मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

भगवी वस्त्र परिधान करून कोणी संत होत नाही

माणसे- खरी माणसे हवी आहेत. त्यानंतर  सर्वकाही आपोआपच प्राप्त होईल. आपल्याला पाहिजे आहेत सामर्थ्यशाली, तेजस्वी, आत्मविश्‍वास असलेले तरूण. असे शंभर जरी युवक मिळाले तरी जगात खरोखरची क्रांती होवून जाईल.                                                               - स्वामी विवेकानंद..................................................

  • नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये असलेले हिंदुत्ववादी नेते सध्या काय वाटेल ते बोलत आहेत. हे जे साधू, बाबा, साध्वी मोदींनी जवळ केले आहेत ते हिंदूधर्माचा आदर नाही तर बदनाम करत आहेत. या सगळ्यांना हिंदूधर्म म्हणजे नेमके काय आहे हे समजावून सांगण्याची गरज आहे. तो सांगण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचारच शिकवण्याची गरज आहे. स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती अशा विभूतींनी धर्म कल्पनेला छेद देत विश्‍वबंधुत्वाची आणि आधुनिकतेची शिकवण दिली होती. ही परंपरा आपल्याकडे असताना स्वामी, महाराज म्हणून सरकारमध्ये प्रतिनिधीत्व करणार्‍यांनी वाटेल ते बोलणे हे हिंदू धर्माला हानीकारक आहे. याकडे मोदींनी लक्ष दिले पाहिजे.
  • आपल्याकडे दर वर्षी स्वामी विवेकानंद यांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. पण त्यांचे विचार या थोंतांड मांडलेल्या  नेत्यांना शिकवण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. आज या साक्षी महाराजांकडे पाहिल्यावर स्वामी कोणाला म्हणायला पाहिजे हे सांगण्याची वेळ आलेली आहे. विवेकानंदांच्या जयंतीचे निमित्ताने शिकागो सर्वधर्म परिषदेतील ऐतिहासिक भाषणाचे स्मरणही केले जाते. भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांची विजय पताका स्वामीजींनी विदेशात फडकवली. परिणामी, भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा अधिक प्रबळ झाली. पण यापलिकडे जावून स्वामीजींना समजावून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. केवळ भगवी वस्त्र परिधान करून कोणी हिंदू होत नसतो. हिंदुत्ववादी विचारधारा  समजण्यासाठी चांगले विचार अंगिकारणे महत्त्वाचे असते. पण साक्षी महाराजांसारख्या उथळ नेत्यांमुळे हा धर्म बदनाम होत आहे हे नरेंद्र मोदींनी लक्षात घेतले पाहिजे. हिंदू धर्मातील संत महंतांबाबत घृणा निर्माण करणारा प्रकार या मोदींच्या सहकार्यांकडून होत आहे हे मोदींनी लक्षात घेतले पाहिजे. अशा लोेकांमुळे मोदींना सातत्याने माफी मागावी लागणे हे सरकारच्या हिताचे नाही.
  • खरे धर्माचे अभ्यासक आणि संत म्हणजे स्वामी विवेकानंदच. अमेरिकेला जाण्यापूर्वी स्वामी विवेकानंदांनी तीन वर्षांच्या कालावधीत संपूर्ण भारत फिरून पाहिला होता. याच कालावधीत ते मुंबईतही आले होते. त्या काळात मुंबई पूर्णपणे इंग्रजाळलेली होती. तरीही देशाच्या स्वातंत्र्याची स्पंदने मुंबईत जाणवायची. 1885 मध्ये मुंबईतच अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना झाली होती. देशी राजेरजवाडे यांची मुंबईत सतत लगबग असायची. तसे पाहायला गेले तर इंग्रजी जाणणार्‍या नेत्यांचे केंद्र मुंबई हेच होते. मुंबईतील घडामोडींची चर्चा सार्‍या देशभर होत असे. म्हणूनच आपल्या देशासंबंधी, देशाच्या समस्यांसंबंधी चिंतन असणारा प्रत्येक नेता, बुद्धिवंत यांना मुंबईचे आकर्षण असायचे. मुंबईत येवून संपूर्ण देशभरातील रूढी, परंपरांची माहिती होत असे. या रूढी परंपरांमधील कुप्रथा कोणत्या आहेत याचे आकलन स्वामी विवेकानंदांना झाले होते. ते बाहेर पडले होते ते देश जाणून घेण्यासाठी. माणूस जाणून घेण्यासाठी.
  •  ऑगस्ट 1892 मध्ये विवेकानंदांचे मुंबईत पहिल्यांदा आगमन झाले होते. 1886 मध्ये रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले होते. त्यांचा उत्तराधिकारी म्हणून विवेकानंद प्रस्थापित झाले होते. भगवे वस्त्र परिधान करून भारतभ्रमणासाठी ते बाहेर पडले होते. याच काळात तत्कालीन मध्य प्रदेशातील खंडवा या नगरात विवेकानंद पोहोचले होते. 
  • खंडवा यात्रेच्या काळातच स्वामीजींच्या मनात मुंबईची यात्रा करण्याची इच्छा जागृत झाली होती. खंडवा येथे त्यांचा निवास एका बंगाली गृहस्थाकडे होता. त्या बंगाली गृहस्थाने स्वामीजींची मुंबई यात्रा सुकर केली. त्यांनी मुंबईतील सुप्रसिद्ध बॅरिस्टर रामदास छबिलदास यांच्या नावे शिफारस पत्र लिहून दिले. स्वामीजी खंडवाहून मुंबईस पोहोचले. रामदासजी यांच्याकडेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था होती. स्वामीजी या दौर्‍यामध्ये अनेक लोकांना भेटले आणि देशासमोरील समस्यांवर चर्चा केली. त्यांचा अधिक संपर्क आला तो शास्त्री आणि पंडितांशीच. स्वामीजी अधिककरून भारतीय तत्त्वज्ञानावरच चर्चा करत होते.
  • आज मोदी सरकारमध्ये असलेले किती स्वामी, महाराज जनतेच्या प्रश्‍नांवर चर्चा करतात? लोकसंख्या वाढवणे, आपल्या धर्मियांची संख्या वाढवणे, घर वापसी, धर्मांतर या पलिकडे हा देश आहे की नाही? धर्माला धर्माने उत्तर द्यायचे आणि त्यातून परस्परांमध्ये द्वेष निर्माण करण्याचे राजकारण हे साक्षी महाराजांसारखे नेते करत असतील तर मोदींनी त्यांना दूर ठेवले पाहिजे. प्रत्येक महिलेने चार मुलांना जन्म द्यावा असे सांगून हे साक्षी महाराज महिलांचा अवमान करत आहेत. महिला म्हणजे मुलांना जन्म देणारी यंत्र आहेत असे या महाराजांना वाटते काय? त्यामुळे आज खरे साधू संत, तत्वज्ञानी कोण हे सांगण्याची वेळ आली आहे. स्वामी विवेकानंदांसारखे वैराग्यातून सुधारणावादी स्वामीच या देशाला वाचवू शकतील.
  • स्वामी विवेकानंदांंचे इंग्रजी भाषेवर  जबरदस्त प्रभुत्व होते. त्यामुळे अनेक तत्कालीन नेत्यांशी त्यांचा संवाद झाला. स्वामीजींना वाटायचे की, जोपर्यंत भारतीय जनता आपली संस्कृती आणि तत्त्वज्ञानाबद्दल जागरूक होणार नाहीत, तोपर्यंत त्यांना आधुनिक जगात आपले स्थान निर्माण करणे शक्य नाही. भारताचे स्वातंत्र्य आणि प्रगतीचा आधार भारतीय चिंतन आणि तत्त्वज्ञानच असला पाहिजे. आज याचीच उणिव जाणवते आहे. जे सव्वाशे वर्षापूर्वी स्वामींनी सांगितले होते, ज्याची चिंता व्यक्त केली होती तेच आज चित्र दिसते आहे.  
  • त्या काळी भारतामध्ये बालविवाहाची प्रथा बोकाळली होती. बालविवाह ही एक कुप्रथा आहे, याविषयी सगळे सहमत असले, तरी त्यास विरोध करण्याचे धाडस फारच कमी लोकांमध्ये होते. स्वामीजींनी विद्वानांच्या सभेमध्ये या कुप्रथेवर आपले क्रांतिकारी विचार व्यक्त केले होते. त्यांच्या या विचाराने सारेच प्रभावित झाले होते. भविष्यातील समाजसुधारक म्हणूनच हे विद्वान स्वामीजींकडे पाहत होते. स्वामीजींनी आपल्या भाषणामध्ये आपल्या बहिणीची करुण कहाणी ऐकवली होती. उपस्थितांचे हृदय हेलावले होते. हे कशासाठी त्यांनी केले होते? बालविवाह झाला की कमी वयात गरोदरपण होते, जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला जातो. त्या स्त्रियांचा कमी वयात मृत्यू होत असे. हे सगळे सव्वाशे वर्षांपूर्वी आधुनिक विचार मांडून स्वामी विवेकानंदांनी त्याविरोधात आवाज उठवला होता. असे असताना आज मोदींचे स्वामी, महाराज पुन्हा जुन्या संकुचित काळात घेवून जात आहेत.
  • स्वामीजी मुंबईत तीन आठवडे राहिले. मुंबईहून ते पुण्याला निघाले. पुण्याला जाण्यासाठी ज्या आगगाडीमध्ये स्वामीजी होते, त्याच डब्यात चार-पाच मराठी युवकही होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे या विषयावर त्या युवकांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. स्वामीजी या चर्चेपासून स्वतःला दूर ठेवू शकले नाहीत. त्यांनी इंग्रजीतून बोलायला सुरुवात केली, तेव्हा मराठी युवक चकित झाले. हा भगवाधारी साधू इतक्या प्रभावीपणे इंग्रजी बोलू शकतो याचे त्यांना अप्रूप वाटू लागले. भगव्या वेषातही या देशाची सेवा करण्याची, सुधारणा करण्याची वृत्ती स्वामी विवेकानंदांमध्ये होती. पण आज भगवी वस्त्रे धारण करायची आणि काहीही फालतू उपदेश करायचे, असा प्रकार आहे. असले उपदेश करण्याचा अधिकार यांना कोणी दिला हे विचारण्याची आज गरज आहे.  
  •  त्या काळात केवळ मुंबईतच नव्हे, तर सबंध भारतामध्ये वैचारिक स्तरावर स्वामी दयानंद सरस्वती यांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळेच जेव्हा मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना झाली, त्यानंतर खर्‍या अर्थाने मुंबईत स्वातंत्र्य चळवळीला गती मिळाली. सतीची चाल बंद झाल्यानंतर भारतात बालविवाह या विषयावरही चिंतन सुरू झाले होते. बालविवाह थांबवण्यासाठी आर्य समाजाने देशव्यापी आंदोलन छेडले होते. आर्य समाजाने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. देशात एक उदारमतवादी समाज निर्माण करण्यात स्वामी दयानंद सरस्वती यांचे मोठे योगदान राहिले आहे. असे स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद यांच्यासारखे पुरोगामी विचारांचे तत्वज्ञानी आपल्या भारतात असताना, त्यांचे विचार असताना या साक्षी महाराजांसारख्या उथळ माणसांना पक्षात एवढे मोठे स्थान का दिले जाते याचा विचार आता मोदींनी करायचा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: