भारतीय जनता पक्षाने सध्या आपले लक्ष पश्चिमबंगालवर केंद्रित केलेले आहे. ज्या पश्चिमबंगालमध्ये अनेक र्वष डाव्यांची सत्ता होती, त्या डाव्यांना नेस्तनाबूत करून ममता बॅनर्जीनी सत्ता हस्तगत केली. पण, आजवर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला या राज्याने कायम चार हात दूर ठेवले होते; परंतु गेल्या काही दिवसांपासून अशा घडामोडी घडत आहेत की, पश्चिमबंगालमध्ये भाजपला दरवाजे खुले होताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली विराट सभा. ज्या भाजपला पश्चिमबंगालमध्ये सभा घेतल्यावर माणसे सभेला जमवणे कधी जमले नव्हते आणि रिकाम्या खुच्र्यापुढे सभा घेऊन नाकारले जात होते, त्याच भाजपची, पंतप्रधान मोदींची ‘न भूतो न भविष्यती’ अशी सभा त्याठिकाणी होते, हे फार मोठय़ा परिवर्तनाचेच लक्षण म्हणावे लागेल.नरेंद्र मोदींना आणि भाजपला आव्हान निर्माण करू पाहणा-या ममता बॅनर्जीना नेस्तनाबूत करण्याचा चंगच भाजपने बांधलेला यातून दिसून येतो. किंबहुना वाघाच्या गुहेत शिरून त्याची शिकार करण्याचा जो प्रकार शूरवीर करतात, तसाच प्रकार पश्चिमबंगालमध्ये भाजप करताना दिसते आहे. यावरून बंगाली वाघिणीला शह देण्यासाठी शाह-मोदी जोडी कार्यरत झालेली दिसते आहे. मोदींनी आपल्या भाषणात शनिवारी तृणमूल काँग्रेसला चांगलेच लक्ष्य केल्याचे दिसून आले. पश्चिमबंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारने मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांचा चुराडा केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत केला. राज्य सरकारवर त्यांनी खंडणीखोरीचा आरोप केला. म्हणजे औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या दुर्गपूरमधील सभेत पंतप्रधानांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. ज्याप्रमाणे यापूर्वी साम्यवादी सरकारांनी लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, तोच कित्ता ममता गिरवत आहेत, असा आरोप पंतप्रधानांनी केला.पश्चिमबंगालमध्ये आपली भूमिका आजवर कधीच भाजपला मांडता आलेली नव्हती. दीर्घकाळ डावी विचारसरणी तेथील जनतेत शिरल्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध करून मागास मनोवृत्तीत राहणे, यालाच बंगाली जनतेने प्राधान्य दिले होते. ममता बॅनर्जी याही जनतेला धुळफेक करतच सरकार चालवताना दिसत आहेत. किंबहुना ज्याप्रकारे कम्युनिस्टांनी २४ र्वष संथगतीने राज्य चालवले, तोच प्रकार ममता बॅनर्जीनी पुढे चालवल्याचे दिसून आले. परिणामी इथे ना विकास, ना कसला विचार, अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत जनतेलाही डोके चालवायला संधी नव्हती. त्यामुळे ममता बॅनर्जी किंवा डावे पक्ष यांच्याशिवाय कोणत्याही सभेला इथली प्रजा जात नव्हती. पण, एकदम या ठिकाणी परिवर्तनाचे वादळ निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली. तसे वारे वाहू लागले. त्यामुळे त्या हवेचा फायदा भाजपने घेण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांत अमित शाह, मोदी यांनी पूर्णपणे पश्चिमबंगालला लक्ष्य केले. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारच्या सभेत मोदींनी स्पष्ट केले की, जनतेची स्वप्ने केंद्र सरकार पूर्ण करील, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे. सबका साथ सबका विकास, या धोरणानुसारच केंद्रीय अर्थसंकल्पात जनआकांक्षेचे प्रतिबिंब उमटल्याचे मोदींनी सांगितले.केंद्र सरकारने गेल्या साडेचार वर्षात पश्चिमबंगालसाठी ९० हजार कोटींचे पायाभूत प्रकल्प मंजूर केले. मात्र, राज्य सरकारने त्याबाबत फारसा रस दाखविला नाही, असा दावा पंतप्रधानांनी केला. यातून ममता बॅनर्जीची निष्क्रियता उघड करून महाआघाडीत पंतप्रधानपदासाठी प्रमुख दावेदार असलेल्या ममता बॅनर्जी काही कामाच्या नाहीत, हेच स्पष्ट केले. शाळा, महाविद्यालयात प्रवेश असो किंवा नोक-या, जनतेला खंडणी द्यावी लागते, असा आरोप पंतप्रधानांनी ममता बॅनर्जीच्या सरकारवर केला. आम्ही जनतेबरोबर असून, हे फार काळ चालणार नाही, असे स्पष्ट केले. पश्चिमबंगाल सरकार भाजप कार्यकर्त्यांविरोधात दडपशाही करत आहेत. मात्र, हिंसाचाराला न घाबरता आमचे कार्यकर्ते तोंड देत आहेत, हे कौतुकास्पद असल्याचे मोदींनी सांगितले. मोदींच्या या सभेला अफाट गर्दी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील ठाकूरनगर येथे सुरू असताना, शनिवारी चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यात अनेक जण जखमी झाले, त्यामुळे मोदी यांना भाषण आवरते घ्यावे लागले. मातुआ समाजाचे लोक या सभेस मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. मोदी यांच्या सभेच्या वेळी त्यांचे शेकडो समर्थक बाजूला उभे होते. त्यांनी अचानक सभेच्या मैदानातील आतल्या भागात घुसण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी चेंगराचेंगरी झाली. मोदी यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. हे मोदींचे बंगाली जनतेला वाटणारे आकर्षण बंगालमध्ये भाजपचे कमळ फुलणार असल्याचेच द्योतक म्हणावे लागेल.काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जीच्या तृणमूलचे काही खासदार आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले. अजूनही काही मोठे नेते भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. याचा अर्थच स्पष्ट आहे की, ममता बॅनर्जीच्या एकाधिकारशाही आणि हट्टीपणाला बंगाली जनता कंटाळली आहे. त्यांना सक्षम आणि कार्यक्षम असा पर्याय तिथे हवा आहे. डाव्यांना पर्याय म्हणून तिथल्या जनतेने काही वर्षापूर्वी ममतांना संधी दिली. पण, त्यांनी बंगालसाठी काहीच केले नाही. त्यांना फक्त आपली प्रादेशिक ताकद दाखवून केंद्र आणि राज्याला त्या ताकदीवर नाचवायचे होते. त्यामुळे जनतेला ममतांना पर्याय हवा होता. तो काँग्रेसमध्ये दिसत नव्हता. कारण, काँग्रेसबरोबर ममतांनी आधीच आघाडी केली होती. त्यामुळे मोदींच्या रूपाने भाजपच्या माध्यमातून तिथल्या जनतेला एक आशेचा किरण दिसू लागला. ज्याप्रमाणे इशान्य भारतात परिवर्तन झाले आणि कमळ फुलले तसेच इथेही काही बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे मोदी, शाह यांनी त्या ठिकाणी आता पाय रोवायला सुरुवात केलेली आहे. आगामी निवडणुकांमधील काही राजकीय अंदाजात उत्तर प्रदेशात भाजपला फटका बसेल, असे सांगितले जाते. ती झीज भरून काढण्यासाठी भाजपला पश्चिमबंगाल हा चांगला पर्याय सापडला आहे. आज काहीच संख्याबळ नसलेल्या या राज्यात भाजप आता पाय रोवणार आणि चांगले संख्याबळ मिळवू शकते, हे या गर्दीनेच दाखवून दिले आहे.
गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१९
गुहेत जाऊन वाघिणीला लक्ष्य केले..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा