सध्या देशभरात १७व्या लोकसभा निवडणुकीचे रणांगण तापले आहे. सरकारसह सगळे राजकीय पक्ष, शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा सगळेजण गुंतले आहेत. त्याचाच फायदा काही वाईट शक्ती घेण्याची शक्यता असल्याने प्रत्येकाने सध्या सावध राहण्याची आवश्यकता आहे. गेल्या महिना, दीड महिन्यापासून देशातील सीमेवर भारत-पाक संबंध तणावाचे आहेत. सतत दहशतवादी हल्ले होत आहेत आणि सीमेवर रोज आपले जवान शहीद होत आहेत. काश्मीरमध्ये नित्याच्या घटनांप्रमाणे लष्करी कारवाई सुरू आहे. त्याचवेळी संपूर्ण देशभर निवडणुकीचे रण पेटले आहे. या गाफील अवस्थेतच कोणताही दगाफटका, दहशतवादी हल्ला होऊ शकतो. यासाठी प्रत्येकाने सावध असणे आवश्यक आहे. सोमवारीच दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याचा आयएस आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला घडवण्यात येणार आहे. विशेषत: दिल्ली, मुंबई आणि गोव्यातील हदुदी लोकांच्या धर्मस्थळांवर दहशतवादी हल्ला करण्याचा आयएस आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांचा प्रयत्न आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच प्रत्येकाने सावध असण्याची आवश्यकता आहे. गर्दीच्या ठिकाणी सावधपणे वावर असणे आणि कोणत्याही संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तूची माहिती न घाबरता पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे. गुप्तचर यंत्रणांकडून संभाव्य हल्ल्यांबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांसाठी दहशतवादी एखाद्या वाहनाचा किंवा चाकूचा वापर करण्याची शक्यता आहे. ही माहिती मिळाल्यानंतर इस्रयली दूतावास, मुंबईतील दूतावास तसेच यहुदी लोकांची धर्मस्थळे, सिनेगॉग्स आणि छाबड हाऊस अशा ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिल्या आहेत; परंतु आपणही जागृत असणे आवश्यक आहे. कोणतेही बेवारस वाहन, कार उगाचच आपल्या आसपास पार्क केलेली नाही ना, गर्दीच्या ठिकाणी असे संशयास्पद वाहन कुठे नाही ना यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.परीक्षांचा हंगाम, कडकडीत उन्हाळा, त्यात निवडणुकांच्या प्रचारफे-या आणि सभा यामध्ये सगळेजण गुंतलेले आहेत. या गुंतलेल्या यंत्रणेमुळे थोडा बेसावधपणा येण्याची शक्यता असते. किंबहुना राजकीय सभा, दंगे होऊ नयेत यासाठी पोलिसांना घ्यावी लागणारी काळजी, यामुळे संरक्षण आणि सुरक्षा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत आहे. याचाच फायदा काही वाईट शक्ती उठवण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येकाने कोणताही अनुचित प्रकार होऊ न देता या निवडणुका पार पाडण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे. पाकपुरस्कृत दहशतवादी या काळात सक्रिय होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचाराच्या गर्दीत घुसून, भांडणतंटे निर्माण करून दंगल घडवणे आणि त्याचा लाभ उठवण्याचे प्रकार होऊ शकतात. यासाठी प्रत्येकाने सावध असण्याची गरज आहे. २० मार्च या दिवशी यांपैकी पहिली माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली. यात न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या संभाव्य हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांना विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयएस या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता अबू हसन अल-मुहाझीर याची न्यूझीलंडमधील हल्ल्याचा बदला घेण्याचे आवाहन करणारी एक ऑडिओ क्लिप दहशतवाद्यांचे ऑनलाईन ग्रुप आणि विविध चॅट प्लॅटफॉर्मवर वितरित करण्यात आली आहे.या ऑडिओ क्लिपसह दहशतवादी संघटनांच्या समर्थकांनीही असा बदला घेण्याला दुजोरा दिलेले व्हीडिओही दहशतवाद्यांमध्ये फिरत आहेत. यावरून आपण सावध असण्याची गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे. निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोप, गदारोळ, टीकास्त्रांमुळे परस्परांवरील चिखलफेकीमुळे दोन गटांमध्ये दंगली झाल्याचा आभास निर्माण करून कोणीतरी दुष्प्रवृत्तीचा अतिरेक करत नाही ना, यावर लक्ष ठेवले पाहिजे. दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरातील विविध धार्मिक स्थळांभोवतीची सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर दहशतवाद्यांनी आपला कारनामा सुरूच ठेवला आहे. गुप्तचर यंत्रणांना २३ मार्च या दिवशी मिळालेल्या माहितीनुसार, अल कायदा या दहशतवादी संघटनांचा यहुदी लोकांची निवासस्थाने आणि त्यांचे धार्मिक स्थळ सेनेगॉग्सवर हल्ले करण्याचा प्रयत्न असणार आहे. हा हल्ला करताना जुन्या पद्धतीऐवजी नव्या साधनांचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. या हल्ल्यात चाकू, कार किंवा ट्रकचा वापर केला जाऊ शकतो अशीही माहिती हाती आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे. भारतातील नागरिकीकरण खूप वाढले आहे.केवळ दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई हीच महानगरे न राहता आता पुणे, औरंगाबाद, हैदराबाद अशी अनेक मोठी शहरे महानगरे बनत आहेत. या महानगरांमधून संपूर्ण देश-विदेशातून लोक नोकरी, कामधंदा, शिक्षणासाठी येत असतात. या लोंढय़ांवर नियंत्रण ठेवणे शक्य नसले तरी त्या लोंढय़ांतूनच कोणीतरी घातक शक्ती येऊ शकतात. कही पे निगाहे, कही पे निशाना म्हणतात, त्याप्रमाणे मुंबई, दिल्ली, गोवा यांची नावे घेऊन सुरक्षाव्यवस्था तिकडे वळवून अन्य शहरांमध्येही असे हल्ले होऊ शकतात. यासाठी प्रत्येकाने सावध असले पाहिजे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील संभाव्य हल्ले विशिष्ट ठिकाणी केले जाणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. मात्र, माहितीत उल्लेख असलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या ठिकाणांवरही पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. इस्रयल दूतावासाबाहेर पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे; परंतु केवळ पोलीसच नाही, तर प्रत्येकाने सजग असले पाहिजे. सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या देशातील लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे. या गर्दीत हौशे, गवशे, नवशे येतील. त्यातील नेमके कोण आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.या लोकशाहीच्या उत्सवाला, निवडणुकांना कसलेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलीसच नाही, तर नागरिकांनीही सज्ज असले पाहिजे. आपल्याकडे निवडणुकीच्या काळात नक्षलवादी हल्ले नेहमीच होतात. अनेक सुरक्षारक्षक, पोलिसांना यात प्राण गमवावे लागले आहेत. मतदान केंद्रांवर हल्ले करण्याच्या धमक्या नक्षलींकडून नेहमीच येत असतात. त्याचप्रमाणे आता या बाहेरच्या दहशतवादी शक्तीही त्याचा गैरफायदा उठवणार नाहीत यासाठी सावध राहण्याची हीच वेळ आहे.

26 march