पुराव्याचे ना‘पाक’ तुणतुणे!
पुलवामा हल्ल्यासंदर्भात इम्रान खान यांनी मंगळवारी जाहीर भाष्य केले होते. या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. भारताला तसे वाटत असल्यास त्यांनी पुरावे द्यावेत, आम्ही कारवाई करू, असे इम्रान खान म्हणाले होते. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानचे हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबाच म्हणावे लागेल. कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा असे हल्ले झालेले आहेत, त्या प्रत्येकाचे पुरावे भारताने सादर केलेले होते. त्यावर पाकिस्तानने काहीच कारवाई केलेली नव्हती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानी दहशतवादी संघटना असलेल्या जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची तत्काळ जबाबदारी स्वीकारली होती. यापेक्षा आणखी काय पुरावा इम्रान खानला हवा आहे? पाकी पंतप्रधान इम्रान खान हा पूर्णपणे पाकी लष्कराच्या हातातले बाहुले झाला आहे आणि त्याचा बोलवता धनी कोणी दुसराच आहे हेच यातून दिसत आहे.
इम्रान खानला स्वत:चे असे काहीही मत नाही, तर पाकिस्तानी लष्कराने ते त्याच्या तोंडून वदवून घेतले आहे हेच यातून दिसते आहे. कसले पुरावे हवे आहेत पाकिस्तानला? २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्याचे पुरावेही तत्कालीन सरकारने पाकिस्तानला दिले होते. त्यानंतर भाजप सरकार आल्यानंतर असे पुरावे या सरकारनेही अनेकदा दिले होते. पाकिस्तानने आजवर त्याचे काय केले. दहा वर्षापूर्वी मुंबईवर हल्ला झाला त्यामागे पाकिस्तानचाच हात होता. भारताने त्यावेळी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्या होत्या. हल्ल्यातील पाकचा सहभाग दाखवणारे सर्व पुरावेही दिले होते. दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडले. या प्रकरणाचा खटला भारतात चालवण्यात आला. कसाबला शिक्षा सुनावण्यात आली. पाकिस्तानच्या न्यायालयांनी या प्रकरणाची साधी दखल घेतली नाही. यापेक्षा काय पुरावे पाहिजेत इम्रानला? १९९२ साली मुंबईत बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी दाऊद इब्राहिमला पाकिस्तानने आसरा दिला आहे. दाऊदला भारताच्या ताब्यात देण्याची वारंवार मागणी करूनही पाकिस्तान त्याला का भारताच्या ताब्यात देत नाही? आमच्याकडे दाऊद नाही असा कांगावा पाकिस्तान नेहमी करतो.मग इम्रान खानच्या संघातच क्रिकेट खेळणा-या जावेद मियाँदाद हा दाऊदचा व्याही झाला, त्या लग्नाला क्रिकेटीअर मित्र म्हणून इम्रान खान हजर होताच ना? ते लग्न पाकिस्तानातच झाले होते. मग दाऊद पाकिस्तानात नाही हे कशाच्या आधारे पाकिस्तान सांगते? दाऊदला ताब्यात देण्याचे धाडस इम्रान खान करणार आहे का आता? पुरावे मागण्याचा शहाणपणा इम्रान खानने करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा. पण यातून इम्रानला स्वत:चे मत नाही, यावर त्याने शिक्कामोर्तब केले असेच म्हणावे लागेल. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी केली आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राजकारणातही पाकिस्तानला एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व बाजूंनी कोंडी करून नंतर पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानची पळापळ झाली असून पाकिस्तान हल्ल्याशी संबंध नाकारत असल्याचे दिसत आहे.पण आता ही नौटंकी चालायची नाही. लष्करे तोयबा, जैश-ए-मोहमंद, हिजबुद्दीन मुजाहिद्दीन अशा दीड ते दोन डझन दहशतवादी संघटना सातत्याने कार्यरत असतात. भारतात, काश्मीरमध्ये या संघटना वारंवार उच्छाद मांडत असतात. कोणतीही दुर्घटना झाली की, त्याची जबाबदारी घेत असतात. हे सगळे पाकिस्तानात तळ ठोकून असतात. या सगळय़ा संघटना पाकिस्तानच्या आहेत, हे माहिती असूनही आता वेगळे पुरावे मागण्याचे धाडस इम्रान खान करत असेल, तर पाकिस्तानात घुसून मारायची वेळ आलेली आहे, हे निश्चित. पाकिस्तानमध्ये बेरोजगारी, भीकमांगे आणि गुन्हेगारीशिवाय काही शिल्लक नाही. ना तिथे लोकशाही आहे, ना तेथील जनता सुखी आहे. कोणताही कायदा-सुव्यवस्था नाही की, भारताप्रमाणे तेथील नागरिक आनंदाने जगत आहेत. फक्त भीतीच्या दहशतीच्या छायेखाली एक जगणारा दहशतवादी देश अशीच या देशाची ख्याती आहे. सगळे दहशतवादी पोसणारा दहशतवाद्यांचा देश अशीच पाकची ख्याती आहे.तालिबानी संघटना असो वा जिहादी संघटना असो, त्यांचा अतिरेक हा पाकिस्तानात पोसला जातो. अमरनाथ यात्रेवर हल्ले करणारे हल्लेखोर असोत, वा काश्मीरमधील नागरिकांवर अत्याचार करणारे अत्याचारी हे पाकिस्तानातून येतात. नशिली पदार्थाची तस्करी करण्याचा मार्ग, बनावट नोटा हे सगळे प्रकार घुसखोरी करून पाकिस्तानातून होत असतात. इतके सगळे असूनही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुरावे मागत असेल, तर त्याचेच दात घशात घालण्यासाठी अमेरिकेप्रमाणेच भारताला कारवाई करावी लागेल. ओसामा बीन लादेनला त्याच्या घरात घुसून अमेरिकेने मारले तरी कोणाला त्याचा पत्ता लागला नाही. तसेच पाकिस्तानात घुसून हे सगळे दहशतवादी ठेचून चून चून कर मारावे लागतील. त्यांची ती छिन्नविच्छिन्न मढी हाच पुरावा असेल आणि सांगावे लागेल, इम्रान खान, हा घ्या पुरावा. इम्रान खानची प्रवृत्तीही अत्यंत खुनशी झालेली आहे. त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल. इम्रान खान हा पाकिस्तानच्या राजकारणात आता पंधरा र्वष तरी सक्रिय आहे. असे असताना त्याच्यासमोर अनेक घटना घडलेल्या आहेत. गेल्या दहा वर्षात भारतात घडलेल्या दहशतवादी कारवाया त्याला माहिती आहेत. कारण सगळय़ा जगाला माहिती आहेत म्हणजे त्या इम्रान खानला माहिती असणारच.२६/११ चा पाकपुरस्कृत हल्ला हाही एक छुपे युद्धच होते. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला तो हल्ला होता. त्याचे सगळे पुरावे भारताने दिलेले होते. त्याचे काय झाले हे त्यावेळी विरोधात असणा-या इम्रान खानने कधी तत्कालीन पाक राज्यकर्त्यांना विचारले होते का? सत्तेसाठी एकमेकांच्या विरोधात गेले तरी भारत द्वेषासाठी आणि दहशतवादासाठी सगळे कसे एक होत असतात हे जग पाहते आहे. म्हणूनच वर तोंड करून आता पुरावे मागणा-या पाकिस्तानला आत घुसून एकेकाला ठार करूनच पुरावे द्यावे लागतील आणि सांगावे लागेल की हे घ्या पुरावे. लातोंके भूत बातोंसे नही मानते, त्याप्रमाणेच ही पाकी दहशतवादाची भुतंही आता इथेच गाडून टाकावी लागतील. त्यांची थडगी बांधावी लागतील, हे लक्षात घेतले पाहिजे. ती थडगीच असतील या दहशतवादाचे पुरावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा