अण्णा हजारेंचे आंदोलन हा आता एक विनोदाचा भाग झालेला आहे. त्या आंदोलनाने जनतेचे हीत अजून कधीच साधले गेले नसले तरी राजकीय पक्षांच्या हौशा- गवशा-नवशांना मात्र अण्णांचे हे आंदोलन नेहमीच वरदायी ठरलेले दिसते. त्याचा राजकीय लाभ घेण्याचा फायदा कमजोर पक्षांनी नेहमीच घेतलेला दिसून येतो. तसा संधीसाधूपणा या आंदोलनात मिळवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अण्णा यांनी त्याला फारसे महत्त्व न दिल्याने शिवसेनेचा हा प्रयत्न फसला.अण्णा हजारेंचे आंदोलन सुरू झाल्यावर लगेचच ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ या म्हणीप्रमाणे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अण्णांच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला. अण्णांचे वजन दुस-याच दिवशी काही किलोंनी कमी झाले आणि त्यांची प्रकृती ढासळल्याची बातमी आली. वास्तविक नेहमीच्या अनुभवानुसार अण्णांचा स्टॅमिना हा ९ दिवसांचा आहे. ९ दिवस ते तग धरतात आणि नंतर कोणीतरी भेटून आपले उपोषण मिटवावे म्हणून आळवणी सुरू करतात. दुस-याच दिवशी ते कधी आजारी पडत नाहीत. अण्णांच्या आंदोलनाची एक स्टाईल आहे. म्हणजे नाटकाला जशी नांदी असते, पहिला अंक, दुसरा अंक असतो तसेच अण्णा आपला हा इव्हेंट नेहमीच अत्यंत नियोजनबद्ध करत असतात. त्यामुळेच त्यांच्या या इव्हेंटची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली होती. त्याप्रमाणे ते सुरुवातीला महात्मा गांधींच्या पाया पडतात, हातात तिरंगा घेतात, भाषण करतात, मग पहिल्या दिवशी बसून असतात. दुस-या दिवशी लगेच त्यांची प्रकृती बिघडत नाही किंवा त्यांचे वजनही घटत नाही. त्यांचे वजन आंदोलनाचे पारडे वाढल्याशिवाय कधीच कमी होत नाही. तरीही या खेपेला दुस-याच दिवशी त्यांचे वजन चार किलोनी घटले आणि त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी आली. त्याबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगेच अण्णांच्या जीवाला काही झाले तर त्याची जबाबदारी सरकारची असेल, असे वक्तव्य करून त्यांच्या आंदोलनाचा फायदा उठवण्यासाठी हौशा-गवशाप्रमाणे या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.अण्णांचे हे वजन घटवण्याचे आणि वाढवण्याचे प्रकार आमच्या सेलिब्रेटिंना आणि आपले शरीर फॉर्ममध्ये आणू पाहणारांना नेहमीच आकर्षण ठरले आहे. आज-काल अनेक फिटनेस सेंटर, वेलनेस इंडस्टीज वेट लॉस आणि वेट गेनचे ट्रेनिंग देत असतात. त्यांना त्यांची प्रॉडक्ट गळय़ात मारण्यासाठी अनेक गिऱ्हाईक लागत असतात. आपल्या काही गोष्टी, हजारो रुपयांच्या बरण्या खपवून वजन वाढवा किंवा कमी करा असले काही उपाय ते सांगत असतात; परंतु असे काहीही न खाता-पिता अण्णा केवळ उपोषणाने वजन घटवतात आणि लगेच वाढवतात हा चमत्कार आहे; परंतु अशा चमत्काराचा फायदा घेण्यासाठी अनेकजण टपलेले असतात. अशाच एका उपोषणातून आम आदमी पार्टीची निर्मिती झाली. अण्णा हजारे म्हणजे जणू काही जयप्रकाश नारायण होतील आणि १९७७ प्रमाणे आम आदमी पार्टी जनता पक्षाची जागा घेईल असे वातावरण प्रारंभी तयार झाले. पण आम आदमी पार्टीच्या स्वार्थी लोकांच्या भरतीचे वास्तव जनतेला समजले आणि त्यांना दिल्लीपुरतेच मर्यादित ठेवले. हे उदाहरण डोळय़ांपुढे घडल्यामुळे अण्णांनीही आपल्या या अपत्याला लांबच ठेवले.त्यानंतरही अनेकवेळा अण्णांनी उपोषण करण्याचा प्रयत्न केला, इशारा दिला पण एका उपोषणानंतर त्यांना पुण्याला उपचारासाठी हलवण्यात आले होते. याचे सर्वानाच आश्चर्य वाटले होते. याचे कारण मुंबईतल्या आझाद मैदानात अण्णा हजारेंनी आंदोलन केले. तिथे तब्ब्येत बिघडली आणि त्यांना मुंबईतील कोणत्याही रुग्णालयात न नेता पुण्यात नेले गेले. या रहस्याचा अर्थ कोणालाच कळला नव्हता. तसेच उद्धव ठाकरे यांचे आताचे रहस्य आहे.शिवसेनेने अगदी शिवसेनाप्रमुखांनीही अण्णा हजारेंची कायम खिल्ली उडवली होती. वाकडय़ा तोंडाचा गांधी काय किंवा अनेक प्रकारची टीका शिवसेनेने केलेली होती. २०११ ला अण्णा हजारेंचे लक्षवेधी आंदोलन झाले तेव्हा त्या आंदोलनाला केजरीवाल यांच्यासारख्या एनजीओ चालकांनी इव्हेंटचे रूप दिले होते. मेणबत्त्या पेटवणे, पदयात्रा काढणे, मै अण्णा हूँ लिहिलेल्या टोप्या घालणे हे प्रकार त्या आंदोलनात पुढे आले होते.त्यावेळी संपूर्ण देशभर मै अण्णा हूँ अशी टोपी घालून अण्णांचे समर्थन होत होते. या समर्थनार्थ काही महिलांनीही टोप्या घातल्या होत्या. त्यावर टीका करताना शिवसेनाप्रमुखांनी अत्यंत खिल्ली उडवली होती. शबाना आझमीने मै अण्णा हूँ ही टोपी घातली त्यावर टीका करताना शिवसेनाप्रमुख जाहीर भाषणात म्हणाले होते, काय मैं अण्णा हूँ? वर अण्णा आहे, खाली काय आहे? त्यावर प्रचंड हशा झाला होता. एकंदरच अण्णा हजारेंची प्रचंड हिडीस फिडीस शिवसेनेने केलेली होती; परंतु आता सरकारविरोधात ते आंदोलन करत आहेत म्हटल्यावर हौशा-गवशा-नवशाप्रमाणे उद्धव ठाकरे मैदानात उतरले. अण्णांचे समर्थन केले. अण्णांचा पुळका आला. अण्णांच्या प्रकृतीची काळजी वाटू लागली. अण्णांना काही झाले तर त्याला सरकार जबाबदार राहील, असा इशाराही देऊन मोकळे झाले. हा संधीसाधूपणा आहे. अण्णांची प्रत्येक आंदोलनात प्रकृती ढासळते, वजन कमी होते. त्यापैकी कोणत्याही आंदोलनात असा इशारा शिवसेनेने दिलेला नव्हता. पण आता शिवसेनेचे वजन कमी झाल्यामुळे अण्णांच्या आंदोलनाचा आधार घेण्याचा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. या आंदोलनाचा फार्स झाला. त्या फार्समधले एखादे पात्र आपण व्हावे आणि त्याचा राजकीय लाभ मिळावा यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थिती हाताळून अण्णांचे तोंड एका पत्रात गुंडाळले आणि सरबताचे पाणी पाजून त्यांना खाते पिते केले.