पर्वताप्रमाणे पातक करणे। वज्रलेप होणे अभक्तांसी।। असे संत ज्ञानेश्वर हरिपाठातील सातव्या अभंगात म्हणतात. हरिपाठात २७ अभंग आहेत. त्याचे तीन गट तयार केले आहेत. या हरिपाठालाच वारकºयांची संध्या असेही म्हटले जाते. संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ आपण जाणतोच. पण ज्ञानेश्वरांप्रमाणेच निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई आणि नामदेव महाराज यांनीही हरिपाठांची रचना केलेली आहे. नामदेव, निवृत्ती, एकनाथ, तुकाराम आणि ज्ञानदेव यांचा पंचरत्नी हरिपाठही प्रसिद्ध आहे. या सगळ्यांचा उच्चार आणि गजर हा वारीत होत असतो. हाच तो हरिपाठ सोहळा.
हरिपाठातील सातव्या अभंगात ज्ञानदेव म्हणतात की, जे लोक देवाचे नाव घेत नाहीत, त्यांच्या हातून डोंगराएवढी पापे घडतात. पण हरि नामाचा आश्रय घेताच ही पापे नष्ट होतात. अत्यंत साधा सिद्धांत आहे, सोप्या भाषेत मांडलेला विचार आहे हा. पर्वताप्रमाणे पातक करणे। वज्रलेप होणे अभक्तांसी ॥ १॥ नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त। हरिसी न भजत दैवहत ॥ २॥ अनंत वाचाळ बरळती बरळ। त्या कैसेनि गोपाळ पावे हरि॥ ३॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान। सर्वांघटी पूर्ण एक नांदे ॥ ४॥ या चार कडव्यांमधून ज्ञानदेव स्पष्ट करतात की, ज्यांनी पर्वतासारखी मोठमोठी पातके केली असून, जे हरिविषयींच्या आत्यंतिक प्रेमरूपी भक्तिविषयी विन्मुख आहेत, म्हणजे जे अभक्त आहेत, त्यांचे ते पातक कोणत्याही अन्य उपायांनी नाहीसे होत नाही. ज्याला हरिची प्रेमलक्षणा भक्ती नाही तो पतित अभक्त आहे. तो करंटा हरिचे भजन कसे करील? जे वायफळ बडबड करणारे, झोपेत बरळण्याप्रमाणे अमर्याद बडबड करतात, असल्यांना दीनदयाळ हरि कसा प्राप्त होईल? श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, सर्व देहामध्ये एक परिपूर्ण असणारा आत्मा हाच कोणी ठेवा मला मान्य आहे, हाच माझे सर्वस्व आहे. असे सांगून ज्ञानदेव हरिपाठातून आत्मज्ञानाकडे घेऊन जातात.
हरिनाम संकीर्तन हा सर्वजन सुलभ असा भक्तिमार्ग आहे, असे हरिपाठाच्या माध्यमातून ज्ञानदेव सांगतात, दाखवून देतात. हरिपाठातूनच मुक्ती प्राप्त होते हे हरिपाठाचे मुख्य सांगणे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मुक्तीची आस असली पाहिजे. योगसाधना, व्रतवैकल्ये, यज्ञकर्म, तीर्थ यात्रा, घोर तप याच्या मागे न लागता केवळ हरिनामातून सगळे साध्य होते ते सांगणारे तत्त्वज्ञान म्हणजे हरिपाठ.
हरिपाठातील पाचव्या अभंगातच ज्ञानेश्वर स्पष्टपणे सांगतात की, योग याग विधी येणे नोहे सिद्धि। वायांचि उपाधि दंभधर्म ॥ १॥ भावेवीण देव न कळे नि:संदेह। गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥ २॥ तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त। गुजेवीण हित कोण सांगे ॥ ३॥ ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात। साधूचे संगती तरुणोपाय ॥ ४॥ म्हणजे अष्टांगयोग व यज्ञ याचे यथाविधी आचरण केल्याने हरिची प्राप्ती होणार नाही. कारण ही सर्व हरि प्राप्तीविषयी बहिरंगे, दूरची साधने आहेत. याचे अनुष्ठान करणाºयांमध्ये मी मोठा योगी आहे, याज्ञिक आहे, माझी सर्वत्र ख्याती व्हावी अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याचे इच्छेने तो योग, यज्ञ वगैरे करतो व त्यामुळे खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ दांभिकधर्म मात्र होतो. भावावाचून साधकास देव केव्हाही नि:संशय कळावयाचा नाही, म्हणजे देववचन, गुरुवचन याच्यावर दृढ विश्वास असल्यावाचून देवाचे नि:संशय ज्ञान होणार नाही. कारण देवस्वरूपाचा जो अनुभव होतो, तो गुरूंनी केलेल्या महावाक्योपदेशानेच होतो; आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरूद्वाराच मिळालेला आहे, म्हणून त्यावाचून देवाचा अनुभव कसा कळेल? यासाठी हरिनाम आणि हरिपाठ हे एक फार मोठे साधन आहे, परमेश्वरापर्यंत पोहोचवणारी ती शिडी आहे, सोपान आहे हे वारीच्या मार्गावर गेल्यावर समजते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा