सध्या शिवसेनेला सत्तेची अफाट हाव सुटली आहे, असे वातावरण आहे. म्हणजे एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं वयात आल्यावर लवकर लग्न झाले नाही, तर तो जसा बेभान होतो आणि काहीही होऊ दे पण कपाळावर बाशिंग येऊ दे म्हणून तडफडत असतो, तशी अवस्था शिवसेनेची झालेली आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह येऊन युती काय करून गेले की शिवसेनेला वाटू लागले आपलाच मुख्यमंत्री होणार. वास्तविक पाहता युतीच्या फॉम्र्युल्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची कसलीही चर्चा झाल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले नाही. फक्त लोकसभा निवडणुकीचे जागावाटप नक्की केले. विधानसभेचे जागावाटप अद्याप झालेले नाही. मित्र पक्षांना विश्वासात घेऊन ते करायचे आणि उरलेल्या जागा निम्म्या निम्म्या वाटून घ्यायच्या, असे ठरल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी बैठकीचा सगळा तपशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फक्त अनुमोदन दिले.
त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत युती असेल पण जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही आणि मुख्यमंत्रीपदाचा विषयही झालेला नाही. असे असताना शिवसेनेच्या वाचाळ नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू केलेली आहे. उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग म्हणतात तसलाच हा प्रकार आहे. रामदास कदम यांनी अडीच र्वष मुख्यमंत्रीपद दिले नाही, तर युती तोडू असा इशारा काल दिला होता. हा इशारा ऐकल्यावर सगळय़ा महाराष्ट्रात लोक खो-खो हसले होते. रामदास कदमांना कोणी विचारात तरी घेते का? या युतीच्या चर्चेत तरी घेतले होते का? अडीच र्वष मुख्यमंत्रीपद भाजपने देऊ केलेच तर ते रामदास कदमांना मिळेल, असे का वाटले असावे? शिवसेनेत आधीच लाईन लावून आहेत. साक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून ते संजय राऊत यांच्यापर्यंत सर्वानाच ही स्वप्न पडत आहेत. या रांगेत रामदास कदम यांना कोणी विचारात घेतले आहे का? पण तरीही उगाचच आपले मत मांडून ते मोकळे झाले, लगेच कडक इशाराच दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण युती करणे किंवा मोडणे हे रामदास कदमांच्या हातात आहे का? चार र्वष भाजपने अक्षरश: खेळवले, आपल्या हातातील बाहुले बनवले तरीही शिवसेनेच्या या कोणत्याही नेत्यांकडे कसलाही स्वाभिमान नव्हता. नुसतेच राजीनामे खिशात ठेऊन आहोत हे सांगत सुटायचे. ज्यांच्यात राजीनामे देण्याची हिंमत नाही ते कसले इशारे देतात आणि युती तोडण्याची भाषा करतात? भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि नेते चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केले आहे. युतीमध्ये अडीच अडीच वर्षाचा कसलाही फॉर्म्युला ठरलेला नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे.तसेच उपमुख्यमंत्रीपदही या सरकारमध्ये असणार नाही हेही स्पष्ट केलेले आहे. ज्यांचे जास्त आमदार निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट केले असताना रामदास कदम आणि शिवसेनेचे नेते अडीच वर्षाची कसली गोष्ट करत आहेत? यावरून शिवसेना सत्तेसाठी किती हपापलेली आहे हे स्पष्ट होते. पण मुळातच युतीच्या राजकारणात शिवसेना सपशेल फसलेली आहे. संपूर्ण युतीवर वर्चस्व हे भारतीय जनता पक्षाचेच राहणार आहे. तिथे शिवसेनेला दुय्यमच स्थान राहणार आहे आणि ते भाजपने दाखवून दिले. शिवसेनेला जर वाटते की, महाराष्ट्रात भाजपपेक्षा शिवसेना अधिक मोठी आहे, मोठा भाऊ आहे तर भाजपने नेमके कोण मोठे आहे हे दाखवून दिले. शिवसेना नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली तेव्हा सगळा तपशील देवेंद्र फडणवीस यांनंी सांगितला. त्याला उद्धव ठाकरे यांनी माना डोलावून होकार दिला. म्हणजे शिवसेनेवर युतीत घेऊन भाजपने अनुकंपा केलेली आहे हे बिंबवले. जर शिवसेना मोठा भाऊ असता किंवा त्यांना फार महत्त्व असते तर प्रथम बोलायला दिले असते किंवा जो काही युतीचा निर्णय झाला आहे तो सांगायची संधी उद्धव ठाकरे यांना दिली असती. पण तसे काही झाले नाही, यावरूनच भाजपने शिवसेनेला कसे डॉमिनेट केले हे स्पष्ट झाले होते. जो आत्मविश्वास फडणवीस यांच्या बोलण्यात होता तो उद्धव ठाकरेंच्या बोलण्यात नव्हता, हेही महाराष्ट्राने पाहिले.या पत्रकार परिषदेत सेना-भाजप हे दोघे पक्ष म्हणून तिथे आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बोलायला अधिकार दिला असा प्रोटोकॉल असल्याचे सांगण्याचे कारण नाही. हे काम पक्षाचे होते, सरकारचे नाही. देवेंद्र फडणवीस हे सरकारचे प्रतिनिधी किंवा मुख्यमंत्री म्हणून नाही तर भाजपचे नेते म्हणून तिथे आले होते. अशा बैठकीत आणि नंतरच्या पत्रकार परिषदेत भाजपने काय ठरवले आहे ते सांगितले. युती झाल्याचे भाजपने सांगितले आणि शिवसेनेने त्यांना होकार दिला. आपल्याला पाहिजे ते भाजपने करून दाखवले आणि शिवसेनेने ते करण्यास दिले. त्यावेळी भाजपने मुख्यमंत्रीपदावरचा कुठलाही हक्क सोडल्याचे सांगितले नाही किंवा अडीच अडीच र्वष दोघे घेणार असल्याचेही सांगितले नव्हते. ज्यावेळी पन्नास टक्के जागा दोघे वाटून घेणार सांगितले त्याचवेळी ते अडीच वर्ष आम्ही मुख्यमंत्रीपद वाटून घेऊ असेही सांगितले असते. पण तसे काहीच झाले नाही, त्यामुळे गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्या रामदास कदम यांच्या अंगाचा तिळपापड झाला. शिवसेनेला सत्तेची किती हाव सुटली आहे हे यातून दिसून येते. स्वबळाची भाषा करून आपण स्वबळावर निवडून येणार नाही याची जाणीव झाली आणि अवसानघातकी शिवसेनेने भाजपपुढे सत्तेसाठी लोटांगण घातले. या लाचारीमुळे पत्रकार परिषदेत आपल्याला पाहिजे तेवढेच मुद्दे भाजपने सांगितले. त्याला फक्त होला हो म्हणण्यापलीकडे शिवसेनेला कसलीही किंमत दिलेली नव्हती.त्यामुळे डॉमिनेट झालेल्या सेनेच्या सैरभैर नेत्यांनी अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगायला सुरुवात केली. पण भाजपने जेव्हा जेव्हा असा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला उत्तर प्रदेश, कर्नाटकात वापरला आहे तेव्हा मित्र पक्षाची पुरती वाट लागलेली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे काय होणार हे पाहावे लागेल.