पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने बुधवारी पहाटे पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके)मध्ये घुसून बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले. भारताने केलेल्या या दुस-या सर्जिकल स्ट्राईकमध्ये १२ ‘मिराज २०००’ विमानांचा वापर करण्यात आला. कोटय़वधी भारतीयांच्या जे मनात होते, तेच भारतीय हवाई दलाच्या शूर जवानांनी करून दाखविले. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा सूड भारतीय जवानांनी घेतला. भारत हा एकसंध आणि मजबूत देश आहे. कोणत्याही प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही हा संदेश यातून भारताने दिला. हिंसाचार हा एकमेव उद्देश असलेल्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणे आणि त्यांना आपल्या देशात सुरक्षित आश्रय देण्याची आगळीक पाकिस्तानने करू नये हा धडाच यानिमित्ताने पाकिस्तानला मिळाला असेल. भारतीय हवाई दलाने केलेल्या या कारवाईचा तमाम भारतीयांना अभिमान आहे. तथापी हे युद्ध नसून हा लढा शांतता प्रस्थापित करण्यासाठी आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. हा लढा पाकिस्तानविरोधात नसून पाकिस्तान आपले शेजारी राष्ट्र आहे हाच विचार या ठिकाणी आहे. फक्त ज्या पाकिस्तानात दहशतवादाला थारा दिला जातो आहे त्या दहशतवादी संघटना आणि त्यांना प्रोत्साहन देणा-यांविरोधात असलेला हा शांतता प्रस्थापित करण्याचा एक प्रयत्न होता. त्यामुळे याचे गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. सरकारनेही निवडणुकीच्या तोंडावर याचे भांडवल करता कामा नये. भारतीय हवाई?दलाच्या कृतीवर शंका उपस्थित करून सरकारला दूषणे देण्याचाही कोणी प्रयत्न करू नये. हा पुलवामा हल्ल्याचा घेतलेला बदला आहेच, पण वर्षानुवर्षे दहशतवादाला तोंड देत असलेल्या देशाने उठवलेला आवाज आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
दहशतवादाच्या या युद्धात संपूर्ण देशाने एकत्र असणे गरजेचे आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे नाक ठेचले आहे. पाकिस्तान हा हिरव्या विषारी सापाची औलाद आहे. भारताच्या या दुस-या सर्जिकल स्ट्राईकमुळे जखमी झालेली ही औलाद सूड उगवण्याचा प्रयत्न करेल. भारतात आणखी दहशतवादी हल्ले करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून होतील. अशा परिस्थितीत आपल्या देशाची एकजूट ही फार महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वानी याबाबतीत सरकारच्या पाठीशी राहिले पाहिजे. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर काय, कुठे आणि कशी कारवाई करायची याचे सगळे अधिकार लष्कराला दिलेले होते. त्यावेळी हवाई दलाने लगेचच पोखरणमध्ये सराव सुरू केला. हल्ल्याचे पूर्व नियोजन करून बालाकोटमध्ये हा हल्ला करून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे अड्डे उद्ध्वस्त केले. यात सुमारे २५० दहशतवादी ठार मारले गेले. यासाठी हवाई दलाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या अभिमानास्पद कारवाईचे कौतुक करून लष्कराचे मनोबल वाढवले पाहिजे. अशाच कारवाईसाठी त्यांचे मनोधैर्य वाढवले पाहिजे. जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना भारतात आणखी आत्मघातकी हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. बालाकोट परिसरात जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या विविध तळांवर त्यासाठी प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती भारताच्या हाती आली होती. त्यानंतर भारतीय हवाई दलाने ही विनालष्करी प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली. मात्र ही कारवाई करत असताना कोणत्याही नागरिकाला इजा पोहोचणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. त्यादृष्टीने अनेक गावे हलवण्याचे आदेशही देण्यात आले होते. हा हल्ला फक्त दहशतवादाविरोधात होता हे भारतीय हवाई दलाने दाखवून दिले आहे.
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याचा मेव्हणा मौलाना युसूफ अझहर पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील बालाकोट परिसरात दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नेतृत्व करत होता. तरुणांना दहशतवादी बनवून भारतात अशा कारवाया, हल्ले करून उत्पात माजवायचा दहशतवाद्यांचा डाव होता. त्यासाठी या तळांवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात दहशतवादी, आत्मघातकी हल्लेखोर आणि विविध गटांचे प्रमुख यांचा समावेश होता. हे सगळे अड्डे भारतीय हवाई दलाने उद्ध्वस्त केले. त्यात या दहशतवाद्यांचा खात्मा झाला, ही अभिमानाची गोष्ट आहे. पाकिस्तानने वेळोवेळी दहशतवादाविरोधात कारवाई करू, असे आश्वासन दिले होते. आमच्याकडे दहशतवादी नाहीत, असे सांगून त्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार केले होते; परंतु पाकिस्तानात घुसून भारतीय हवाई दलाने दुसरा सर्जिकल स्ट्राईक करताना ‘जैश’चे अड्डे उद्ध्वस्त केल्याने पाकिस्तानचे दातच घशात घातले आहेत. भारताने पाकिस्तानला दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करण्याबाबत वेळोवेळी सूचित केले.
मात्र, पाकिस्तानने काहीही केले नाही. त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी दहशतवादी कारवाया रोखणे अत्यंत आवश्यक असल्याने भारताने ही कारवाई केल्याचे लष्कराने सांगितले आहे. आता आपल्याला सावध राहिले पाहिजे हेही तितकेच खरे आहे. जैश आणि अनेक दहशतवादी संघटनांनी पुलवामानंतर भारतात अनेक दहशतवादी हल्ले करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्यामध्ये मुंबईतील रेल्वे स्थानके, गर्दीची ठिकाणे, विमानतळे लक्ष्य करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे केवळ सीमेवरच्या सैनिकांनीच नाही, तर प्रत्येक नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. अशा काळात अफवा पसरवण्याचे, सोशल मीडियावरून जातीय, धार्मिक तेढ पसरवण्याचे प्रकार होत असतात. उलट-सुलट प्रतिक्रिया देऊन राजकीय नेते त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रकार करतात. हे सगळे दहशतवाद्यांच्या फायद्याचे असते. म्हणून सामाजिक वातावरण बिघडू न देता सर्वानी एकजुटीने राहणे आणि व्हायरल होणारे आक्षेपार्ह मेसेज फॉरवर्ड न करणे याकडे लक्ष दिले पाहिजे. हा लढा शांततेचा आहे. शांतता प्रस्थापित करण्याचा आहे, त्यात आपलेही योगदान असले पाहिजे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची नांगी ठेचली असली तरी पाकिस्तानला संपूर्ण दोष देण्यापूर्वी किंवा पाकिस्तान दहशतवाद्यांना देत असलेल्या आश्रयापूर्वी काश्मीरमधील गद्दारांचा किंवा फुटीरतावाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची अत्यंत गरज आहे. कारण ज्या पाकिस्तानच्या मदतीवर फुटीरतावाद्यांनी दहशतवाद जोपासला आहे, त्यांनाही कायमचे संपविले पाहिजे; तरच देशातील दहशतवाद ब-याच प्रमाणात नियंत्रणात येऊ शकेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा