पहलगाम काश्मीरमधील हल्ल्याला प्रत्युत्तर केवळ पाकिस्तानला ठेचून नाही तर आम्ही इथला रोजगार बंद पडू देणार नाही हे दाखवून देण्याची वेळ आहे. दहशतवादाशी सामना करायला आम्ही सज्ज आणि भक्कम आहोत, आम्ही इथले उद्योग, व्यवसाय बंद करणार नाही आणि काश्मीर सोडून पळून जाणार नाही हे ठामपणे जिहादी, पाकिस्तानी दहशतवाद्यांना दाखवून देण्याची आवश्यकता आहे.
काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यावर काश्मीरमध्ये चांगले वातावरण तयार झाले. काश्मीरमध्ये सात दशकांनंतर तिरंगा फडकला आणि विकासाचे एक नवे पर्व सुरू झाले. पण याचेच दु:ख काही प्रवृत्तींना झाले. यात पाकिस्तानबरोबरच भारतातील काही दुष्ट जिहादी शक्तीही असू शकतात. काही राजकीय विरोधी पक्षही यात खोडा घालणारे आहेतच. पण हा झालेला हल्ला म्हणजे इथल्या रोजगारावर झालेला हल्ला आहे.
३७० कलम हटवल्यावर भारतातील विविध राज्यांतील उद्योजक व्यावसायिकांनी तिथे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. गेल्या तीन वर्षांत दरवर्षी सरासरी २५ लाख पर्यटक इथे भेट देऊ लागले. इथे रोजगार वाढू लागला. उलाढाल वाढू लागली. हॉटेल, चित्रपटगृहे विकसित झाली. पर्यटकांना आकर्षित करणारी यंत्रणा वेगाने वाढू लागली आणि इथला विकास होऊ लागला. त्यामुळे इथली जनता आनंदात असल्याचे दहशतवाद्यांना बघवले नाही. काश्मीर उजाड करायचे आणि इथल्या रोजगारावर हल्ला करण्यासाठी पर्यटकांवर हल्ला केला गेला. म्हणूनच तुम्ही कितीही रोजगार बंद करण्याचा प्रयत्न केला, तरीही आम्ही घाबरत नाही. आम्ही इथला रोजगार बंद होऊ देणार नाही. इथला पर्यटन व्यवसाय बंद होऊ देणार नाही हे दाखवून देणे हे खरे युद्ध असेल.
अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवी यात्रा या दणक्यात झाल्या पाहिजेत. त्यासाठी इथली संरक्षण व्यवस्था वाढवली पाहिजे. चोख सुरक्षा व्यवस्थेत इथल्या उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराला संरक्षण देणे गरजेचे आहे. आपल्याकडे संरक्षणासाठी मनुष्यबळ कमी पडत असेल तर सरकारने आवाहन करावे की, जे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी आहेत, त्यांना विशेष मानधन देऊन या विशेष सेवेत सामील करावे. त्यामुळे विशेष रोजगार निर्माण करता येईल असे दल निर्माण केले पाहिजे. या स्वयंस्फूर्तीने भरती होऊन संरक्षणाचे कार्य हाती घेणाºया तरुणांना सरकारने योग्य मानधन दिले पाहिजे. दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात यांना वीरमरण आले, तर त्यांचा शहीद म्हणून सन्मान करावा आणि काही वर्षे सेवा देऊन विनासायास, सुखरूप परत आलेल्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे. सगळा भार आर्मी आणि लष्करावर न टाकता अशा स्वयंसेवकांना, संरक्षणात स्वेच्छेने येणाºया तरुण, निवृत्त यांच्या मदतीने इथली व्यवस्था सुरक्षित करावी. त्याचप्रमाणे इथल्या स्थानिकांना रोजगारापासून वंचित होण्यापासून वाचवण्याची गरज आहे.
काश्मीरचा होत असलेला विकास हे पाकिस्तान, जिहादी, दहशतवाद्यांचे लक्ष्य आहे. तिथले फुटीरतावादी प्रवृत्तीचे सरकारही पाकिस्तानला पोषक धोरण आखते. कारण त्यांच्या अजेंड्यातच ३७० कलम पुन्हा लागू करण्याचे आहे. म्हणूनच हा डाव हाणून पाडला पाहिजे. यासाठी आम्ही घाबरत नाही, आम्ही इथला रोजगार बंद पडू देणार नाही. विकास थांबू देणार नाही हे दाखवण्याची गरज आहे. २६/११च्या हल्ल्यानंतर मुंबई थांबली नाही. दुसºया दिवसापासून ती पुन्हा सुरू राहिली आणि जगाने याचे कौतुक केले. तसेच काश्मीरबाबत होण्याची गरज आहे. तरुण, सेवानिवृत्त लष्करी, सीमा सुरक्षा दल, पोलीस कर्मचाºयांना आमंत्रित करून विशेष संरक्षण यंत्रणा निर्माण करून पाकिस्तानला धडा शिकवता येईल. यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याची गरज आहे.
यासाठी सरकारला निधी कमी पडत असेल तर देशभरातील देवस्थानांनी जबाबदारी स्विकारली पाहिजे. कश्मिर सुरक्षा निधी निर्माण करुन भारताची एकजूट दाखवण्याची संधी यातून निर्माण होईल. अनेक दानशूर व्यक्ती, उद्योजक अशा कार्याला हातभार लावतील आणि हा खर्च पेलू शकतील. अशी यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. यातून एकच दाखवायचे आहे की आम्ही घाबरत नाही, आमचे काश्मीर आम्ही छान ठेवू, अखंड भारताचे प्रतिक म्हणून ते जतन करु.
काश्मीर थांबला नाही हा संदेश पाकिस्तानला, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी संघटनांना आणि याचे राजकारण करून असुरी आनंद मिळवू पाहणाºया काँग्रेससारख्या पक्षांना देण्याची गरज आहे. ३७० कलम हटवून काय फायदा झाला असे तोंड वर करून विचारणाºया काही दुष्ट प्रवृत्ती आहेत, त्यांचे तोंड बंद करण्यासाठी आता आम्ही घाबरणार नाही, थांबणार नाही हे दाखवून देण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये पर्यटनासंबंधी गुंतवणूक करणाºयांसाठीही सरकारने विशेष सुविधा प्राप्त करून दिल्या पाहिजेत. तिथल्या रोजगाराला प्रोत्साहन देणाºयांना आमंत्रित करून या नंदनवनाला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही हे दाखवून देण्याची गरज आहे.
- प्रफुल्ल फडके/अन्वय
९१५२४४८०५५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा