विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आगामी काळात अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. सुजय यांच्या निर्णयामुळे पारनेर तालुक्यातील काँग्रेस पक्ष संपुष्टात आला आहे. एवढेच नव्हे तर राज्यातही काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. सुजय किंवा एकूणच विखे घराण्याला असलेल्या बंडखोरीच्या इतिहासामुळेच नव्हे, तर विखे घराण्याविषयीच्या रागामुळे शरद पवार यांनी अहमदनगर दक्षिण मतदारसंघ काँग्रेसला देण्याचे नाकारण्याबरोबरच सुजय यांना राष्ट्रवादीत घेणेही टाळले. बाळासाहेब विखे यांनी शरद पवारांचे राजकारणच संपवण्याच्या केलेल्या प्रयत्नांचे शल्य पवारांच्या मनात आजही कायम आहे.विखेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराच्या सांत्वनालाही पवार गेले नाहीत. २८ वर्षापूर्वीची मनातील सल कायम ठेवून विखेंचा नातू डॉ. सुजय याला राजकारणात पावन करून घेण्यास मदतीचा हात देण्यास नकार देतात, तेव्हा राजकारणातील शत्रुत्व किती टोकदार असते, याचा प्रत्यय दिसून येतो. राजकारणात कोणीही कोणाचा दीर्घकाळ मित्र वा शत्रूही नसतो, असे कोणी कितीही सांगत असले तरी यानिमित्ताने राजकीय शत्रुत्वाचा एक नवा अध्याय महाराष्ट्राने पाहिला. राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर दक्षिणेची जागा काँग्रेसला सोडली नाही, त्यामुळे संतप्त विखे समर्थक काँग्रेस आघाडीचा धर्म पाळण्याची सुतराम शक्यता नव्हती आणि झालेही तसेच. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील तणावामुळेच गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला. डॉ. सुजय हे विखे घराण्याच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी. शिक्षणाने डॉक्टर आहेत, पण डॉक्टर म्हणून व्यवसाय करण्याची वेळ त्यांच्यावर कधी आलीच नाही. राजकारणातच त्यांना अधिक रस. त्यामुळे त्यांचा वेश, पोशाखही तसाच. बाळासाहेबांच्या माध्यमातून विखे घराण्यात सलग ४० वर्षे खासदारकी होती. बाळासाहेब असतानाच ती गेली होती. त्याची फार मोठी खंत विखेंना होती. सुजयच्या रूपाने पुन्हा खासदारकी घरात यावी यासाठी सुजय यांनी राजकारणातील आपला रस कधीही लपवून ठेवला नाही. याही बाबतीत त्यांनी आजोबांचाच वारसा चालवला. अहमदनगर दक्षिण हा मतदारसंघ त्यांना सोयीचा वाटला. तिथे त्यांनी मागील दोन वर्षापासून लक्ष घालण्यास सुरुवात केली.वडील काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते असल्याने आपल्याला उमेदवारी मिळणारच असा त्यांचा ग्रह असेल, पण राजकारण म्हणजे काय याचा पहिला धडा त्यांना उमेदवारीसाठी धडपड करावी लागली तेव्हाच मिळाला. राष्ट्रवादीने मतदारसंघ बदलासाठी नकार दिला. पण सुजय मागे हटले नाहीत. त्यांनी आपल्या घराण्याचा बंडखोरीचा मार्ग चोखाळला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. विखे कुटुंबाची बहुतांश कारकीर्द काँग्रेस पक्षात बहरली. काँग्रेसच्याच आशीर्वादाने बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे यांनी सत्तेची फळे चाखली, आजही चाखत आहेत. असे असताना केवळ ईष्र्येपोटी सुजयने विरोधी विचारांच्या पक्षाच्या वळचणीला जाण्याचा आपल्या घराण्याचा वारसा त्यांनी जपला. युती सरकारच्या काळात बाळासाहेब विखे व राधाकृष्ण विखे या पिता-पुत्रांनी शिवसेनेचे धनुष्य हातात घेतले होते. मात्र, काँग्रेसी राजकारणात हयात घालवलेल्या या मंडळींनी मंत्रीपद सांभाळल्यानंतर पुन्हा घरवापसी केली. आता सुजयच्या रूपाने विखे घराण्याने बंडखोरीची पुनरावृत्ती केली आहे. अर्थात पक्षनिष्ठेपेक्षा निवडणूक व राजकारण महत्त्वाचे असल्याचाच संदेश विखे घराण्याने पुन्हा एकदा दिला आहे. सुजय यांनी धूर्तपणे गेल्या दोन-अडीच वर्षापासून आपल्या नावाची हवा तापवत ठेवली. इथेही त्यांनी राजीव गांधी यांच्याविरोधात दिल्लीमध्ये खासदारांचा ‘विचार मंच’ स्थापन करणारे त्यांचे आजोबा बाळासाहेब विखेंचाच कित्ता गिरवला. त्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा कार्यरत केली.वडील काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते, तर आई जिल्हा परिषदेत काँग्रेसचीच अध्यक्षा असतानाही सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विखे घराण्याला असलेल्या बंडखोरीच्या इतिहासाची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. बाळासाहेब विखे-पाटील यांनी १९७८ मध्ये काँग्रेसच्या विरोधात महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस स्थापन केली. १९८९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरोधात व्ही. पी. सिंग यांना पुढे करत व काही खासदारांना बरोबर घेत राजीव गांधींविरोधी फोरम तयार केला. १९९५ मध्ये राज्यात सेना-भाजप सत्ता आल्यानंतर सत्तेसाठी याच विखे परिवाराने शिवसेनेत प्रवेश केला होता. १९९० ते २०१९ पर्यंत यांची काँग्रेस पक्षविरहित जिल्हा विकास आघाडी अहमदनगर जिल्ह्यात कायम कार्यरत ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्षविरोधी भूमिका घेतली. अहमदनगर जिल्हा परिषदेत १९९७ मध्ये अध्यक्षपदी सव्वा वर्ष सत्यजीत तांबे व सव्वा वर्ष शालिनी विखे यांची निवड ठरली असताना, राजीनामा न देता पक्षादेश झुगारला. २००९ च्या जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप-सेनेला बरोबर घेत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यजीत तांबे यांचा पुन्हा पराभव केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभवानंतर बाळासाहेब विखे यांनी काँग्रेसने भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, असे विचित्र आवाहन केले व भाजप प्रवेश करण्याचा दबाव टाकून मुलगा राधाकृष्ण विखे यांच्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळवले.राधाकृष्ण व मुख्यमंत्र्यांचे कायम हितसंबंध चांगले राहिले व मुख्यमंत्र्यांकडून ‘कामे’ करून घेतली. मला भाजप हा पक्ष घरच्यासारखा वाटतो, असे सांगून कायम संभ्रमावस्था निर्माण केली. मुळातच, राजकारणातील घराणेशाहीचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी, सर्व सत्तापदे आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी, पुढच्या पिढीला ती विनासायास उपलब्ध करून देण्यासाठी दिग्गज नेत्यांची धडपड सुरू असते. तोच प्रकार विखेंच्या घराण्यात दिसून येतो. विचार पायदळी तुडवून, विरोधी विचारांना शरण जाण्यापर्यंतची लाचारी विखे घराण्याने अनेकवेळा स्वीकारलेली आहे. घराणेशाहीच्या या मनमानीला, बेबंदशाहीला चाप बसवण्याची ताकद लोकशाहीने मतदारांना दिलेली आहे. ही ताकद ओळखून मतदारांनीच त्याचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे. दुसरीकडे उमेदवार आयात करून बालेकिल्ले तयार करण्याचे भाजपचे धोरण अजबच आहे. विखे-पाटील भाजपमध्ये किती दिवस थांबणार, हे ते स्वत:देखील सांगू शकणार नाहीत. त्यामुळे भविष्यात विखे घराण्याने पुन्हा बंडखोरीचा वारसा जपल्यास नवल वाटणार नाही.14 march