आज जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जात आहे, पण या मराठी भाषा दिनाचे औचित्य आमच्या सरकार दरबारी मात्र फक्त औपचारिकच दिसते. केवळ चटावरचे श्राद्ध केल्याप्रमाणे हा दिवस उरकून टाकायचा नाही, तर या भाषेचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. महाराष्ट्रात राजभाषा असलेल्या मायमराठीची अवहेलना आणि उपेक्षा अद्याप थांबलेली नाही. इंग्रजीशिवाय आधुनिक जगात तरणोपाय नाही, अशा समजुतीचे भूत बोकांडी बसलेल्या मराठी जनतेलाही मायमराठीच्या अनास्थेबद्दल गंभीर विचार करावा, असे वाटत नाही. मराठी भाषा दिवस हा काही फक्त कोणाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नंतर तो पुढच्या कार्यक्रमापर्यंत सुकवत ठेवण्याचा आणि दीपप्रज्वलन करून भाषणे संपण्यापूर्वीच समई शांत करण्याचा कार्यक्रम नाही. हा दिवस मराठी भाषेच्या सन्मानाचा आहे. त्यानिमित्ताने सरकारने काही संकल्प करून या भाषेला असलेले वैभव सर्वासमोर आणण्याची गरज आहे.हा दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत, याचे भान असले पाहिजे. त्यामुळे ती महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता सर्वसमावेशक अशाप्रकारे असली पाहिजे. त्यामुळे यानिमित्ताने आठ-पंधरा दिवस शासकीय कार्यालयातील भाषाही मराठीच असली पाहिजे, याची दखल घेतली पाहिजे. सप्ताह, पंधरवडा यासाठी की त्यामुळे सवय लागेल, गोडी लागेल आणि नंतर अंगवळणी पडेल म्हणून. फक्त एक दिवसासाठी हे महात्म्य असता कामा नये.आज आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचे काम बरेच दिवस रखडले आहे. हे काम का वाटावे? ते आमचे कर्तव्य आहे असे सरकारमधील घटकांना का वाटत नाही? तसा दर्जा प्राप्त करायचा असेल तर ही होणारी अवहेलना थांबवणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढाकार सरकारने घेतलाच पाहिजे. भाषावार प्रांतरचनेनंतर निर्माण झालेल्या महाराष्ट्राला हे असे बहुभाषिक बनवून मराठीवर अत्याचार, अन्याय करण्याचे काम का केले जात आहे?मराठी अस्मिता हा काही फक्त भाषणांचा आणि घोषणांचा विषय नाही. मराठी अस्मिता जगण्यातून, वागण्यातून आणि रक्तातून दिसली पाहिजे. आज आमची सरकारी मराठी भाषा मराठी माणसांनाच कळत नाही इतकी दिव्य असते. भाषा ही संवादाचे माध्यम असताना ती भाषाच नागरिकांना समजत नसेल, तर उपयोग काय? शासकीय परिपत्रकातील भाषा ही अनाकलनीय असते. शब्दश: भाषांतर करून न समजणारी असते. ती समजेल अशी करणे याबाबतही सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सरकारपासूनच मराठीतून बोला हे सांगायची वेळ येत असेल, तर तोही फार मोठा विनोद म्हणावा लागेल. मराठी भाषेची वारंवार होणारी अवहेलना थांबवण्यासाठी सरकारने प्रशासनाकडून काम करून घेतले पाहिजे. त्या इच्छाशक्तीशिवाय आम्ही अभिजात भाषेचे स्वप्न कसे पूर्ण करणार आहोत?लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी। हे एक दिवस म्हणून चालणार नाही. म्हणूनच आम्हाला फक्त मराठी बोलता आले नाही पाहिजे, तर मराठी जगता आले पाहिजे. मराठीचे सर्व संस्कार आमच्यातून दिसले पाहिजेत. बाहेरून पिझ्झा मागवून खायचा आणि मराठीत बोलायचे, ‘वॉव का क्यूट ना पिझ्झा?’ याला काही अर्थ आहे का? आम्ही मराठी पदार्थ खाल्ले तरच आमच्या तोंडून मराठी उद्गार बाहेर पडतील. त्यासाठी खाना एक दिवस झुणका भाकर, खा मराठी पुरणपोळी, कशाला हवेत मोमोज? आपण खाऊ छानपैकी मोदक. रोटी नका खाऊ पोळी, चपाती खा. राईस एक दिवस खाऊच नका, चांगला गरम गरम भात खाऊन बघा. आपोआप पोटातून उद्गार मराठीत येतील. संताप आल्यावर आजकाल शिव्याही तरुणवर्ग इंग्रजीतून देताना दिसतो. त्या तरुणांना जरा आमच्या मराठी शिव्यांचीही अस्सल रांगडी गोडी चाखायला दिली पाहिजे.कोणत्याही क्रांतीसाठी सगळीकडून बंड किंवा उठाव असतो तसा बदल प्रत्येक बाबतीत झाला, तर आमचे मराठीपण टिकेल. एक दिवस मेसमध्ये न जेवता खानावळीत जेवायचे. बाईक न चालवता फटफटी चालवून बघितली पाहिजे. पँट, टी-शर्ट आणि पाश्चिमात्य पोषाखांऐवजी जरा मराठी पोषाख एखाद् दिवशी घालावा. कसल्या तरी इव्हेंटला शिवलेले धोतर नेसण्यापेक्षा अस्सल मराठी पद्धतीने धोतर नेसून बघितले पाहिजे. म्हणूनच केवळ लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी एवढे म्हणून आता थांबायचे नाही, तर आम्ही पूर्णपणे मराठी जगण्याचा विचार केला पाहिजे. एक दिवस तरी आपण दाक्षिणात्यांचा दारावर येणारा किंवा हॉटेलमध्ये जाऊन इडली, मेदू वडा, डोसा मागणार नाही. कांदे-पोहे मागवू असा निश्चय करा. गुजरातींचा ढोकळा न मागवता गरमागरम कांदा-भजी खायची. पावभाजीऐवजी मस्तपैकी मिसळ हाणूयात. भेळ खायचीच असेल, तर ती भय्याकडून न घेता कुठे कोल्हापुरी चुरमुरे, सांगलीचे भडंग मिळाले तर खावेत. कसली तरी रासायनिक कृत्रिम पेय पिण्यापेक्षा आमच्या कोकणातील सोलकढी पिण्याचा निर्धार करू.आमच्याकडचे अनेक पदार्थ असे आहेत की, त्याची चटक आम्ही इतरांना लावू शकतो. डालखिचडीपेक्षा मेतकूट तूप-भात किंवा कुळथाचे पीठले-भात कोणी तरी खायला देण्याची कृपा करावी. चटण्या कोशिंबिरी आणि भरीत ही तर मराठीची वैशिष्टय़े आहेत. सलाड नको, एक दिवस त्यापेक्षा काकडीची कोशिंबीर, टोमॅटोची कोशिंबीर, भोपळय़ाचे भरीत, वांग्याचे भरीत आहे का, असे एखाद्या हॉटेलात जाऊन विचारा. पंजाबी पद्धतीने केलेले पालक पनीर नको, अळवाचे फदफदे कुठे आहे का विचारा. कानात डूल घालून बायकांवर कुरघोडी करण्यापेक्षा मराठी मिशी ठेवून पराक्रमाचा विचार करा. फक्त बोलून नाही तर वागून मराठी बनूया. त्या वागण्यातून मराठी शब्द पुढे टिकवण्याची इच्छा होईल. म्हणून मराठी जगले तरच मराठी भाषेचा सन्मान होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा