बुधवार, १ जुलै, २०२६

विजयाबाई : आधुनिक मराठी रंगभूमीच्या शिल्पकार


मराठी रंगभूमी आणि समांतर चित्रपटांच्या इतिहासात ज्या मोजक्या व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने एक सुवर्णकाळ निर्माण केला, त्यापैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे विजया मेहता. नाट्यवर्तुळात आदराने ‘बाई’ म्हणून ओळखल्या जाणाºया विजया मेहता या केवळ एक अभिनेत्री किंवा दिग्दर्शिका नव्हत्या, तर त्या आधुनिक मराठी प्रायोगिक रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाºया एक खºया मार्गदर्शक आणि चळवळ होत्या. बाई असे अनेकांना म्हटले जाते, पण आपल्याकडे शाळेत शिकवणाºया शिक्षिकेला आदराने बाई म्हणून संबोधले जाते. तशा त्या रंगभूमीवरच्या शिक्षिकाच असल्याने त्यांना बाई असे म्हटले जायचे.


विजया मेहता म्हणजे पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी बडोदा (गुजरात) येथे एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबात झाला होता. त्यांनी मुंबई विद्यापीठातून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. नाटकाची आवड असल्यामुळे त्यांनी दिल्लीतील प्रसिद्ध नाट्यगुरू इब्राहिम अल्काजी आणि मुंबईत आदी मर्झबान यांच्याकडे नाट्यशास्त्राचे रीतसर प्रशिक्षण घेतले.

१९६०चे दशक हे मराठी नाट्यसृष्टीला कलाटणी देणारे ठरले. विजया मेहता यांनी थोर नाटककार विजय तेंडुलकर, अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे यांच्यासोबत मिळून ‘रंगायन’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने मराठी नाट्यविश्वात एका नव्या विचारसरणीला जन्म दिला. संगीत रंगभूमीत अडकलेला आणि त्यानंतर सामाजिक, कौटुंबिक नाटकात अडकलेला प्रेक्षक त्यांनी वास्तवात आणला.


विजया बार्इंनी ‘बर्टोल्ट ब्रेख्त’ यांच्या ‘द कॉकेशियन चॉक सर्कल’ या नाटकाचे चि. त्र्यं. खानोलकर यांनी अनुवादीत केलेले ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या नावाने केलेले नाटक प्रचंड गाजले. तसेच आयनेस्कोचे ‘चेअर्स’ हे नाटक ‘खुर्च्या’ या नावाने मराठीत आणले. चिं. त्र्यं. खानोलकर लिखित ‘एक शून्य बाजीराव’, जयवंत दळवी यांचे ‘बॅरिस्टर’, अनिल बर्वे यांचे ‘हमिदाबाईची कोठी’, महेश एलकुंचवार यांचे ‘वाडा चिरेबंदी’ आणि विजय तेंडुलकर यांचे ‘श्रीमंत’ यांसारख्या नाटकांचे दिग्दर्शन करून त्यांनी मराठी प्रेक्षकांची अभिरुचीच बदलली. हमिदाबाईची कोठी या नाटकाने मराठी रंगभूमीला इतके महान कलाकार दिले की, त्यांनी या कर्तृत्वावर आपली कारकीर्द गाजवली. यामध्ये अशोक सराफ, नाना पाटेकर, भारती आचरेकर, नीना कुलकर्णी या दिग्गजांची नावे घ्यावी लागतील. वाडा चिरेबंदीचे चंद्रकांत कुलकर्णी यांनी अलीकडेच पुनरुज्जीवन केले होते. पण त्यावरही विजयाबार्इंची छाप होतीच. अभिनयातील सहजता आणि नैसर्गिक अभिनय कसा करायचा याचे त्या विद्यापीठ होत्या. प्रचंड निरीक्षणशक्ती आणि वास्तवात दिसणाºया घटकांचा चपखल वापर करून घेणे हे त्यांचे दिग्दर्शनातील वैशिष्ट्य होते. जयवंत दळवी यांच्याच संध्या छाया या नाटकातील माधव वाटवे आणि विजयाबार्इंची नाना नानी पाहणे हा एक सुखद अनुभव असायचा. त्यातील लोभस राग, मेथीची भाजी निवडता निवडता खोचक बोलणे इतके छान होते की, आपल्या जवळपासच हे नाटक घडते आहे असा भास निर्माण व्हायचा. हे नाटक अनेकांनी केले. वेगवेगळ्या संचात आले. पण विजयाबार्इंची नानी ही अफलातून होती.

विजया मेहता यांनी केवळ भारतापुरते मर्यादित न राहता जागतिक पातळीवरही काम केले. त्यांनी प्रसिद्ध जर्मन दिग्दर्शक फ्रिट्झ बेनेव्हिट्झ यांच्यासोबत इंडो-जर्मन थिएटर प्रोजेक्ट अंतर्गत काम केले. ‘मुद्राराक्षस’ आणि ‘शाकुंतल’ यांसारख्या भारतीय अभिजात कलाकृतींचा जर्मन रंगभूमीवर आणि जर्मन कलाकारांना सोबत घेऊन त्यांनी अप्रतिम आविष्कार घडवला.


श्याम बेनेगल यांच्या ‘कलियुग’ (१९८१) आणि गोविंद निहलानी यांच्या ‘पार्टी’ (१९८४) चित्रपटातील त्यांची ‘दमयंती राणे’ ही भूमिका अत्यंत उत्कृष्ट मानली जाते. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘बॅरिस्टर’ (१९८६) आणि ‘पेस्तनजी’ (१९८८) हे चित्रपट भारतीय सिनेमातील मैलाचे दगड ठरले. ९०च्या दशकात त्यांनी दिग्दर्शित केलेली ‘लाइफलाइन’ ही मालिका वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकतेवर प्रकाश टाकणारी आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेली मालिका होती. प्रेक्षकांना नवी दृष्टी देणाºया या विजयाबार्इंचे निधन ही नाट्यसृष्टीची फार मोठी हानी आहे. त्यांच्या सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या समृद्ध कारकिर्दीसाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. १९८७ला पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला होता. याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आशिया पॅसिफिक चित्रपट महोत्सवातील सहभाग आणि सांगलीचा मानाचा विष्णुदास भावे सुवर्ण पदक हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. संगीत नाटक अकादमीचा टागोर रत्न, महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

मराठी रंगभूमीला जागतिक ओळख करून देणाºया आणि कित्येक पिढ्यांमधील कलाकारांना अभिनयाचे धडे देणाºया या महान रंगकर्मीचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने आधुनिक मराठी रंगभूमीवरील एका सुवर्ण युगाचा अंत झाला, परंतु त्यांनी निर्माण केलेला वारसा आणि प्रायोगिकतेचा विचार येणाºया अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.


- प्रफुल्ल फडके/श्रद्धांजली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: