गेली साडेचार वर्षे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. या युद्धात भाजपने नेहमीच कुरघोडी करत आपले वर्चस्व दाखवून दिले. विशेषत: राज्यात झालेल्या १० महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदांमध्ये भाजपने केलेली कामगिरी शिवसेनेचे नाक ठेचणारी होती. त्यामुळेच आज युती जाहीर झाल्यानंतर भाजपचा सामान्य कार्यकर्ता अस्वस्थ आहे.सारं काही चांगलं चाललेलं असताना भारतीय जनता पक्षाला काय म्हणून शिवसेनेशी युती करण्याची दुर्बुद्धी सुचली असा प्रश्न आज महाराष्ट्रात विचारला जातो आहे. याचे कारण युतीचा धर्म पाळण्यात शिवसेना ठाम नाही. शिवसेनेवर असा विश्वास दाखवणे हा भाजपचा आत्मघातकीपणा ठरेल असेच मतदारांना वाटत आहे. याचे कारण या पूर्वीचा अनुभव तसा आहे. भारतीय जनता पक्षाचा वरून आदेश आला की, तळागाळातला कार्यकर्ताही निष्ठेने ते काम करतो. शिवसेनेला मतदान करतो, सेनेबरोबर राहतो. पण शिवसेना मात्र युती झाली तरी स्थानिक पातळीवर उणी-दुणी काढून, मानापमानाचे नाटय़ करून भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करत नाहीत. किंबहुना पाडापाडीचे राजकारण करतात, हे अनेकवेळा दिसून आलेले आहे. म्हणूनच ही झालेली युती भाजप कार्यकर्त्यांसाठी चिंतेची ठरत आहे. ही युती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन, मुंडे यांच्या काळातील युती नाही, तर निष्क्रिय पक्षप्रमुखांसोबतची युती ही अभद्र आहे.या युतीमुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, अहमदनगरसारख्या महापालिका निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये परस्पर झुंजी लावण्याचे राजकारण झाले. त्यात सेना-भाजप नेत्यांनी पररस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यामुळे स्थानिक पातळीवर वैरभावही वाढीस लागला. आता मतविभागणीची भीती वाटते म्हणून राज्य पातळीवर युती करण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला. शेजारी राहणारे, गावपातळीवरचे कार्यकर्ते, भाऊबंदकीत अडकले, वैरी झाले; पक्षासाठी भांडत राहिले आणि त्या मानापमानाचा कसलाही विचार न करता युती जाहीर केल्याने ही दुखावलेली मने सहजासहजी सांधली जातील, अशी अपेक्षा कशी करता येईल?आमच्या एका प्लंबर मित्राने याबाबत छान उदाहरण दिले. भाजप हा दोन इंची नळ होता, तर शिवसेना अर्धा इंची नळ होता. आता दोन्ही नळातून सारखेच पाणी सोडायचे आहे. दोन इंची नळातून धो-धो पाणी सोडण्याची क्षमता असलेल्या भाजपला आपला प्रवाह रोखावा लागला आहे. शिवसेना अर्धा इंची नळातून अर्धा इंची पाणी सहज सोडेल, पण भाजपच्या दोन इंची नळात पाण्याची धार अर्धा इंची असल्यामुळे पाणी वेगाने वाहणार नाही की वर चढणार नाही. युती करून आपले पाणी कमी दाबाने सोडण्याचे काम भाजपने केलेले आहे. हे उदाहरण एकदम पटेल असेच आहे.खरा प्रश्न आहे विधानसभेचा. विधानसभेतील सेना-भाजपचे २०१४ चे संख्याबळ पाहता भाजपला फार मोठा त्याग करावा लागणार आहे. हा त्याग करून भाजपने आत्मघात केलेला आहे असेच दिसून येते. २०१४ ला भारतीय जनता पक्षाने स्वबळावर २६० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, तर १२२ जागा त्यांनी जिंकल्या होत्या. या निवडणुकीत शिवसेनेने २८२ जागांवर निवडणूक लढवून ६३ जागांवर विजय मिळवला होता. आता जागा वाटपात दोघांनी समसमान म्हटल्यावर मित्रपक्षांना सोडलेल्या जागा वगळता दोघांना १३५ किंवा १४० जागा आल्या, तर भाजपला फक्त १३ ते १८ जागा जास्तीच्या मिळतात. शिवसेनेला त्यामानाने ७५ च्या आसपास जागा जास्त लढवायला मिळतात. त्यामुळे संख्याबळ वाढवायला शिवसेनेला जास्त संधी आहे आणि भाजपने ती संधी गमावली आहे असेच म्हणावे लागेल. सेना आणि भाजप विद्यमान संख्याबळ टिकवून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा ओढतील हे स्वप्न पाहणे सोपे नाही. त्यामुळे भाजपने शंभर मार्काचा पेपर सोडवण्याची क्षमता असताना ४५ मार्काचा पेपर सोडवून काठावर पास होण्याचा ठेका घेतला आहे, असेच म्हणावे लागेल.मागील विधानसभा निवडणुकीत १२२ जागांसह सत्तेवर आलेला भारतीय जनता पक्ष हा काही शंभर टक्के भाजप नाही. त्यात आयात नेते खूप आहेत. सरभेसळ खूप आहे. त्यामुळे भाजपमधील मूळ प्रवाह पाहता संधी डावलली जाण्याच्या मुद्यावरून भाजपमध्ये मोठी बंडखोरी होऊ शकते. काँग्रेस-राष्ट्रवादीमधून आलेले ‘भाजपेयी’ जर युतीतील जागा वाटपात एखादा मतदारसंघ सेनेकडे गेला, तर बंडखोरी करणार हे निश्चित. आज भाजपचे असलेले १२२ आमदारांचे मतदारसंघ आणि शिवसेनेचे ६३ मतदारसंघ ‘जैसे थे’ ठेवण्यात येतील, असा कोणताच फॉर्म्युला चर्चेत आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेला जागा वाटपात भाजपच्या १२२ पैकी काही जागा हव्याशा वाटल्या, तर तिथे बंडखोरी निश्चित आहे. त्यामुळे भाजप-सेनेची युती १२२ अधिक ६३ या विद्यमान मतदारसंघ सोडून उर्वरित ठिकाणच्या म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी, इतर यांच्या मतदारसंघासाठी झाली आहे का, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. असे असेल तर शिवसेनेच्या वाटय़ाला जास्तीत जास्त पराभूत मतदारसंघ येतील. २०१४च्या निवडणुकीत न जिंकलेल्या जागांवर वर्चस्व मिळवण्यासाठी त्या मतदारसंघांपुरते एकत्र येण्याची ही युती आहे, असे म्हणता येणार नाही. कारण अशा मतदारसंघांतून म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी प्रबळ आहे, रायगडात काही ठिकाणी शेकाप प्रबळ आहे, विदर्भ-मराठवाडय़ात काँग्रेसचा प्रभाव आहे, अशा मतदारसंघात सेना-भाजपने एकत्रित निवडणुका लढवल्या तरी तिथे नेमके उमेदवार मिळवण्यात आणि पराभवासाठी निवडणूक लढवून शक्तिप्रदर्शन करण्याची मानसिकता शिवसेनेची नसणार. त्यामुळे भाजपने जिंकलेल्या मतदारसंघात घुसखोरी करून भाजपच्या मतदारांचा फायदा उठवायचे धोरण शिवसेना आखणार. त्यामुळे भाजपची ताकद कमी होणार हे निश्चित. जेव्हा स्वबळावर भाजप १२२ पर्यंत पोहोचतो तेव्हा जागा वाटपात त्यांना तो आकडा परत मिळवता येणार नाही, यासाठीच शिवसेना प्रयत्न करणार. किंबहुना भाजपचा आकडा दोन अंकी राहील यासाठी शिवसेना प्रयत्न करणार. त्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेना भाजपला मतदान करेल याची शाश्वती नाही. असे प्रकार गेल्या २५ वर्षात अनेकदा घडलेले आहेत. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात हे प्रकार घडताना दिसले आहेत.सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला गेला होता तेव्हा हिंदुराव नाईक-निंबाळकर हे शिवसेनेकडून उभे होते. काँग्रेसच्या प्रतापराव भोसले यांचा त्यांनी १२ हजार मतांनी तसा निसटता पराभव केला होता. हिंदुराव नाईक-निंबाळकरांसाठी भाजपने रक्ताचे पाणी करून विजय खेचून आणला. पण भाजपचे उमेदवार असलेल्या त्याच लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपला साथ दिली नव्हती. त्यामुळे पुढच्याच निवडणुकीत हिंदुराव नाईक-निंबाळकरांना पराभव पत्करावा लागला होता. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रभावाने २००१ची नगरपालिका निवडणूक भाजप पुरस्कृत सातारा विकास आघाडीने एकहाती जिंकली होती. थेट मतदानाने नगराध्यक्षही भाजपचा झाला होता. यावेळी उदयनराजे यांच्या या पॅनलचे मताधिक्क्य पाहता २००४ च्या निवडणुकीत उदयनराजे किमान २० हजार मतांनी विजयी होणे अपेक्षित होते. पण उदयनराजेंसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही. भारतीय जनता पक्षात असलेल्या उदयनराजे यांना मोठा पराभव पत्करावा लागला. हा फरक शिवसेनेच्या मतांचा होता.कराड लोकसभा मतदारसंघ असतानाही कराडमधून कृष्णा कारखान्याचे जयवंतराव भोसले भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून उभे होते. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना पराभूत करण्याची त्यांच्यात ताकद होती. काँग्रेसचा एक फार मोठा गट जो पी. डी. पाटील यांच्या हातात होता. तो पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात होता. विलासराव पाटील उंडाळकरांचा गट पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात होता. या पार्श्वभूमीवर भाजप-सेनेचे उमेदवार जयवंतराव भोसले विजयी होणे अपेक्षित होते. पण शिवसेनेने ऐनवेळी काँग्रेसला मदत केली आणि जयवंतराव भोसले यांना पराभव पत्करावा लागला. असा प्रकार शिवसेनेने सातत्याने केलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जीव तोडून युतीचा धर्म पाळतात पण शिवसेना पाठीत खंजीर खुपसते. कोकणात भाजपचे विनय नातू यांचे गुहागरमध्ये चांगले बस्तान होते. पण जागा वाटपात रामदास कदम यांच्या हट्टापायी तो मतदारसंघ भाजपने शिवसेनेला दिला आणि आपला एक निष्ठावंत आमदार घालवला. जनतेत मिसळणारे आमदार विनय नातूंची उमेदवारी मिळवून रामदास कदम यांना तेथून विजयी होता आले नाही. तिथे राष्ट्रवादीचा विजय झाला. असे प्रकार शिवसेनेने या पूर्वी अनेकदा ठिकठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे ही युती करून भाजपने आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतली आहे.या युतीचा फायदा शिवसेना उठवणार आणि ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ असा प्रकार करणार. पण त्याचवेळी भाजपचे उमेदवार पाडण्याचे गलिच्छ राजकारण शिवसेना करणार. कारण असे प्रकार त्यांनी सातत्याने केलेले आहेत. म्हणूनच भाजपला काय दुर्बुद्धी झाली आणि शिवसेनेशी युती करायची अवदसा आठवली, असा प्रश्न भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांला पडला आहे. त्यामुळे भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. शिवसेनेच्या या पाडापाडीच्या राजकारणाचे आपण बळी होणार हे वास्तव भाजप कार्यकर्ते आणि उमेदवारापुढे नाचत आहे.