पावसाळा सुरू झाल्यावर भूछत्र किंवा कुत्र्याच्या छत्र्या उगवतात. तसाच प्रकार निवडणुकीच्या तोंडावर काही दुकाने सुरू होतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे अण्णा हजारेंचे उपोषण. गेल्या काही वर्षापासून वार्षिक जत्रा किंवा नवरात्र असावे त्याप्रमाणे काही ना काही कारणाने उपोषण सुरू करायचे आणि आपले महत्त्व वाढवून घ्यायचे याचा नादच अण्णा हजारेंना लागलेला आहे. आताही गेल्या आठवडय़ापासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आणि सरकारला नमवायचा प्रयत्न केला आहे. अर्थात अण्णांच्या आंदोलनाला ना आता पूर्वीची धार आहे, ना लोकांना त्यांच्याबद्दल आत्मीयता राहिलेली आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशी आपल्याकडे म्हण आहे. तशी सतत भुणभुण करणा-या आणि किरकि-या म्हाता-याला जशी घरातली माणसे कंटाळतात आणि दुर्लक्ष करतात तशीच आता अण्णा हजारेंची अवस्था झालेली आहे. आपल्याकडे कोणीच आता त्यांची फार दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे अण्णा हजारेंचे पित्त खवळताना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांना मी कसा नमवू शकतो, सरकार माझ्यापुढे कसे गुडघे टेकते आहे, हे दाखवण्यात त्यांना अधिक रस आहे.विशेष म्हणजे अण्णांची ही आंदोलनाची नाटके निवडणुकीच्या तोंडावर सुरू होतात. म्हणजे कोणी विरोधक सरकारविरोधात सुपारी देऊन अण्णांचा हा इव्हेंट ऑर्गनाईज करते की काय असा प्रश्न पडतो. सरकारविरोधात हवा तयार करण्याची मी सुपारी घेत असल्याचे अण्णा हजारे दाखवून देत असतात. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनात कितपत खरेपणा आहे हे दिसून येते. अण्णांनी नुकतेच एक विधान या आंदोलनाच्या दरम्यान केले होते. ते म्हणजे, जनतेचा विरोध पत्करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करीत आहेत, असे मी म्हटले होते. त्यांना अनेक वेळा सांगून पाहिले; परंतु एका वर्षात लोकायुक्तांची नेमणूक होऊ शकली नाही. त्यामुळे ते माझ्या मनातून उतरले आहेत. कोणाच्याही सभ्यतेची, सुसंस्कृतपणाचे प्रमाणपत्र अण्णांनी दिल्यावर तो उमेदवार, नेता पवित्र होतो असे अण्णांना वाटते. अण्णांचे कार्यकर्ते निवडणुकीच्या सुमारास असे महाराष्ट्रभर फिरत असतात. आम्हाला पाच लाख रुपये द्या म्हणजे हा नेता भ्रष्ट नाही, असे अण्णांच्या सहीचे पत्र देतो, असे बिनदिक्कतपणे दुकानदारी करत अण्णांचे कार्यकर्ते फिरत असतात. विशेष म्हणजे एखाद्या उमेदवाराने त्याला नकार दिला की ते कार्यकर्ते विरोधी उमेदवाराकडे जातात.२००९च्या निवडणुकीत पनवेलमध्ये शेकापक्षाच्या उमेदवाराकडे अण्णांचे कार्यकर्ते गेले. पाच लाख रुपये द्या, तुम्हाला स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र देतो, असे त्यांनी सांगितले. शेकापक्षाच्या उमेदवाराने त्याला नकार दिल्यावर तोच अण्णांचा कार्यकर्ता काँग्रेसच्या उमेदवाराकडे गेला. काँग्रेसच्या उमेदवाराने ते प्रमाणपत्र विकत घेतले. त्याच्या प्रती काढल्या आणि अण्णांचे प्रमाणपत्र मिळाले, स्वच्छ चारित्र्याचा नेता असा दिंडोरा पिटत निवडणूक जिंकली. असा प्रकार अण्णांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केला होता. त्यामुळे अशा अण्णांच्या आंदोलनाला कितपत महत्त्व द्यायचे आणि त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे.आता लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रसिद्धीसाठी हपापलेल्या अण्णांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, लोकपाल आंदोलनामुळे केंद्र तसेच राज्य सरकारला सत्तेवर येण्याची संधी मिळाली. ज्या जनतेच्या आंदोलनामुळे तुम्हाला सत्ता मिळाली त्यांच्याशीच तुम्ही गद्दारी करायला लागले आहात का? जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवायचे सोडून त्यांच्याविरोधात वागत आहात. भाजपचे नेते अरुण जेटली, सुषमा स्वराज सत्तेवर येण्यापूर्वी लोकसभेत काय बोलत होते, हे जनता विसरली नाही. सत्तेवर आल्यावर मात्र ते गप्प बसले आहेत, काहीच बोलायला तयार नाहीत. ज्या लोकपाल-लोकायुक्त आंदोलनामुळे सत्ता मिळाली, त्या लोकपालांचीच त्यांना अॅलर्जी झाली आहे. दिलेला शब्द न पाळण्यात काँग्रेसने डॉक्टरेट केली आहे, तर भाजपने ग्रॅज्युएशन केले आहे. गेल्या पाच वर्षापासून सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोपही हजारे यांनी केला. डॉक्टरेट आणि ग्रॅज्युएशनमध्ये डॉक्टरेट मोठी असते हे सांगून भाजप म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ आहे हे सांगत अण्णांनी अप्रत्यक्षपणे भाजपला सर्टिफिकेट दिलेले आहे. वास्तविक अण्णांच्या मागण्या मान्य केल्याचे सरकारने अगोदरच सांगितले आहे. तरीही अण्णा म्हणतात की, मागण्या मान्य केल्या असे सांगणे ही जनतेची दिशाभूल आहे. मागण्या मान्य झाल्या असत्या, तर मी कशाला उपोषण सुरू ठेवले असते? सर्व माध्यमांसमोर मंत्री गिरीष महाजन यांनी अण्णांना भेटून सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. तरीही अण्णांनी आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत असाच सूर आळवायला सुरुवात केली होती. केवळ मुख्यमंत्री मला भेटायला आले पाहिजेत या हट्टापायी त्यांनी आंदोलन पुढे सुरू ठेवल्याचे दिसत आहे.अण्णांच्या आंदोलनाचा फायदा २०१४ ला भाजपला झाला, असा दावा अण्णा करत असले तरी त्यात फारसे तत्थ नाही. अण्णांच्या आंदोलनाचा फायदा उठवला तो अरविंद केजरीवाल यांनी. आम आदमी पार्टीच्या माध्यमातून तो त्यांनी लाभ उठवला. तेव्हा आपल्या हातात काहीच लागले नाही म्हणून आता अण्णा ओरडत आहेत, हे वास्तव आहे. केजरीवाल यांना अण्णांमुळे ओळख मिळाली. पण तेच केजरीवाल आता अण्णांना टाळत आहेत. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धीस भेट देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र ठोस प्रस्ताव असेल तरच या, केवळ चर्चा करण्यात अर्थ नाही, असे आपण त्यांना कळवल्याचेही अण्णा हजारेंनी सांगून टाकले. ज्या माणसाचा लोकशाहीच्या कार्यपद्धतीवर विश्वास नाही आणि अण्णांनी सांगितल्याबरोबर लगेच झाले पाहिजे या हुकूमशाही प्रवृत्तीला खतपाणी घातले जाते त्याला कितपत महत्त्व द्यायचे हे लक्षात घेतले पाहिजे. अण्णांना जर खरोखरच आंदोलन करायचे होते, तर त्यांनी गेल्या चार वर्षात ही मागणी का केली नाही आणि निवडणुका आल्यावरच त्यांना का हे सुचते आहे हा खरा प्रश्न आहे.
गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१९
अण्णांच्या आंदोलनाचे नाटक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा