कितीही आम्ही मोठा भाऊ आहोत असा आव आणण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आणि भारतीय जनता पक्षाला कमी लेखण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला तरी आज परिस्थिती अशी आहे की, भारतीय जनता पक्षावर शिवसेना पूर्णपणे अवलंबून आहे. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेतील प्रश्न सोडवता येणे शक्य नसल्याने त्यांना घडोघडी भाजपची आणि विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मदत घ्यावी लागत आहे. शिवसेनेत निर्माण झालेल्या पेचप्रसंगांनाही सामोरे जाण्यासाठी भाजपचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद नेमकी काय आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यापेक्षाही पक्षप्रमुखपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांना झेपत नसल्याचेच स्पष्ट होत आहे. स्वबळाची भाषा सेनेतील काही हट्टी नेत्यांच्या आग्रहाने केली आणि नंतर तोंडावर आपटले. युती करून आता युतीसाठी ‘प्राण घेतले हाती’ असा सूर आळवायला सुरुवात केली. या युतीच्या फॉम्र्युल्यात भाजपला २५ आणि शिवसेनेला २३ जागा देण्याचे ठरले. परंतु शिवसेनेला २३ उमेदवार उभे करण्यासाठी उमेदवारही मिळू शकत नाहीत हे लक्षात आले.पहिल्याच शुभारंभाच्या प्रचारसभेत कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांना त्याची कबुलीच द्यावी लागली. त्यानंतर वारंवार शिवसेनेला भाजपच्या आधाराशिवाय काही करता येणार नाही याची जाणीव झाली. सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला उमेदवार मिळेनासा झाला. त्यामुळे त्यांनी चक्क भारतीय जनता पक्षाचे माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना मागून घेतले. आम्हाला उमेदवार मिळत नसल्याने तुमचा उमेदवार आमच्या तिकिटावर लढवण्यासाठी द्या, असे मागण्याची वेळ शिवसेनेवर आली. मग कशासाठी हा अट्टहास होता? सरळ हा मतदारसंघ भाजपलाच सोडून द्यायचा होता. ही काही पहिली वेळ नाही. २०१४ लाही शिवसेनेला साता-यात उमेदवार मिळत नव्हता. २००९ ला ज्यांनी चांगली लढत दिली होती त्या सेनेच्या उमेदवाराला नाकारण्याचे काम सेनेने केले. त्यामुळे हा मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी आठवले गटाला सोडण्याचे औदार्य शिवसेनेने दाखवले. आताही हे औदार्य दाखवण्याची हिंमत न करता थेट भाजपकडून उमेदवार मागून घेऊन आपले चिन्ह साता-यात शिल्लक ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेनेने केला. ही अत्यंत केविलवाणी बाब म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे सेनेला भाजपचा पांगुळगाडा घेतल्याशिवाय आता चालता येणार नाही हे नक्की झाले.त्यामुळे शिवसेना चालवण्यास उद्धव ठाकरे सक्षम नाहीत हेच यातून दिसून येते. हे इथवरच थांबले नाही. शिवसेनेला पालघरमध्येही उमेदवार मिळत नव्हता. पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपकडे असताना हट्टाने सेनेने मागून घेतला. पण नुसता मतदारसंघ मागण्यापुरते हे मर्यादित राहिले नाही, तर आम्हाला तुमचा उमेदवारही द्या असे म्हणण्याची नामुष्की आली. भाजपने पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव केला होता. त्या निवडणुकीत राजेंद्र गावित हे काही महिन्यांपूर्वीच इथून निवडून आले होते. परंतु शिवसेनेला उमेदवार नसल्याने राजेंद्र गावित यांना उमेदवार म्हणून मागून घेतले आणि आपल्या पक्षातून ही उमेदवारी दिली जावी, अशी मागणी केली. ही शिवसेनेची हतबलता होती. पोटनिवडणुकीत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात यावा यासाठी भाजपचा संभाव्य उमेदवार शिवसेनेने पळवला होता. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना सेनेत प्रवेश करायला भाग पाडून सहानुभूतीच्या लाटेवर आपला खासदार निवडून आणायचा हा होरा शिवसेनेने मांडला होता. पण भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या स्वप्नाला सुरुंग लावला होता. राजेंद्र गावित यांना भाजपची उमेदवारी देऊन भाजपचेच इथे वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे आताही शिवसेनेला इथून विजयी व्हायचे असेल, तर भाजपशिवाय पर्याय नाही हे दाखवून दिले होते. शिवसेनेला भाजपच्या बोळय़ाने दूध पिण्याची वेळ इथे आली. हे इथवर थांबत नाही. भाजपवरच शिवसेनेची सगळी भिस्त आहे हे स्पष्ट झाले आहे. याचे आणखी एक कारण शिवसेनेचे अंतर्गत रुसवे-फुगवे काढायलाही देवेंद्र फडणवीस यांची मदत सेनेला लागत आहे.उस्मानाबादचे रवींद्र गायकवाड हे नाराज झाल्यावर सोमवारी दुपारी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी दुपारी केला. परंतु ही समजून निघाली नाही, त्यामुळे ते काम करण्याची जबाबदारी भाजप नेत्यांवर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत रात्री १२ वाजता शिवसेनेचे नेते रवींद्र गायकवाड यांच्यासह आले. त्यांची समजून काढून फडणवीस यांनी सेनेला वाचवले. त्यामुळे आज शिवसेना पूर्णपणे दुर्बल झालेली असून कसलाही दम सेनेत उरलेला नाही. सेनेचे तारणहार म्हणून देवेंद्र फडणवीस यांना काम करावे लागते आहे हे शिवसेनेचे अपयश आहे. शिवसेनेने जेवढी भाजपवर युती होण्यापूर्वी टीका केली तेवढी शिवसेनेला ती आता भोवती आहे. घडोघडी भाजपचे पाय धरावे लागत आहेत. आपली मर्यादा ओळखण्याची गरज आहे हे शिवसेनेच्या नेत्यांना समजले नाही. त्यामुळे मानसिक पराभवाच्या भूमिकेत वावरण्याची नामुष्की आज त्यांच्यावर आली आहे. आभाळच फाटलं तर ठिगळ लावायचं तर कुठून या म्हणीप्रमाणे शिवसेनेच्या नाकर्तेपणाचे हिशोब आता निवडणुकीच्या निमित्ताने पुढे येताना दिसत आहेत. मुळातच शिवसेना सत्तेत राहून आपल्याच सरकारवर टीका करत आहे, हे शिवसेनेच्याच खासदारांना मान्य नव्हते. केंद्रात सरकारमध्ये असताना त्याच सरकारवर आपण टीका करायची घेतलेली भूमिका खासदारांना मान्य नव्हती. या खासदारांच्या दबावामुळेच तर शिवसेनेला युती करणे भाग पडले.आज प्रत्येकवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माफी मागावी लागते आहे, सारवासारव करावी लागते आहे. पूर्वी जे झाले ते झाले आता आम्ही एक आहोत हे प्रत्येकवेळी सांगावे लागते आहे. कोल्हापूरच्या सभेतही तेच सांगितले. आज मातोश्रीवर राजेंद्र गावितांची उमेदवारी जाहीर केली तेव्हाही तीच कबुली द्यावी लागली. हे अत्यंत लज्जास्पद आहे. एक काळ असा होता की, शिवसेनेचे नेते ताठमानेने जगत होते. आज त्यांच्यावर खंबीर नेतृत्वाअभावी असे लाचारपणे वागण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे भाजपच्या आधाराने जगावे लागत आहे.
27/03/2019