रविवार, ३१ मार्च, २०१९

शरद पवारांची हतबलता!

शरद पवार नक्की काय करताहेत? शरद पवार म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात माहीर असलेला आणि पाडापाडीच्या राजकारणात तरबेज असलेला जाणता राजा..! पण पवारांसारखा मुरलेला, बेरका आणि यशस्वी राजकारणी अचानक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार का घेतो? असा सवाल अख्ख्या महाराष्ट्राला पडला आहे. केवळ स्वत:ची माढय़ाचीच उमेदवारी नव्हे, तर पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबतचे सुरुवातीचे वक्तव्य आणि अहमदनगरच्या जागेवरूनही शरद पवारांना कोलांटउडी मारावी लागली. आधी नगरची जागा काँग्रेसला सोडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी असा निर्णय झालेला नसल्याचे सांगितल्यानंतर पवारांनाही तसा खुलासा करावा लागला. राजकारणात आपल्या कलंदर डावपेचातून अनेकांच्या दांडय़ा गुल करण्याची कला अवगत असलेल्या शरद पवार यांच्याही नशिबी अखेर ‘जे पेरले तेच उगवले’ असे म्हणण्याची वेळ यानिमित्ताने आली आहे.मावळ मतदारसंघातून आपले नातू आणि अजित पवारांचे चिरंजीव पार्थ यांना उमेदवारी जाहीर करतानाच शरद पवारांनी माढा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे पवारांच्या निर्णयाविषयी प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आमचा पक्ष लोकशाही मानणारा आहे, असे सांगून या निर्णयाची सारवासारव होईलही, पण ५० वर्षाचे यशस्वी राजकारण करणा-या शरद पवारांवर ‘हेची फळ काय मम तपाला?’ असा प्रश्न स्वत:लाच विचारण्याची वेळ आज आली आहे. आजवरच्या कारकिर्दीत शरद पवारांनी अनेक घरांमध्ये सवतासुभा मांडला. बंडखोरी करायला भाग पाडून भाऊ-भाऊ, चुलता-पुतण्या, सासरा-सून अशा अनेक कौटुंबिक लढती घडवून घराणी फोडली. कराडचे यशवंतराव मोहिते-जयवंतराव भोसले या सख्ख्या भावांमधील संघर्ष, सातारचे अभयसिंहराजे भोसले विरुद्ध कल्पनाराजे भोसले आणि नंतर उदयनराजे भोसले, नंतर शिवेंद्रराजे भोसले विरुद्ध उदयनराजे भोसले, बीडमध्ये गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशा मोठय़ा घराण्यांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण हा तर पवारांच्या हातचा मळ होता. अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यासह अनेक कौटुंबिक लढती लढवत पवारांनी आपले घर शाबूत ठेवले.
पण आता उतारवयात ‘हेची फळ काय मम तपाला’ असेच म्हणायची वेळ त्यांच्यावर आली. ही हतबलता फार भयानक आहे. पवार घराण्यातील मतभेद, बदललेली राजकीय परिस्थिती याचबरोबर राज्यसभेची गमवावी लागणारी जागा अशा काही कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाला लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्याची चर्चा आहे. या निर्णयामुळे त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत वारंवार दाखविलेली स्वत:बद्दलची अनिश्चितताही कायम ठेवली आहे. यामुळे पक्षात मात्र अजित पवारांचे वर्चस्व वाढत चालल्याचे दिसत आहे. शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र यांचे चिरंजीव रोहित पवार पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. रोहित हे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असून, पवार घराण्यातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. भविष्यात ते पवारांचा वारसा चालविणार असल्याची चर्चा होती. यामुळे अजित पवार व त्यांचे चिरंजीव पार्थ अस्वस्थ झाले होते. त्यातच पार्थ यांना मावळ मतदारसंघामधून लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली होती. हे सुरू असतानाच पवार यांनी माढय़ातून आपली उमेदवारी जाहीर केली.
आपली उमेदवारी जाहीर करतानाच, या लोकसभा निवडणुकीत आपण आणि आपल्या कन्या सुप्रिया सुळे हे दोनच पवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, असे सांगण्यासही ते विसरले नव्हते. साहजिकच, पार्थ यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच अडचणीत आल्याची भावना अजित पवार समर्थकांमध्ये पसरली होती. पवार यांनी माढय़ातून उमेदवारी मागे घेण्यामागे पवार कुटुंबातील तणाव हे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. माढा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती गेल्या दहा वर्षात वेगाने बदलत आहे. २००९ मध्ये पवार यांनी येथून पहिल्यांदा निवडणूक लढवताना आपला पारंपरिक बारामती मतदारसंघ कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी मोकळा करून दिला होता. २०१४ मध्ये मोदी लाट असताना मात्र पवारांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही, असे सांगून राज्यसभेवर जाणे पसंत केले होते. मात्र, मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढय़ातून विजयश्री खेचून आणली होती. यावेळी शरद पवार यांनी पुन्हा आपली उमेदवारी जाहीर केल्याने विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे चिरंजीव रणजितसिंह नाराज झाले होते.
पवार यांनी उमेदवारी स्वीकारल्यास माढय़ातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मतभेदांचा फटका त्यांना बसू शकेल, असे वातावरण तयार झाले होते. फलटणच्या कार्यकर्ता मेळाव्यात पवारांसमोरील कागद हिसकावून त्यांचे भाषण रोखण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली होती. या पार्श्वभूमीवर विजयासाठी याच मतदारसंघात अडकून पडावे लागेल, याचीही भीती शरद पवारांना होती. माढा मतदारसंघातील गटबाजीमुळे पवार हतबल झाले. उतारवयात पराभवाचा बट्टा लागू नये म्हणून त्यांनी रिंगणातून माघार घेतली. अजित पवारांनी आपली ताकद दाखवून दिली असतानाच पवारांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी ‘साहेबांनी फेरविचार करावा’ अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून शरद पवार यांनी केलेल्या राजकारणाचा आम्हाला अभिमान आहे. त्याच्या प्रत्येक निर्णयाचा आम्ही आदर करतो. पण आदराच्या पुढेही एक प्रेम असते. त्या प्रेमाखातर माझ्यासह असंख्य कार्यकर्त्यांना वाटते की निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा.
एकीकडे अजित पवारांकडून दबाव आलेला असताना दुसरीकडे रोहित पवारांनी फेरविचार करण्याचा दिलेला सल्ला पाहता पवार कुटुंबात एकवाक्यता नसल्याचे दिसते. शरद पवारांच्या निर्णयाला कुटुंबातील राजकीय वर्चस्वाच्या वादाचीही किनार दिसते. रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट त्याचेच द्योतक आहे. मावळ मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे हे लक्षात घेऊन शेकाप नेत्यांच्या तोंडून पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर करून अजित पवारांनी शरद पवारांवर एकप्रकारे दबाव आणला. यापूर्वी दोन वेळा आझम पानसरे, राहुल नार्वेकर हे उमेदवार फसल्यावर आता घरचा उमेदवार देण्यासाठी अजित पवारांनी दबाव निर्माण केला. या कौटुंबिक दबावापुढे पवारांना नमते घ्यावे लागले, हेच यातून दिसून येते. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा शब्द अंतिम मानला जातो, त्याच पक्षाच्या घडय़ाळाला आता कोण चावी देणार याचेही चित्र यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
13 march

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: