उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. - स्वामी विवेकानंद
..................................................
- प्रत्येक माणसाला आपले ध्येय समजले पाहिजे. ते ध्येय निश्चित केले गेले पाहिजे. आपले नेमके ध्येय काय आहे हे जेव्हा माणसाला समजत नाही तेव्हा तो भरकटत राहतो. यासाठी संपूर्ण जगाला सर्वात महत्त्वाची शिकवण देण्याचेे काम स्वामी विवेकानंदांनी केले. धर्म म्हणजे नेमके काय हे खर्या अर्थाने स्वामी विवेकानंदांना समजले होते. भगवत गीतेत श्रीकृष्णांनी जे अर्जूनाला कर्म, कर्मयोग, स्थितप्रज्ञता याबाबत ज्ञान दिले होते ते सर्वस्वी स्वामी विवेकानंदांच्या अंगात होते. त्यामुळे आज या देशात धर्मांतर, घरवापसी यावरून जो सध्या हैदोस चालला आहे त्या परिस्थितीत स्वामी विवेकानंदांचे विचार आणि शिकवण या देशाला मार्गदर्शक ठरणार आहे.
- स्वामी विवेकानंद हे भारताचे थोर संत व नेते होते. ते थोर तत्ववेत्ते आणि काळाच्या पुढे पाहणारे असे व्यक्तिमत्व होते. विवेकानंद ह्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. रामकृष्ण परमहंस ह्यांचे विवेकानंद हे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. या मिशनच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन, सभ्य संस्कृती, मर्यादा, अभ्यास याचे चांगले शिक्षण आणि संस्कार केले जातात.
- आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे म्हणून केवळ त्यांचे स्मरण करायचे हे अत्यंत चुकीचे आहे. स्वामी विवेकानंदांना, त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला तर विश्वबंधुत्वाचा प्रसार आपोआप होईल. धर्म जात यात अडकलेले राजकारण बाहेर पडेल आणि हा देश एका नव्या विचाराने प्रभावीत होईल.
- कलकत्त्यातील सिमलापल्ली येथे 12 जानेवारी 1863 ला विवेकानंदांचा जन्म झाला.त्यांचे नाव नरेंद्र असे ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कलकत्ता उच्च न्यायालयात (वकील)अॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. हे इथे सांगण्याचे कारण म्हणजे उत्तम विचारांचे आई वडिल हेच आपले अपत्य चांगल्या प्रकारे घडवू शकतात. आपण अनेक गुन्हेगार, कुमार्गी माणसे या जगात पाहतो याचे कारण त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले नसतात. त्यांच्या भोवतीचे वातावरण तसे असते.
- स्वामी विवेकानंद म्हणजे नरेन्द्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्यांनी विशेष आवड दाखवली. विवेकानंदांना शास्त्रीय संगीताची देखील जाण होती. त्यांनीे बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले.
- निरोगी आरोग्य, व्यायाम याकडे विवेकानंदांचे विशेष लक्ष होते तरूणांनी व्यायाम केला पाहिजे, निर्व्यसनी असले पाहिजे असे विवेकानंदांना कायम वाटायचे. किशोरावस्थेपासूनच व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये विवेकानंद सक्रिय सहभाग घेत असत. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्यांनीे लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. जातीव्यवस्था, भेदभावामुळे या देशात भिंती पडतील आणि हा देश दुभंगेल याची चिंता विवेकानंदांना होती. यासाठी कला, क्रीडा व्यायाम आणि निरोगी राहण्याने चांगल्या विचारांची जडणघडण होवू शकते हे विवेकानंदांनी दाखवून दिले होते. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन याचे छंद होते.
- स्वामी विवेकानंदांनी म्हणजे नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी 1871 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. आपल्या शिक्षणाला सुरूवात शाळेपासून नाही तर घरापासून होत असते याची जाणिव त्यांना लहानवयात असताना झाली होती. त्यामुळे आपल्या पालकांसमवेत, कुटुंबियांसमवेत असलेले बालपणचे जीवन ही एक फार मोठी शाळा आहे हे त्यांनी दाखवून दिले होते. ते 1879 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज़ इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. कोणत्याही निष्कर्षापर्यंत येण्यापूर्वी त्या गोष्टीचा सखोल अभ्यास केला पाहिजे हे विवेकानंदांचे विचार होते. अभ्यास करणे, तो अनुभवणे आणि त्याचे सिद्धांतात रूपांतर करणे ही खरी अध्ययनाची पद्धती आहे. ती विवेकानंदांनी अवलंबली होती. 1881 साली ते फाइन आर्ट ची आणि 1884 मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
- नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कान्ट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन या विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सर च्या द एज्यूकेशन या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ ते स्पेन्सर यांच्या संपर्कातही होते. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. 1881-84 मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हसी यांनी विवेकानंदांबद्दल म्हटले होते की नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही. त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते. असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.
- राजा अजितसिंग खेत्री यांनी दि. 10 मे 1893 या दिवशी स्वामीजींना ‘विवेकानंद’ असे नाव दिले. 11 सप्टेंबर 1893 ला अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्युट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. सुरुवातीस थोडे नर्व्हस असूनदेखील त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सात हजारांच्या जमावाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. हा कडकडाट दोन मिनिटे अखंड चालू होता. जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणार्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन ‘भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी’ असे केले. ‘न्यूयॉर्क क्रिटिक’ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्गार देखील त्यांच्या भगव्या वस्त्रात शोभून दिसणार्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत. वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली. भारत हा जगाचा अध्यात्मिक गुरू आहे हे त्यांनी त्याकाळात पुन्हा सिद्ध करून दाखवले होते.
- स्वामीजी हिंदू तत्त्वज्ञानाच्या ‘वेदान्त’ शाखेचे पुरस्कर्ते होते. आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान सांगितले होते. त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळेच ‘शिवभावे जीवसेवा’ हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले. अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे, असे स्वामी विवेकानंदांचे शिकवणे होते.
- कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ती मिळवली पाहिजे. आपले ध्येय निश्चित करण्यासाठी माणसाने जागे झाले पाहिजे. त्यासाठी उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, असा संदेश स्वामींनी जगाला दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा