सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात छोटा भाऊ, मोठा भाऊ म्हणजे नेमके कोण याबाबत चर्चा सुरू आहे. आपल्यापेक्षा लहान भाऊ मोठा झाला, तर त्याचे श्रेष्ठत्व मानण्याची प्रवृत्ती राजकारणात नसते, हेच या राजकीय भाऊबंदकीतून बघायला मिळते. पण यामध्ये छोटा भाऊ आणि मोठा भाऊ यांचे अन्य भाऊ आहेत. त्या भावंडांच्या हातातच आता या छोटय़ा आणि मोठय़ा भावांचे छोटेपण आणि मोठेपण अवलंबून आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दोनच दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते की, महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीत आम्हीच मोठे भाऊ आहोत. आम्हीच कायम मोठे भाऊ राहणार. भाजपचे वर्चस्व नाकारत शिवसेनेने मीच मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न यातून केला. तोच प्रकार आघाडीतही आहे. आघाडीत सध्या काँग्रेस मोठा भाऊ का राष्ट्रवादी काँग्रेस मोठा भाऊ यावर एकमत होताना दिसत नाही. तरीही काँग्रेसने त्यांना न जुमानणा-या राष्ट्रवादी काँग्रेसला आम्हीच तुमच्यापेक्षा मोठे आहोत हे ऐकवण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. त्यामुळे आघाडी आणि युतीतील छोटा भाऊ, मोठा भाऊ यांच्या वादात भावाच्या भावांना अधिक महत्त्व आले आहे. ‘गाढवाचं लग्न’ या नाटकात सावळ्या कुंभाराची बायको आपला पती सावळ्या कुंभाराला सांगते की, ‘तुमची पोरं, माझी पोरं आपल्या पोरांना मारत आहेत’ तसाच काहीसा हा प्रकार झालेला आहे.छोटय़ा भावांना मोठे होण्याची संधी ख-या अर्थाने मिळाली ती २०१४ ला. त्यामुळेच हे छोटे-मोठेपण गाजू लागले. याचा मूळ पाया आहे तो १९९५ हा. १९९५ ला सेना-भाजप युती झाली तेव्हा ज्याचे जास्त आमदार येतील त्याचा मुख्यमंत्री होईल, असा फॉर्म्युला ठरला होता. त्यामुळे हा १९९५चा फॉर्म्युलाच १९९९ ला अस्तित्वात आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वीकारला होता. अर्थात १९९५ आणि १९९९ यात फरक होता. १९९५ ला सेना-भाजपने एकत्रित जागावाटप करून निवडणुका लढवल्या होत्या. त्यात अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या वाटय़ाला कमी जागा होत्या. शिवसेनेने १७१ आणि भाजपने ११७ जागा लढवण्याचा निर्णय झाला होता. मुळातच जागावाटपात ५४ जागा शिवसेनेने जास्त लढवल्यामुळे शिवसेनाच मोठा भाऊ होणार आणि त्यांचेच जास्त आमदार निवडून येणार हे उघड होते. पण तरीही ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होणार असा शिवसेनेने दिलेला शब्द शिवसेनेचा विजयाचा आत्मविश्वास नसल्याचे प्रतीक होते. तिथेच भविष्यातील भाजपच्या चढत्या आलेखाचे रहस्य लपले होते. कारण ५४ जागा जास्त मिळूनही शिवसेनेचे संख्याबळ हे ७४ होते, तर भाजपचे ६४ होते. या ५४ पैकी आणखी काही जागा आपल्याला मिळाल्या असत्या, तर आपले संख्याबळ आणखी वाढू शकले असते, याची जाणीव भाजपला तिथूनच होत राहिली होती. तरीही त्यानंतरच्या १९९९, २००४, २००९ या तीन निवडणुकांमध्ये भाजपने नमती बाजूच घेतली आणि शिवसेनेच्या पदरात जादा जागा दिल्या. तरीही शिवसेनेच्या जागा १९९९ ला ६२ आणि भाजपच्या ५४ राहिल्या. या निवडणुकीत भाजपच्या दहा जागा कमी झाल्या होत्या, तर शिवसेनेच्या १२ जागा कमी झाल्या होत्या. मोठेपणाच्या प्रमाणात त्या कमी झाल्या होत्या. २००४ ला तोच प्रकार पुन्हा पाहायला मिळाला. मात्र २००९ च्या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला मागे टाकले होते. या निवडणुकीत जास्त जागा लढवूनही शिवसेनेला ४४ जागांवर विजय मिळवता आला, तर तुलनेत कमी जागा लढवून भाजपने ४६ जागांवर विजय मिळवत शिवसेनेपेक्षा आमचा पक्ष मोठा असल्याचे दाखवून दिले होते.साहजिकच २०१४ ला जागा वाटपात समसमान मागणी होणे अपेक्षित होते. भारतीय जनता पक्षाने त्यावेळी जागा वाढवून मागितल्या होत्या. १४४ जागांची अपेक्षा केली होती. पण शिवसेनेने आपली ताकद न ओळखता भाजपला दाद दिली नाही आणि युती तोडली. अर्थात त्यामुळे शिवसेनेचेच नाक कापले गेले होते. शिवसेनेच्या जागा दोन अंकीच राहिल्या, तर भाजपने मात्र शतक पार करत १२३ चा आकडा गाठला आणि जवळपास शिवसेनेच्या दुप्पट आपली ताकद असल्याचे दाखवून दिले. तरीही ‘पडलं तरी नाक वर हाय, अन् नाक कापलं तरी अजून भोकं हायतच’ अशा न्यायाने संजय राऊत अजूनही आम्हीच मोठे भाऊ आहोत, असे म्हणत आहेत. युती हवी असल्यास विधानसभेला आपल्याला जास्त जागा हव्यात म्हणून मागणी करत आहेत. काही करा, पण आम्हाला मोठा भाऊ म्हणा तरच आम्ही युतीला तयार आहोत, असे वक्तव्य करत आहेत. म्हणजे भाजपने आम्हीच मोठे आहोत हे सिद्ध केल्यानंतरही शिवसेनेला जाग आलेली नाही. छोटा भाऊ-मोठा भाऊ हा वाद आळवत बसले आहेत. दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीला असाच मोठा भाऊ कोण याचा उलगड झालेला नाही. १९९९ ला परस्परविरोधी लढल्यानंतर झालेल्या आघाडीत ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री या १९९५ च्या युतीच्या फॉम्र्युल्याची रि ओढत काँग्रेसला मोठा भाऊ बनवत राष्ट्रवादीने छोटय़ा भावाची भूमिका स्वीकारली. १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसने ७५ जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ५८ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे अर्थातच काँग्रेस मोठा भाऊ झाला आणि काँग्रेसच्या विलासराव देशमुख यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा आली. छोटा भाऊ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद आले. पण पाचच वर्षात चित्र पार बदलले.२००४ ची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने एकत्रित लढवून युतीला शह दिला. या निवडणुकीत आघाडीला बहुमत मिळाले. पण यावेळी राष्ट्रवादीच्या जागा वाढलेल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने ७१ जागा जिंकल्या, तर काँग्रेसने ६९ जागांवर यश मिळवले. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री या हिशोबाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यंत्रीपद जाणे अपेक्षित होते. यावेळी आत्ताच्या शिवसेनेप्रमाणेच काँग्रेस वागली. आपले संख्याबळ कमी झाले तरी मीच मोठा भाऊ, काँग्रेसच मोठा भाऊ असा आग्रह काँग्रेसने धरला. केंद्रीय मंत्रीपदी असलेल्या यूपीए सरकारमधील तिस-या क्रमांकाचे पद मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद देण्याची सूचना केली आणि राष्ट्रवादीने नमते घेतले.म्हणजे दोन मोठय़ा भावांना दोन छोटय़ा भावांनी लहान केले तरी आम्हीच मोठे आहोत हे म्हणण्याचा विनोद शिवसेना आणि काँग्रेसच करू शकते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काँग्रेसचा पुळका का येतो त्याचे हे नेमके कारण आहे. इथे दोघांचे सगोत्र आहे असे दिसते. याबाबत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितलेला किस्सा मजेशीर आहे. आबा म्हणाले होते, १९९९ ला ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मान्य केले होते. तेव्हा आमच्या ५८ पेक्षा जास्त काँग्रेसच्या ७५ आमदारांची संख्या होती. त्यामुळे आम्ही त्यांना मोठय़ा मनाने मोठय़ा भावाची भूमिका करायला दिली, मुख्यमंत्रीपद दिले. पण २००४ ला आमच्या आमदारांची संख्या ७१ होती, काँग्रेसचे आमदार ६९ होते, आमचे दोन आमदार जास्त होते, तरीही आम्हाला मुख्यमंत्रीपदाची जागा हवी असा हट्ट काँग्रेसने धरला होता. त्यावेळी आर. आर. पाटील यांनी विलासराव देशमुख यांना विचारले कसे काय? तर विलासराव म्हणाले, ७१ पेक्षा आमचे ६९ जास्त मोठे आहेत. यावर आर. आर. पाटील म्हणाले होते की, हवं तर मुख्यमंत्रीपद घ्या तुमच्याकडं, पण ७१ पेक्षा ६९ हा आकडा जास्त आहे, हे कोणत्या मास्तरनं तुम्हाला शिकवलं त्या मास्तरचं नाव सांगा.’ एकूणच मोठा भाऊ आपल्या छोटे भाऊ पुढे गेलेले असतानाही त्यांचे वर्चस्व आणि कर्तृत्व मानत नसतील तर या भाऊबंदकीत अनेक भाऊ शिरतात. शिवसेनेने भाजपचे वर्चस्व मानले नाही आणि युती तोडली होती. परिणामी २०१४ च्या विधानसभेला स्वबळावर लढून भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून ख्याती मिळवली. जेवढय़ा जागा मागितल्या होत्या सेनेकडे तेवढा आकडा जिंकून दाखवला. त्यासाठी ओढाओढी, फोडाफोडी केली हा भाग वेगळा, ‘एव्हरिथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड इलेक्शन’ असे आता म्हणावे लागते. पण तरीही शिवसेना पाठिंबा देणार नाही आणि निवडणुका लगेच नकोत म्हणून नागपूरकर भावाला मदतीसाठी बारामतीकर भाऊ धावून आला आणि मुख्यमंत्रीपदापासून वंचित राहिलेल्या भाजपला सरकार स्थापनेस टेकू दिला. त्यानंतर शिवसेनेचे डोळे उघडले, कसेही करा पण सरकारमध्ये शिरा या हेतूने विरोध मावळून संधीसाधूपणाने एका खिशात राजीनामे घेऊन ते सरकारमध्ये घुसले. सरकारी फळे चाखली, लाभ उठवला, त्याला कारण भाजप होते. तरी आम्हीच मोठे भाऊ म्हणायला सेनेवाले मोकळे. भाजपने बारामतीकर भाऊ केल्यावर शिवसेनेने दिल्लीत राहुल गांधींशी घरोबा जोडून काँग्रेसला भाव देत भाऊ केले. त्यामुळे आता भविष्यात लहान भावाला मोठे होऊ नये यासाठी शिवसेनेची ही भाऊबंदकी नव्या भावाच्या नादाने जाईल असे संकेत संजय राऊत यांच्याकडून मिळत आहेत. सातत्याने ज्याप्रकारे मोदींची निर्भर्त्सना आणि राहुल गांधींचे गोडवे संजय राऊत गात आहेत त्यावरून सख्खा भाऊ पक्का वैरी अशा प्रकारचे नाटय़ राजकारणात निर्माण केले जाण्याच्या या हालचाली आहेत. त्याचवेळी शिवसेनेला नमवण्यासाठी कमळाबाई कदाचित घडय़ाळाचा गजर करून धनरुभग करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण एकंदरीत आगामी महाराष्ट्रातले राजकारण हे छोटा भाऊ मोठा भाऊ आणि भावाचे भाऊ यांच्यातील जोडीसाखळीच्या खेळावर अवलंबून राहील असे दिसते.युती आणि आघाडी झाल्यावर हे दोन्ही गट किंवा चारही पक्ष युतीचा धर्म, आघाडीचा धर्म, नैसर्गिक युती, समविचारी आघाडी अशा गप्पा करून आपला संसार सुखाचा चालल्याचा आभास करत होता. परंतु तिहेरी तलाकला विरोध होत असला तरीही आता या युती आणि आघाडीतील मधुचंद्राचे दिवस संपल्यावर तलाक देऊन मोकळे झाले आहेत. आता पुन्हा एकदा निकाह लावण्यासाठी त्याच उत्साहात एकत्र येण्यासाठी सेना काँग्रेसशी आणि भाजप राष्ट्रवादीशी संबंध जोडून पुन्हा नवा संसार थाटायला मोकळे होतील, असे दिसते.
गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१९
छोटा भाऊ, मोठा भाऊ आणि भावाचा भाऊ!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा