रविवार, ३१ मार्च, २०१९
शरद पवारांची हतबलता!
शरद पवार नक्की काय करताहेत? शरद पवार म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात माहीर असलेला आणि पाडापाडीच्या राजकारणात तरबेज असलेला जाणता राजा..! पण पवारांसारखा मुरलेला, बेरका आणि यशस्वी राजकारणी अचानक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार का घेतो? असा सवाल अख्ख्या महाराष्ट्राला पडला आहे. केवळ स्वत:ची माढय़ाचीच उमेदवारी नव्हे, तर पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबतचे सुरुवातीचे वक्तव्य आणि अहमदनगरच्या जागेवरूनही शरद पवारांना कोलांटउडी मारावी लागली. आधी नगरची जागा काँग्रेसला सोडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी असा निर्णय झालेला नसल्याचे सांगितल्यानंतर पवारांनाही तसा खुलासा करावा लागला. राजकारणात आपल्या कलंदर डावपेचातून अनेकांच्या दांडय़ा गुल करण्याची कला अवगत असलेल्या शरद पवार यांच्याही नशिबी अखेर ‘जे पेरले तेच उगवले’ असे म्हणण्याची वेळ यानिमित्ताने आली आहे.मावळ मतदारसंघातून आपले नातू आणि अजित पवारांचे चिरंजीव पार्थ यांना उमेदवारी जाहीर करतानाच शरद पवारांनी माढा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे पवारांच्या निर्णयाविषयी प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आमचा पक्ष लोकशाही मानणारा आहे, असे सांगून या निर्णयाची सारवासारव होईलही, पण ५० वर्षाचे यशस्वी राजकारण करणा-या शरद पवारांवर ‘हेची फळ काय मम तपाला?’ असा प्रश्न स्वत:लाच विचारण्याची वेळ आज आली आहे. आजवरच्या कारकिर्दीत शरद पवारांनी अनेक घरांमध्ये सवतासुभा मांडला. बंडखोरी करायला भाग पाडून भाऊ-भाऊ, चुलता-पुतण्या, सासरा-सून अशा अनेक कौटुंबिक लढती घडवून घराणी फोडली. कराडचे यशवंतराव मोहिते-जयवंतराव भोसले या सख्ख्या भावांमधील संघर्ष, सातारचे अभयसिंहराजे भोसले विरुद्ध कल्पनाराजे भोसले आणि नंतर उदयनराजे भोसले, नंतर शिवेंद्रराजे भोसले विरुद्ध उदयनराजे भोसले, बीडमध्ये गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशा मोठय़ा घराण्यांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण हा तर पवारांच्या हातचा मळ होता. अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यासह अनेक कौटुंबिक लढती लढवत पवारांनी आपले घर शाबूत ठेवले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा