मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे; परंतु इथला मराठी माणसांचा टक्का इतका घसरला आहे की, आज या मुंबईतून निवडून जाणारे खासदार नेमके कोण असावेत हे मराठी मतदार नाही, तर हिंदी भाषिक, अमराठी मतदार ठरवणार आहेत. आपल्या माणसांना, महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी संसदेत पाठवण्याच्या मराठी माणसांच्या इच्छेला वाटाण्याच्या अक्षता लागत आहेत. हा जो मराठी माणसांचा ऱ्हास झाला आहे त्याला पूर्णपणे शिवसेनाच जबाबदार आहे. शिवसेनेची बदलती भूमिका आणि नको त्यांचे लांगुलचालन केल्यामुळे आज मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होताना दिसत आहे. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यासाठी पन्नास वर्षापूर्वी आक्रमक भूमिका घेतली होती. पण सध्याची शिवसेना ही न्याय हक्क नाही, तर मराठी माणसाला ‘नाय हक्क’ अशा अवस्थेत घेऊन गेलेली आहे.१९६० च्या दशकात मुंबईत दाक्षिणात्य माणसांचे प्राबल्य वाढले होते. प्रत्येक ठिकाणी नोकरी आणि धंदा करण्यासाठी संपूर्ण मुंबई या अण्णांनी व्यापून टाकली होती. त्यावेळी शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांनी ‘उठाओ लुंगी, बजाओ पुंगी’ ही घोषणा दिली आणि मराठी माणसांच्या हक्काची जाणीव झाली. याला त्या काळात महाराष्ट्रातील काँग्रेस आणि अन्य पक्षांनीही स्वागत करत छुपा पाठिंबा दिला होता. कारण मराठी माणसाचे अस्तित्व टिकणे फार महत्त्वाचे होते. त्यामुळे फार मोठे परिवर्तन घडवले होते. त्याच्या जोरावर शिवसेनेला महापालिकेत सत्ता मिळाली होती. पण सत्ता मिळाल्यावर शिवसेनेच्या नेत्यांची मती फिरली. ज्या मराठी माणसांच्या हक्कासाठी आपली स्थापना झालेली आहे, त्याचा शिवसेनेला विसर पडला. मुंबईतील गिरणगाव किंवा कापड गिरणी आणि त्यांच्या वसाहती हे मुंबईचे वैभव होते. मुंबईतला डबेवाला ही मराठी माणसांची ओळख होती. पण एकापाठोपाठ एक गिरण्या संप करून बंद पाडल्या गेल्या. त्या गिरण्यांच्या जागांवर टॉवर आले, मॉल आले. लालबाग, परळ, गिरगाव, दादर ही मराठी माणसांची मुंबई परप्रांतीयांच्या हातात गेली. शिवसेनेने गिरणी कामगार उद्ध्वस्त केला, देशोधडीला लावला आणि त्यांना हद्दपार केला. मुख्य मुंबईतून मराठी माणूस रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात घालवला.
मुंबईतील मराठी माणसे, डोंबिवली, आंबिवली, कांदिवली, बोरिवली अशी सगळीकडे घालवली. इतके करून समाधान झाले नाही, नंतर ही माणसे बदलापूर, शेलू, कर्जतपर्यंत ठाणे जिल्ह्यातून रायगडात ढकलली, तर काही वसई, विरार, डहाणू, पालघरकडे सरकवली. मराठी माणसांच्या जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी उभारलेल्या जंगी टॉवरमध्ये उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतीलच नव्हे, तर बांगलादेशची माणसे आली. झुंडीच्या झुंडीने आली. त्यामुळे मुंबईतील गुन्हेगारी वाढली. उजळमाथ्याने आया-बहिणी रात्री-अपरात्रीही या मुंबईत फिरत होत्या, त्या सुरक्षेला काळिमा फासला गेला. मराठी माणूस असुरक्षित झाला. या ऱ्हासाला सर्वस्वी शिवसेना जबाबदार आहे. केवळ सत्तेसाठी आणि राजकारणासाठी मराठी माणसांवर अन्याय करण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनंतरच्या शिवसेनेने सुरू केले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारापासूनच शिवसेना पार दूर गेलेली आहे. मराठी माणसांच्या हितापेक्षा स्वहिताकडे झुकलेल्या शिवसेनेने मराठी माणसांचे, इथल्या गिरणी कामगारांचे नुकसान केले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात जे १०६ हुतात्मे झाले, ज्यांनी रक्त सांडले ते सर्व गिरणी कामगार होते. या गिरणी कामगारांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली.
पण त्यांच्याशीच कालांतराने गद्दारी करण्याचे काम शिवसेनेने केले. काँग्रेस, समाजवादी पार्टी किंवा डावे पक्ष हे नेहमीच सर्वसमावेशक असतात. त्यांना मराठी-अमराठी भेदभाव करायचा नसतो. त्यामुळे मराठी माणसांचा कैवार फक्त शिवसेनाच घेईल, असा विश्वास एकेकाळी महाराष्ट्राला वाटला होता. पण शिवसेनेने या मराठी माणसांना गिळंकृत करून लांब नेऊन सोडले आणि गुजराती, मारवाडी, सिंधी, दाक्षिणात्य, बंगाली, बिहारी, उत्तर प्रदेशातील माणसांनी ही मुंबई व्यापून टाकली. त्यांचा टक्का इतका वाढला आहे की, इथून मराठी माणूस निवडून द्यायचा की नाही हे त्यांच्या हातात गेले आहे. ही दयनीय अवस्था केवळ शिवसेनेच्या नाकर्तेपणामुळे झाली. शिवसेना आपल्या हेतूपासून दूर गेल्यावर राज ठाकरेसुद्धा शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली. मराठी माणसांचा कैवार घेण्याचा ठेका त्यांनी घेतला. सुरुवातीला तोडफोड करत आपली ताकद दाखवून दिली. त्यामुळे २००९ च्या निवडणुकीत त्यांना चांगलाच फायदा झाला. पहिल्याच निवडणुकीत तब्बल १४ आमदार मनसेने विधान भवनात पाठवले. पण हे सातत्यही फार काळ टिकले नाही. मुंबईतील मराठी टक्का घसरल्यामुळे पुढच्या निवडणुकीत मनसेलाच हद्दपार होण्याची वेळ आली. हे मराठी माणसांचे वाताहत करण्याचे पाप शिवसेनेने केलेले आहे.
काँग्रेसच्या संजय निरुपम यांच्यासारख्या नेत्यांनी तर खाल्ल्या घरचे वासे मोजायला सुरुवात केली आहे. ज्या मुंबईने मोठे केले, त्या मुंबई आणि मराठी माणसांच्या मुळावर घाव घालण्यासाठी परप्रांतीय मतांचे संघटन करण्याचा कावा त्यांनी साधला आहे. या संजय निरुपम यांना जन्म देण्याचे आणि मोठे करण्याचे पापही शिवसेनेचेच आहे. त्याचा परिणाम आज मुंबईतून जास्तीत जास्त लोकसभेसाठी उमेदवार हे परप्रांतीय जाणार आहेत. काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी हे पक्ष आपले उमेदवार परप्रांतीयच देणार, पण त्यांच्या विरोधात लढण्यासाठी शिवसेनाही मराठी माणसांपेक्षा हिंदी भाषिक उमेदवारांची वर्णी लावणार काय, असा प्रश्न यामुळे पडतो. त्यामुळे कोणीही निवडून आला तरी त्यामध्ये परप्रांतीयांची गर्दी असणार आहे. हे परस्वाधीन जिणे या मुंबईत शिवसेनेच्या नाकर्तेपणामुळे निर्माण झालेले आहे. आज परप्रांतीयांचे लांगूलचालन केले, त्यांच्या हातातले बाहुले बनले तरच मराठी उमेदवार निवडून येऊ शकेल अशी मुंबईची दुरवस्था झालेली आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा जागृत करण्याची वेळ आलेली आहे. मराठी माणसांच्या मतांचे विभाजन न होऊ देता महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणा-यांच्या पाठीशी उभे राहणे हेच आता मराठी माणसांचे कर्तव्य आहे.
गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९
मराठी माणसाच्या ऱ्हासाला जबाबदार कोण?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा