सोमवार, ६ जुलै, २०२६

वारीचे सामाजिक आणि आध्यात्मिक महत्त्व


पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!


वारी हे केवळ धार्मिक सहल किंवा प्रवास नाही, तर ते जगातील सर्वात मोठे ‘मॅनेजमेंट’ (व्यवस्थापन) आणि सामाजिक समतेचे प्रतीक आहे. वारीमध्ये श्रीमंत-गरीब, सुशिक्षित-अशिक्षित, जाती-पातीचे सगळे भेद गळून पडतात. सगळे एकत्र चालतात, एकाच पंक्तीला जेवतात आणि एकाच माऊलीचे नाम घेतात. मैलोन्मैल चालताना पायाला फोड आले तरी वारकºयाच्या चेहºयावरचे हसू मावळत नाही. सुख आणि दु:ख या दोन्ही परिस्थितींमध्ये ‘आनंदात’ कसे राहायचे, ही जीवन जगण्याची मोठी कला वारी आपल्याला शिकवते. म्हणूनच प्रत्यक्ष वारीत जाता आले नाही तरी आपल्या मनाला पंढरी बनवूया आणि मुखाने म्हणूया. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा!

हरिउच्चारण हेचि पैं सुकृत। न पाहे रे पंथ सोपा सुगम।। असे संत ज्ञानेश्वर म्हणतात. म्हणजे मुखाने हरीचे नाव घेणे हेच सर्वात मोठे पुण्य (सुकृत) आहे. भगवंताकडे जाण्याचा यापेक्षा सोपा आणि सुगम मार्ग दुसरा कोणताही नाही. श्री. ज्ञानदेवांना ज्ञानियांचा राजा का म्हणतात याची झलक हरिपाठातील पहिल्याच अभंगातून नजरेत भरते. हरिपाठ हा ज्ञानियांच्या राजांचा अद्वैताची बैठक न मोडता लिहिलेला अध्यात्मशास्त्रातील नामस्मरणसाधनेवरील एक संशोधन आहे. त्यांचे हे कवित्व किंवा रचना ललितलेखन नसून अध्यात्मविषयातील शास्त्रीय लेखनच आहे. अध्यात्मशास्त्रातील वेद, शास्त्रे, पुराणे या ग्रंथांचे त्यांनी दिलेले संदर्भ आणि नामस्मरणासंबंधी केलेले स्वत:चे अनुभवकथन येथे दिसून येतात.


‘ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी। धरोनी श्रीहरी जपे सदा॥ हे त्यांचे अनुभव लक्षात घेऊन शेवटी त्यांनी काढलेले अनुमान आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार। वाया येरझार हरीवीण॥ हेही ज्ञानोत्तर भक्तीची फलश्रुतीच आहे. देवही संकल्पना मानवी जीवनात कशी अस्तित्वात आली असावी? सर्वसामान्य माणूस म्हणतो की, ‘मी’ देव मानतो किंवा देव मानत नाही. पण हे दोन्हीही त्याच्या कल्पनेचेच खेळ असतात. वास्तव फार दूर असते. मी हा प्रत्येकाच्या ठायी आहेच. परंतु मी जीव ऐसा करिता संकल्प। प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. सर्वसामान्य माणसाच्या मनात असलेली भीती, वासना ही याचीच फलनिष्पत्ती आहे. पंढरीची वारी याचीच अनुभूती देते. सर्वांना बरोबर घेऊन जाणारी ही वारी सामाजिक आणि आध्यात्मिक शिकवण देताना समरसतेला महत्त्व देते, मानवता धर्माची शिकवण देते हे सर्वात महत्त्वाचे आहे.

वारकरी संप्रदाय हा वैचारिकतेने अत्यंत संपन्न आहे. त्यामुळे कानाकोपºयातील संतांचे विचार यात दिसून येतात. आपला हा महाराष्ट्रधर्म आहे तो भक्कम करण्याचे काम या वारकरी संप्रदायाने केलेले आहे. लाखोंच्या संख्येने अत्यंत एकोप्याने वारकरी आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर जातात आणि एकमेकांत मिसळतात. आपल्या ज्ञानाची, अनुभवाची वाटणी करतात. विचारांचे आदान प्रदान करतात. म्हणून हा आनंद कधीच न संपणारा असतो. तो एकदा नवे तर वारंवार घ्यावा यासाठी ही वारी असते. वारंवार केली जाते ती वारी मनुष्याला देवत्वाकडे नेते. विठ्ठलमय बनवते.


प्रफुल्ल फडके/संतकृपा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: