शनिवार, ४ जुलै, २०२६

देवाचिये द्वारी


देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी साधिलेल्या।। संत ज्ञानेश्वरांच्या या अभंगाची महती इथे फार मोठी आहे. हरिपाठाच्या या पहिल्याच ओळीत माऊली सांगतात की, देवाच्या चरणाशी जो क्षणभर जरी भक्तिभावाने उभा राहतो, त्याला चारही मुक्ती (सालोक्य, सामीप्य, सारूप्य, सायुज्यता) सहज मिळतात. मनुष्याचा जन्म हा मुक्तीसाठी असला पाहिजे. जन्म इथे घेता, मरण अटळ, नको हळहळ जीवालागी/ असे आपण अंत्ययात्रेला जाताना म्हणतो. पण, ती अंत्ययात्रा नसतेच. तो असतो प्रवास. नवा सुरू झालेला प्रवास. पण, एकदा प्रवासाला निघाल्यावर आपला मुक्काम आणि अंतिम स्थान कुठले असले पाहिजे हे ठरवण्यासाठी हा माणसाचा जन्म आहे.


असे म्हणतात की, ८४ लक्ष योनींतून जन्म घेतल्यानंतर माणसाचा जन्म येतो. पुन्हा जन्म मरणाच्या या चक्रात अडकायला नको म्हणून मुक्ती मिळवायची असते. ही मुक्ती म्हणजे आत्म्याचे परमात्म्यात मिलन होणे. त्यासाठी देवाचिये द्वारी जाणे आवश्यक आहे. मुक्ती मिळवण्यासाठी ही वारी आहे. वारी केली म्हणजे जन्म मरणाची ही ८४ लक्ष योनींच्या फेºयांची वारी करावी लागणार नाही आणि आपला शुद्ध आत्मा परमात्म्यात जाईल, विठ्ठलमय होईल. आपल्या जन्माचा अर्थ प्रत्येकाला समजला पाहिजे. कशासाठी मी जन्म घेतला आहे. मला काय साध्य करायचे आहे. या मोहमायाजालात अडकून पापकर्म करायचे आणि पुन्हा ८४ ची वारी करायची की, मुक्ती हवी हे ठरवण्यासाठी माणसाचा जन्म आहे.

हे शिकवतात ते संत. तुका म्हणे तोचि संत। सोशी जगाचे आघात।। संत तुकाराम महाराजांनी हे अत्यंत सोपेपणाने सांगितले आहे. हे जे आघात, दु:ख, अडचणी आपण सोसतो आहे, ते पूर्वीच्या कुठेतरी झालेल्या सुकृताचे फल असेल. ते सोसले पाहिजे. हे घाव सोसल्याशिवाय आपण देव होणार नाही. देव होणे म्हणजेच मुक्ती आहे. तेव्हा अवस्था प्राप्त होते ती म्हणजे, देव शोधायाला गेलो, देव होऊनी आलो, अशी ती अनुभूती.


त्यासाठी हरिपाठ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हरिपाठात २८ अभंग आहेत. यातून संत ज्ञानेश्वरांनी जीवनाचे फार मोठे सार सांगितले आहे. त्याची अनुभूती प्रत्येकाने घेतली पाहिजे. देवाचे मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे; म्हणजे बाह्य पंचविषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहेत, असे विचाराने जाणून त्याचे तादात्म्य सोडणे व अंतर्मुख वृत्तीने नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ती करणे म्हणजेच मोक्ष. पण, अशा सिद्धांताने हरिचे नाम हेच देवाचे द्वार सुचविले त्यास व्यर्थत्व येते अशी कोणी शंका घेईल, तर हरिनामस्मरण केल्या वाचून चित्तशुद्धी होणार नाही, व चित्तशुद्धी झाल्या वाचून आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही. म्हणून हरिनामस्मरणाच्या आश्रयानेच मुख्य ज्ञानद्वाराचा लाभ होतो. देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्याने सलोकतादि चारी मुक्तींचा लाभ होतो. हे सकृद्दर्शनी असंभाव्य वाटते, परंतु द्वारीं उभे असणे म्हणजे ‘सेवकाच्या नात्याने तत्पर असणे’ असा अर्थ घेतला पाहिजे. श्रीतुकोबारायांनी (सेवा ते आवडी उच्चारावे नाम। भेदाभेद काम सांडोनिया॥) परमप्रितीने भगवन्नामोच्चार करणे हीच हरीची सेवा आहे, असे सांगितले आहे. श्रीज्ञानेश्वर महाराजांनीही पुढील ध्रुवपदांत ‘हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा’ असे द्विरुक्तीने सांगण्यात हरिचे नामस्मरण हेच देवाचे द्वार असे सुचविले आहे.

प्रफुल्ल फडके/ संतकृपा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: