लागली होती. हा प्रश्न शेतकरी कामगार पक्षच सोडवू शकतो आता आपण काहीतरी केले पाहिजे हा त्यांचा विश्वास होता. तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आज शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हातात लाल बावटा घेवून रस्त्यावर उतरला आहे. प्रशांत ठाकूर यांनी केलेली फसवणूक आता जनतेच्या लक्षात आली आहे. मतदारांची फसवणूक केली. स्वार्थासाठी आणि काँग्रेस सोडण्यासाठी निमित्त हवे होते म्हणून टोलनाक्याचा प्रश्न राजकीय केला. या प्रश्नाचे राजकारण करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. पण नागरिकांना फसवून प्रशांत ठाकूर यांनी त्यांची दिशाभूल केली. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत हा टोल सुरू होणार नाही असा कांगावा केला. पण आमदार झाल्यावर पहिले काम काय केले असेल तर हा टोल सुरू केला. या दुष्टपणाला धडा शिकवण्यासाठी मतदार जागृत झाला आहे. पक्ष बदलला, बुरखा बदलला तरी आतला दुष्ट, स्वार्थी माणूस बदलला नाही. फसवणूक करणारी प्रवृत्ती बदलली नाही. भगवी वस्त्र धारण करून प्रशांत ठाकूर साधू झाले नाहीत तर संधीसाधू झाले. मतदारांचा विश्वासघात केला, हे रहस्य या टोलच्या रूपाने मंगळवारी उघड झाले. त्यामुळेच यातून आपल्याला कोण वाचवू शकेल तर तो फक्त शेकापक्षच वाचवू शकेल. यावर निर्णायक आंदोलन करून स्थानिकांना न्याय कोण मिळवून देईल तर तो शेकापक्षच देवू शकेल असा विश्वास प्रत्येकाला पटला. त्यामुळे उत्स्फूर्तपणे सगळ्यांची पावले ही शेकापक्षाच्या कार्यालयाकडे वळली.
- 2014 च्या निवडणुकीत भले शेकापक्षाला यश मिळाले नसले तरी आपले प्रश्न सोडवण्यासाठी शेकापक्षच आहे हे अजून इथला नागरिक, स्थानिक, प्रकल्पग्रस्त, मतदार विसरलेला नाही, हाच शेकापक्षाचा नैतिक विजय आहे. स्वार्थासाठी पक्ष बदलणारे नेते हे कधीच जनतेच्या समस्या सोडवत नसतात हे मतदारांना कळले नव्हते म्हणून प्रशांत ठाकूर यांच्या भाजपप्रवेशामुळे मतदारांनी त्यांना कौल दिला असला. तरी हा भगवा रंग हा साधूचा नाही तर संधीसाधूचा आहे हे मतदारांना मंगळवारी समजले. काँग्रेसचा झेंडा सोडून नवहिंदुत्ववादी भगवा धारण केला तरी भगव्या रंगाने जे पावित्र्य राखायचे असते ते पावित्र्य प्रशांत ठाकूर यांनी राखले नाही. भगवा रंग विटाळण्याचे काम प्रशांत ठाकूर यांनी केल्यामुळे सच्चा हिंदुत्ववादी माणूसही प्रचंड संतापलेला आहे. फसवणूक करून, खोटी आश्वासने देवून निवडणूक लढवली आणि निवडून आल्यावर दोन महिन्यांच्या आत नागरिकांचा विश्वासघात केला याची जाणिव आज पनवेलकरांना झालेली आहे. मृगजळाच्या मागे धावण्यात काही अर्थ नसतो हे पनवेलकरांना आज समजले आहे.
- पनवेलकरांना लागलेली ही ठेच फार मोठी आहे. पण ही ठेच लागल्यावर आता त्यांना शहाणपण सुचेल आणि प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या फसवणूक करणार्या माणसाच्या मागे लागणार नाहीत अशी आशा करायला हरकत नाही. प्रशांत ठाकूर यांनी आणलेल्या संकटामुळे शेतकरी कामगार पक्षाची आठवण सर्वांना झाली इथेच शेकापक्षाचे मोठेपण दिसून येते. संकटात सापडल्यावर प्रत्येकजण देवाचा धावा करतो. आपला तारणहार कोण आहे याचा शोध घेतो. आज प्रत्येकाला शेकापक्षाचा धावा करावासा वाटला याचे कारण शेकापक्षाने केलेली आजपर्यंतची आंदोलने ही यशस्वी झालेली आहेत. शेकापक्षाच्या आंदोलनात सच्चेपणा असतो. कडवेपणा असतो. आज हाच कडवेपणा आपल्याला दिसणार आहे.
- टोलमुक्त महाराष्ट्र करू असे भाजपने निवडणुकीत आश्वासन दिले होते. पण सत्तेवर आल्यावर दोन महिन्यात खारघरचा टोलनाका सुरू केला. त्यामुळे भाजपने मतदारांचा विश्वासघात केलेला आहे. अशावेळी पनवेलचे आमदार म्हणून प्रशांत ठाकूर यांनी आक्रमक होणे आवश्यक होते. पण सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी दुपारपर्यंत प्रशांत ठाकूर तोंड लपवून बसले होते. प्रसारमाध्यमे त्यांची प्रतिक्रीया घेण्यासाठी येत असताना त्यांना टाळण्याचे काम प्रशांत ठाकूर यांनी केले. पण शेवटी प्रशांत ठाकूर यांना काही माध्यमांनी गाठलेच. तोंड लपवून बसलेल्या प्रशांत ठाकूर यांचे तोंड उघडण्याचा प्रयत्न केला पण कोणतेही उत्तर प्रशांत ठाकूर यांना देता आले नाही. त्यांचा चेहरा पार पडलेला होता, काळा ठिक्कर पडला होता. आपण केलेली फसवणूक जनतेच्या, प्रसारमाध्यमांच्या लक्षात आली आहे याच्या जाणिवेने त्यांच्या मनात धडकी भरली होती. मंगळवारी त्यांचा बुरखा पूर्णपणे फाटला होता. त्याचवेळी यातून आपल्याला मदत कोण करू शकेल तर तो फक्त शेकापक्षच करू शकेल याची जाणिव सर्वांना झाली. अत्यंत अल्पवेळात, काही तासात शेकापक्षाचा कार्यकर्ता एकवटला. स्थानिकांना न्याय देण्यासाठी खारघर टोलनाक्यावर धडक देण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन काही तासात घडले. ही एक उत्स्फूर्तता होती. आता इथले प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त शेकापक्षाच्या नेत्यांकडे असताना प्रशांत ठाकूर यांचा मतदारसंघासाठी काहीही उपयोग नाही हे दिसून आलेले आहे. एक निष्क्रिय, निरुद्योगी आमदार अशी त्यांची ख्याती होणार आहे. कारण नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणी त्यांच्याकडे जावूच शकणार नाही. प्रशांत ठाकूर हे फक्त फसवणूक करू शकतात, खोटे गुन्हे नोंदवू शकतात, कोणतेही विधायक काम करू शकत नाहीत हे मतदारांना नव्या वर्षात समजले आहे. पण पनवेल आणि उरणचे संरक्षण करण्यासाठी शेकापक्षाचा लाल बावटा मजबूत आहे. काही वाटेल ते झाले तरी चालेल पण शेकापक्ष यातून स्थानिकांना न्याय मिळवून देणारच आहे. 1984 च्या लढ्यात ज्याप्रमाणे रक्त सांडले तसे रक्त सांडण्याच्या इराद्याने आज कार्यकर्ता पेटून उठला आहे. शेकापक्षामुळेच आज इथल्या प्रकल्पग्रस्तांना साडेबाराचा हक्क मिळाला. शेकापक्षामुळेच स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागतो आहे. शेकापक्षानेच सेझमधील अन्यायग्रस्त आणि शेतकर्यांची फसवणूक करणार्या प्रकल्पांना विरोध केला. आता हा टोलनाका उभारला असला तरी त्यातून स्थानिकांना मुक्ती देण्याचे काम शेकापक्षच करणार आहे. यशस्वी आंदोलनाचा हा दिवस नवीन वर्षात प्रवेश करत असताना शेकापक्षाचा सूर्य उगवणारा ठरेल. ज्याप्रमाणे ब्रिटीशांनी या देशातील शेतकर्यांवर जुलूम केला, ज्याप्रमाणे काँग्रेसने जुलूम केला तसाच जुलूम भाजप सरकार करणार असेल तर त्यांना रोखण्याचे काम शेकापक्षच करेल. संपूर्ण महाराष्ट्राल यशस्वी आंदोलन कसे करायचे आणि न्याय कसा मिळवायचा हे दाखवून देणारा हा क्षण आहे. काँग्रेस आणि भाजपच्या राजवटीत सामान्य माणसाला कधी न्याय मिळत नाही. न्याय मिळत नसतो तर तो मिळवावा लागतो हे दाखवण्यासाठी शेकापक्ष आज रस्त्यावर उतरत आहे. हा नवा इतिहास घडत आहे.
बुधवार, ७ जानेवारी, २०१५
भाजपच्या राजवटीत न्याय मिळत नसेल तर, तो मिळवावा लागेल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा