मागच्या आठवडय़ात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील वातावरण एकदम ढवळून निघाले आहे. या वातावरणात काही घटना दूषित घडलेल्या आहेत. त्या टाळण्याचा प्रयत्न तमाम भारतीयांनी केला पाहिजे. तो प्रकार म्हणजे, भारतात ठिकठिकाणी राहत असलेल्या काश्मिरी तरुणांवर होणारे हल्ले. यवतमाळमध्ये दोन दिवसांपूर्वी शिवसेनेची संघटना असलेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी काही काश्मिरी तरुणांना मारहाण करून त्यांना वंदे मातरम् म्हणायला लावले. असेच प्रकार देशभरात अनेक ठिकाणी घडलेले आहेत. हा प्रकार अत्यंत हीन, दयनीय असा आहे. केवळ काश्मीरमध्ये जन्म घेतला, म्हणजे ते दहशतवादी आहेत हे कसे म्हणता येईल? सरसकट सगळय़ा काश्मिरींना दोषी धरणे खूप चुकीची गोष्ट आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणारे फुटीरतावादी लोक तिथे आहेत. पण, ते काश्मीरमध्येच असतात. ते त्यांचा भाग सोडत नाहीत. पण, अन्य राज्यात जे काश्मिरी राहत आहेत, ते केवळ सुरक्षेसाठी आलेले आहेत. निर्वासीत झालेले आहेत. शिक्षणासाठी आलेले आहेत. त्यांच्याकडे सोयी नाहीत म्हणून आलेले आहेत. असे असताना भारतीय म्हणून आपण त्यांना मदत करणे गरजेचे आहे.पण, युवासेनेसारख्या आततायी संघटना अशा काश्मिरींवर हल्ले करून भारताला बदनाम करत आहेत, हे चुकीचे आहे. आज संपूर्ण देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळेच शुक्रवारी सुप्रीम कोर्टानेन याची गंभीरपणे दखल घेतली. त्यामुळे महाराष्ट्रासह ११ राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटिसा बजावल्या आहेत. त्या त्या राज्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावले उचलावीत, असे या नोटिशीत म्हटले आहे. ही वेळ न्यायालयावर का यावी? प्रत्येक गोष्ट न्यायालयाने सांगून केली जावी का? आमची काही नैतिक जबाबदारी नाही का? या विद्यार्थ्यांवर होणा-या हल्ल्यामुळे सुप्रीम कोर्टाला राज्यांना आदेश देण्याची वेळ आली आहे. त्या आदेशानुसार असे प्रकार घडल्यास नोडल ऑफिसरकडेही काश्मिरी विद्यार्थी तक्रार करू शकतात, असे सुचविले आहे. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर संतप्त संघटनांकडून देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे, हे मुळातच चुकीचे आहे. आता त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यामुळेच सुप्रीम कोर्टाला या घटनांची गंभीर दखल घ्यावी लागली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह ११ राज्यांना कोर्टाने नोटिसा बजावल्या आहेत. काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावले उचलावीत, असे आदेश दिले आहेत. अन्य राज्यांना ठीक आहे, पण महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला अशी नोटीस यावी हे चांगले नाही. यवतमाळमधील युवासेनेच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी केलेल्या या प्रकारामुळे महाराष्ट्राला ही नोटीस आली आहे. एकीकडे पेंग्वीनसारखे प्राणी आणून काहीतरी अचाट करणारे युवासेनेचे नेते म्हणे प्राण्यांवर प्रेम करा म्हणतात, खेळातील टेडीबिअरप्रमाणे त्या पेंग्वीनशी खेळत बसतात, तर त्यांचेच कार्यकर्ते निष्पाप विद्यार्थ्यांना मारहाण करतात. हे महाराष्ट्राला लागलेले लांछनच म्हणावे लागेल.त्यामुळे केंद्र सरकारसह महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, हरयाणा, मेघालय, पश्चिमबंगाल, छत्तीसगड, उत्तराखंड आणि दिल्ली या राज्यांना सुप्रीम कोर्टाने नोटिसा पाठवल्या आहेत. हिंसाचाराच्या घटनांच्या तपासासाठी नियुक्त केलेले नोडल ऑफिसर यांनीही काश्मिरी विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी. नोडल ऑफिसरकडे काश्मिरी विद्यार्थी तक्रार दाखल करू शकतात, असे कोर्टाने म्हटले आहे. वास्तविक पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात निदर्शने करण्यात आली, हे ठीक आहे. दहशतवादी, फुटीरतावादी यांची निदर्शने होणे हेही ठीक आहे. पण, विविध राज्यांमध्ये शिक्षण घेत असलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांनाही मारहाण झाली, हे अत्यंत दु:खदायक आहे. आज भीतीपोटी काही विद्यार्थी हॉस्टेलमधून बाहेर पडत नाहीत, अशी काही ठिकाणी परिस्थिती आहे. त्यांच्या मनाचा काहीतरी विचार केला पाहिजे. निरपराधांना मारहाण करण्यात कसले आले आहे शौर्य? एवढी हौस आहे, तर जायचे होते लढाई करायला सीमेवर. ज्यांचा दोष नाही अशा भारतीयांना मारहाण करण्यात काहीच अर्थ नाही, हे युवासेनेसारख्या संघटनेच्या नेत्यांना समजले पाहिजे. त्यामुळे आज काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.काश्मिरी विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्याच्या मागणीची याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान कोर्टाने राज्यांना नोटिसा बजावून सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेले दहशतवादी हल्ले, घुसखोरांकडून होणारे अत्याचार यामुळे अनेकजण घरदार सोडून देशाच्या अन्य कानाकोप-यांत आधारासाठी जात आहेत. शिक्षण घेत आहेत. त्यांना तुम्ही भारतीय आहात, आपण एकच आहोत, असा विश्वास देण्याची गरज आहे. आज सरहद्द सारख्या अनेक सेवाभावी संस्था अशा काश्मिरींना संरक्षण देण्यासाठी त्यांना भारतीयत्वाचा हक्क देण्यासाठी धडपडत आहेत. काश्मीर हा आपलाच आहे, हे आपल्याला सांगण्यासाठी तिथल्या जनतेचा विश्वास आपल्याला अगोदर मिळवावा लागेल. आपण जर तिथल्या नागरिकांना आसरा दिला नाही, संरक्षण दिले नाही, तर त्यांना भारताबद्दल प्रेम कसे वाटेल? तुम्ही आमचे बांधव आहात या प्रेमाच्या विश्वासानेच त्यांना आपल्याकडे ओढता येईल.जन्मापासून दहशतीच्या वातावणात वाढलेले हे लोक शिक्षण, कामधंदा यासाठी देशाच्या कानाकोप-यांत जातात याचा अर्थ त्यांनी भारत हाच आपला देश आहे हे मान्य केले आहे. असे असताना त्यांना असुरक्षित वाटणे हे देशाच्या दृष्टीने घातक आहे. काश्मिरींच्या मनात जर या देशाबद्दल घृणा निर्माण झाली, तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. असे तरुण भारतविरोधी कारवाया करतील, दहशतवादी बनतील. पाकिस्तानला सामील होतील. जे पाकिस्तानला हवे आहे तेच नेमके घडेल. त्याला आपण जबाबदार असू. आपण या निरपराध तरुणांना आपलेसे केले पाहिजे. ती आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यांना सक्तीने वंदे मातरम् म्हणून घेण्यात कसला आला आहे मोठेपणा? ते भीतीपोटी म्हणतीलही. पण, हे वंदे मातरम् त्यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे आले पाहिजे. ते तेव्हाच येईल, जेव्हा आपण त्यांना आपले म्हणू. म्हणूनच त्यांना आपल्यात सामावून घेणे हे आपले कर्तव्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा