जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावात चीनने खोडा घातल्यामुळे चीनने भारताशी पारंपरिक शत्रुत्व असल्याचे दाखवून दिले आहे. हिंदी-चिनी भाई भाई या गाजलेल्या वाक्यानंतर चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता. त्याचीच ही पुनरावृत्ती झाली असे म्हणावे लागेल. म्हणूनच पाकिस्तानशी जरी शस्त्राने लढा देत असलो, तर चीनची आर्थिक कोंडी कशी करता येईल याचा आता विचार करावाच लागेल. मसूद अझहर संदर्भातील चीनची भूमिका निराशाजनक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच या प्रस्तावात भारताची साथ देणा-या देशांचेही परराष्ट्र मंत्रालयाने आभार मानले आहेत; परंतु साथ देणा-यांपेक्षा साथ न देणा-यांचा विचार जास्त करावा लागेल हे निश्चित. कारण, हा सुप्त ज्वालामुखी पाकच्या आडून भारताला त्रासदायक ठरू शकतो. किंबहुना पाकिस्तानची ढाल बनण्याचे काम चीन करू शकतो, म्हणूनच यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.चीनला जी भारताची फार मोठी बाजारपेठ मिळाली आहे, ती बंद करून चीनची आर्थिक कोंडी करणे ही काळाची गरज आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला. बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीपुढे चीनने पुन्हा एकदा नकाराधिकाराचा वापर केला आणि मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा भारताचा प्रयत्न चौथ्यांदा अपयशी ठरला. त्यामुळे चीन हा आपला शेजारी असला तरी शत्रुराष्ट्रच आहे आणि पाकिस्तानप्रमाणेच त्याच्याकडे पाहणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाला पाठीशी घालणारा चीन हा या भूमिकेमुळे दहशतवादाचे समर्थन करणारा देश ठरतो. याचे कारण आशियाई देशात गेल्या पंचवीस वर्षात अनेक दहशतवादी हल्ले झाले. भारत, पाक, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश सर्वाना दहशतवादाची झळ पोहोचली आहे. सर्वाधिक झळ भारताला पोहोचली आहे. पण, चीनला मात्र कधीही दहशतवादाची झळ सोसावी लागली नाही. असे हल्ले, बॉम्बस्फोट कधी चीनमध्ये झालेले नाहीत.त्यामुळे त्यांना या दहशतवादाचे महत्त्व समजलेले नाही. याउलट या दहशतवादामुळे भारत-पाक संबंध तणावाचे राहिले, तर आपल्याकडून पाक शस्त्रास्त्र खरेदी करेल आणि आपल्याकडील हा उद्योग भरभराटीस येऊन आर्थिक सुबत्ता येईल, असे चीनचे धोरण आहे. जे भांडवलदार अमेरिकेने सातत्याने केले आहेत, तेच चीन करत आहे हे यातून स्पष्ट होते. म्हणूनच अझहर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या भूमिकेत चीनने आपली भूमिका भारत विरोधी घेतली. यामुळे आता चीनशी फाजील जवळीक करणा-या भाजपने सावध राहायला पाहिजे. आपली याबाबत एक राष्ट्रीय भूमिका स्पष्ट करत चीनची कोंडी करण्याचे धोरण आखले गेले पाहिजे, तरच चीनला वठणीवर आणता येईल. संयुक्त राष्ट्रातील या घडामोडींवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे, ती मन सुन्न करणारी आहे. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवता न आल्याने आम्ही निराश झालो आहोत. यामुळे पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यासाठी कारणीभूत असलेल्या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाला कारवाई करता आली नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. हे फार मोठे अपयश या सरकारचे आहे, असे म्हणावे लागेल. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौ-यांचे, चीनच्या दौ-यांचे नेमके फलित काय, असा प्रश्न यातून निर्माण झालेला आहे. मसूद अझहरविरोधातील प्रस्तावात भारताला पाठिंबा देणा-या देशांचेही परराष्ट्र मंत्रालयाने आभार मानले आहेत. दहशतवादी संघटनेच्या नेत्यांविरोधात भारत नेहमीच कठोर भूमिका घेत राहणार आणि या नेत्यांवरील कारवाईसाठी भारताचे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील, असेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले; परंतु आता हे युद्ध फक्त भारत-पाक सीमेपुरते मर्यादित राहिलेले नाही. हे युद्ध भारताबाहेर छेडायचे युद्ध राहिलेले नाही, तर भारतात घुसलेल्या चीनची घुसखोरी थांबवून त्यांची आर्थिक कोंडी केली पाहिजे.आज आपल्या जीवनाचाच एक भाग चिनी मार्केट बनला आहे. या चिनी उत्पादनांवर बंदी घालून त्यांची आर्थिक कोंडी केली पाहिजे. गेल्या वीस वर्षात इतका बदल झाला आहे की, आपल्याकडे उल्हासनगरला काही वर्षापूर्वी जपानी मार्केट होती. आता चायना मार्केट आहे. फक्त इलेक्ट्रॉन्सिस नाही, तर खाण्या-पिण्यापासून ते आमच्या देवधर्मापर्यंत प्रत्येक गोष्टीत चीन घुसला आहे. या चीनचे हे मार्केट बंद करून, चिनी मालावर बंदी घालून चीनचे ते नकटे नाक कापून काढण्याची वेळ आली आहे. गेल्या वीस वर्षात आम्ही इतके चीनमय झालो आहोत की घरात आमच्या फेंगशुई या चिनी वास्तुशास्त्राची घुसखोरी झाली. चिनी देव आमच्या घरात घुसले. लाफिंग बुद्धा, तीन पायांचा बेडूक, कासव, घंटा आणि बरेच काही. आमच्या उत्सवातील डेकोरेशन आणि विद्युत रोषणाईतही चीन चमकू लागला. फटाक्यांच्या आतषबाजीतही चिनी फटाके आले. आहारात तर घुसले आहेतच, पण चायना सिल्क साडी, चायनीज कुरता हे वस्त्रप्रावरणही बदलले. चिनी महिला कुठे साडय़ा नेसतात, तेव्हा आपण मेड इन चायना साडी खरेदी करायची? हे जे सांस्कृतिक आक्रमण आमच्यावर झाले आहे, ते फार म्हणजे फार भयानक आहे. चीनच्या आर्थिक पारतंत्र्यात आम्ही आहोत. आमच्या उद्योगांवर अन्याय करत आहोत. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया हे सगळे देखावे झाले. त्यातले प्रत्यक्षात काय झाले हे समोर येत नाही. म्हणूनच सरकारने चीनला नमवण्यासाठी आणि आपल्या बाजूने वळवण्यासाठी आता आर्थिक कोंडी करण्याची वेळ आली आहे. विरोधकांना कमजोर करण्यासाठी नोटाबंदीसारखे उपाय योजून जशा आर्थिक नाडय़ा आवळल्या, तशाच आता देशविरोधी असलेल्या आणि दहशतवादाला खतपाणी घालणा-या चीनच्या आर्थिक नाडय़ा कशा आवळता येतील, याचा विचार आता सरकारने केला पाहिजे. स्वस्तातला चिनी माल हद्दपार करून देशी मालाला प्रोत्साहन देत आता चिनी मालाची होळी करण्याची वेळ या होळीला आली आहे, हे लक्षात घेणार कधी?15 march
रविवार, ३१ मार्च, २०१९
चीनची कोंडी करण्याचा विचार करा!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा