मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

पराभूत मानसिकता

दुसर्‍यासाठी जे जगतात तेच खर्‍या अर्थाने जिवंत असतात. बाकीचे सारे जिवंत असूनही मेल्यासारखेच असतात.                   - स्वामी विवेकानंद

..................................................
  • भारतीय जनता पक्षाचे पनवेलचे नवहिंदुत्ववादी आमदार प्रशांत ठाकूर  हे निवडणुकीत जिंकले असले तरी मानसिक पराभूत झाले आहेत. त्यामुळे मानसिक पराभूत अवस्थेतून आपण नेमके काय करावे हे त्यांना समजेनासे झाले आहे. या पराभूत अवस्थेत कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावे, कोणत्या गोष्टीला कोणाला जबाबदार धरावे हे समजेनासे झाल्यामुळे त्यांच्याकडून पनवेलचे कोणतेही प्रश्‍न मार्गी लागतील अशी अपेक्षा करता येणार नाही.
  • शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा गाडीत प्रवासादरम्यान डोळे मिटून घेतलेला फोटो त्यांच्या अनधिकृत वाहिनीवरून दाखवून त्यांनी काय मिळवले याचे उत्तर प्रशांत ठाकूर यांनाच द्यावे लागेल. अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे विवेक पाटील यांचे तत्व आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान झोप काढणे यात गैर काय आहे? पण त्याची प्रसिद्धी करून प्रशांत ठाकूर यांनी आपण मानसिकदृष्ट्या पराभूत झाल्याची कबूली दिली आहे. पराभूत मानसिकतेतून जखम मांडीला आणि मलम शेंडीला असा प्रकार त्यांनी चालवला आहे. पण या पराभूत मानसिकतेत त्यांनी कबूल केले आहे की विवेक पाटील झोपून चालणार नाहीत, ते असतील तरच या मतदारसंघाची कामे होतील, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न मिटतील, त्यांनी कामे केली नाहीत तर आपल्याला त्यांचे श्रेय लाटता येणार नाही. आपल्यात काही करण्याची धमक नाही याची ही कबूली आहे. ही खर्‍या अर्थाने प्रशांत ठाकूर यांची पराभूत मानसिकता आहे.
  • पराभूत मानसिकतेतून भरकटलेली अवस्था होते. आज भारतीय जनता पक्षात कसलेही स्थान नसल्यामुळे प्रशांत ठाकूर यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. भाजपमध्ये जी काही पदे दिली जात आहेत ती फक्त प्रामाणिक माणसांनाच, निष्ठावंतांनाच दिली जात आहेत. प्रामाणिकपणा आणि निष्ठा हे शब्द प्रशांत ठाकूर- राम ठाकूर यांच्या शब्दकोषातही असण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे मंत्रिपद मिळेल, राज्यमंत्रीपद मिळेल, महामंडळ मिळेल या वासावर असलेल्या पितापुत्रांना भाजपच्या नेत्यांनी चांगल्याच वाटाण्याच्या अक्षदा दिल्या आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले तरी जनतेची कामे करण्याची इच्छा आणि कल्पकता प्रशांत ठाकूर यांच्याकडे दिसत नाही.  त्यामुळे नसत्या उठाठेवी करत कुठलेही फोटो दाखवून आपले समाधान करून घेत आहेत.
  • टोलनाका प्रश्‍न अंगलट आल्याने प्रशांत ठाकूर यांचा धीर सुटत चालला आहे. पितापुत्र रस्त्यावर आडवे पडले तरी त्यांच्या आंदोलनाची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. तर भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी प्रशांत ठाकूर यांना बेदखल करत बिनधास्त टोल सुरू केला. या टोलनाका विरोधात शेतकरी कामगार पक्षाने आंदोलन करून सरकारला धडकी भरली. आज शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आक्रमक झाला आहे. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे ठराविक मुदतीत हा टोल बंद झाला नाही, स्थानिकांना यातून टोलमाफी मिळाली नाही तर शेतकरी कामगार पक्ष हा टोलनाका उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाही. सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी रक्त सांडण्याची वेळ आली तरी बेहत्तर अशी भूमिका शेकापने घेतल्यामुळे पितापुत्रांना धडकीच भरली आहे. ही हिंमत आपल्यात नाही याची जाणिव प्रशांत ठाकूर यांना झाल्यामुळे मानसिक पराभवत्व त्यांना सतावत आहे. निवडून येवोत न येवोत पण विवेक पाटील, बाळाराम पाटील हेच पनवेलकरांचे नेते आहेत हे इथल्या जनतेने मान्य केल्यामुळे प्रशांत ठाकूर बिथरले आहेत. या मानसिक पराभवातून ते कशाचाही राग कशावरही काढत आहेत. त्यामुळे  निवडून न येताही विवेक पाटील- बाळाराम पाटील हे जिंकले आहेत. तर पराभूत मानसिकतेचे प्रशांत ठाकूर वडाचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार करीत आहेत.
  • प्रशांत ठाकूर यांची समस्या आहे ती त्यांनी स्वत:च ओढवून घेतलेली आहे. वारंवार पक्ष बदलण्यामुळे कोणीही निष्ठावंत नेता आणि कार्यकर्ता त्यांना जवळ करत नाही. अशा परिस्थितीत पराभूत झालेले हे आमदार मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. त्यांच्या सल्ल्यानूसार कुठलेही फोटो ेदाखवून आपल्या अकलेचे दिवाळे काढत आहेत.
  • प्रशांत ठाकूर यांनी टोलविरोधात चार महिन्यांपूर्वी केलेले आंदोलन हे नाटकी होते, स्वार्थापोटी केलेले होते याची जाणिव मतदारांना झाल्यामुळे  प्रशांत ठाकूर यांना भिती वाटत आहे. या भितीपोटी मी जागा आहे आणि विवेक पाटील झोपले आहेत हे सांगण्याचे बावळटपणाचे प्रकार करीत आहेत. पराभवाने खचलेला माणूस भरकटतो आणि चुकीचे पावले टाकतो, चुकीच्या माणसांच्या सानिध्यात राहून योग्य माणसांकडे दुर्लक्ष करतो तो प्रकार प्रशांत ठाकूर करीत आहेत. निवडणूकीत विजय मिळाला नाही तरी विवेक पाटील यांनी आपला संयम आणि विवेक सोडलेला नाही. विजयी मुद्रेनेच ते दुसर्‍या दिवसापासून कामाला लागले आहेत. आज टोल विरोधात त्यांनी उभे केलेले आंदोलन विजयी नेत्याचे आंदोलन आहे. परंतु मानसिक पराभूत झालेल्या प्रशांत ठाकूर यांनी दोन महिन्यात काय केले हे विचारले तर त्यांना सांगताही येणार नाही.
  • काँग्रेस सोडण्यासाठी काहीतरी निमित्त हवे होते त्यामुळे टोलचा मुद्दा पुढे करून प्रशांत ठाकूर यांनी नौटंकी केली. आगामी काळात काँग्रेस सत्तेवर येणार नाही, काँग्रेसमधून निवडून येण्याची शक्यता नाही याची खात्री पटल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी प्रशांत ठाकूर यांना उल्लू बनवले. कारण प्रशांत ठाकूर यांनी टोल नाका रद्द करण्याचे आश्‍वासन सर्वांना दिले होते. हा टोलनाका रद्द होण्याची शक्यता नाही म्हटल्यावर प्रशांत ठाकूर बिथरले. टोलनाका रद्द होत नाही म्हणून आपण काँग्रेसचा राजीनामा देत आहोत असा बहाणा केला आणि टोलनाका रद्द करण्यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करीत आहोत असा बहाणा केला. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी उल्लू का भाई मशालजी या न्यायाने प्रशांत ठाकूर यांच्या माकडउड्यांचा खेळ केला. भाजपला काही करून संख्याबळ हवे होते. त्यामुळे नितीन गडकरींनी देवून टाकले आश्‍वासन की हा टोल बंद करू. जो खेल हमने शुरू किया है उसे खतम करना हमारी जिम्मेदारी है अशी डायलॉगबाजी करत प्रशांत ठाकूर यांना भाजप नेत्यांनी  आश्‍वासन दिले. त्यानंतर मात्र भाजप नेत्यांनी पूर्णपणे प्रशांत ठाकूर यांना बेदखल केले. आता शिवसेनेशी हातमिळवणी करून बहुमत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांच्यासारखा एखादा राजीनामा देवून गेला तरी काही फरक पडत नाही हे फडणवीस यांनी जाणले आणि न्यायालयाचा आधार घेत टोलनाका सुरू केला. आता हो टोलनाका लादल्यामुळे प्रशांत ठाकूर यांचा नैतिक पराभव झालेला आहे. या मानसिकतेतून प्रशांत ठाकूर यांना काय करावे हे समजेनासे झाले आहे. परिणामी त्यांचा तोल सुटत आहे. टोलनाक्याच्या प्रश्‍नावरून काँग्रेस सोडलीत. टोलसाठी आमदारकीचा राजीनामा देत आहोत असा बहाणा करून सहानुभूती मिळवलीत. आता  टोल सुरू केला आहे तर भाजपचा राजीनामा का देत नाही असा सवाल पनवेलकर करीत आहेत. त्यामुळे मानसिक पराभवाने खचलेले प्रशांत ठाकूर असे काहीतरी उद्योग करत आहेत. विवेक पाटील हे दुसर्‍यांसाठी जगणारे नेते आहेत. त्यामुळे निवडून आले नाहीत तरी तेच पनवेलकरांचे नेते आहेत. परंतु निवडून येवूनही प्रशांत ठाकूर हे स्वत:साठी, ठेके मिळवण्यासाठी आमदार झाले आहेत, त्यामुळे ते पराभूत नेतेच आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: