तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख। पाहीन श्रीमुख आवडीने।।
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मुख्य कणा आहे. हा संप्रदाय अतिशय सोपा आणि सर्वांना सामावून घेणारा आहे. विठ्ठल म्हणजेच माऊली : विठ्ठलाला आपण देव मानण्यापेक्षा ‘माऊली’(आई) मानतो. आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराची वाट पाहते, तसाच पंढरीचा विठुराया विटेवर उभा राहून आपल्या या वारकरी लेकरांची वाट पाहत असतो.
वारकरी संप्रदायातील भक्तीचे स्वरूप वेगळे आहे. इथे कर्मकांडाला स्थान नाही. निष्पाप, निस्सीम प्रेम आणि एकमेकांमध्ये विठ्ठल पाहणे हीच खरी वारकरी भक्ती आहे. वारीत चालणारा प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतो, कारण इथे प्रत्येकात विठ्ठल वसलेला आहे अशी भावना असते. यालाच आपल्याकडे आत्मज्ञान म्हणतात. विठ्ठलभक्तीत फार मोठी ताकद आहे. प्रत्येक संताला विठ्ठलापर्यंत पोहोचायचे होते. विठ्ठलापर्यंत पोहोचणे म्हणजे चालत वारी करत पोहोचणे असे नाही. तर विठ्ठल म्हणजे परमात्मा आहे. त्या परमात्म्यात आपला आत्मा पोहोचवणे ही आत्मीक वारी. त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयात विठ्ठल होता. विठ्ठलाच्या हृदयात प्रत्येक संत होता. प्रत्येक वारकरी असाच संतमय होण्याची तयारी करत असतो. संतांची आणि विठ्ठलाची कृपा आपल्यावर व्हावी हीच माफक अपेक्षा असते. वारकरी कधी धनधान्य, पैसाअडका, सोनेचांदी, संपत्ती मिळावी म्हणून वारी करत नाही. काही मिळावे म्हणून विठ्ठलाची भक्ती करत नाही. तर समाधान, आनंद, आत्मीक शांती मिळावी म्हणून विठ्ठलाची भक्ती केली जाते. साध्या वेशात तो राहात असतो. वारकरी हा कर्माला महत्त्व देतो, कर्मकांडाला नाही. म्हणूनच प्रत्येकाने आपले कर्म करून पुढचा मार्ग पत्करायचा आहे हे सांगते ती वारी. शेतीची कामे पूर्ण झाली, बीजरोपण झाले की तो शेतीची वाढ होईपर्यंत भगवंतांच्या भरवशावर शेती सोडतो आणि वारीला जातो. परत येईपर्यंत शेत चांगले डौलदार झालेले असते. हे त्याचे अचूक गणित असते. जमिनीत बीजरोपण करून मनात भक्तीचा भाव रुजवण्याचे काम करणारी ही कर्मप्रधान वारी असते. म्हणूनच भगवद्गीतेत सांगितलेला कर्मयोग हा खºया अर्थाने वारकºयांमध्ये पाहायला मिळतो.
चोखा मेळा हे शेतात काम करून शेतातच विठोबाला शोधतात. त्यांना पंढरपूरला जाण्याची गरज भासत नाही. कारण जमिनीची, शेतीची कामे करताना नामस्मरण घेणे यातच त्यांची वारी झालेली असते. म्हणून साक्षात विठुराया आपल्या या भक्ताला भेटण्यासाठी शेतात येतो. भेदाभेद इथेच संपलेले असतात. ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ असे जेव्हा हे संतश्रेष्ठ म्हणतात तेव्हा विठोबाचा साक्षात्कार तिथेच घडतो. हे आत्मा आणि परमात्म्याचे झालेले मिलन आहे. याचा स्थायीभाव कर्मयोग आहे.
प्रफुल्ल फडके/ संतकृपा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा