योग याग विधी येणें नव्हे सिद्धी। वायाचि उपाधी दंभ धर्म।। असे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या हरिपाठातील पाचव्या अभंगात म्हटले आहे. केवळ मोठे यज्ञ, योग किंवा कर्मकांड करून देव मिळत नाही. ती केवळ एक उपाधी किंवा मनाचा मोठेपणा ठरतो. देवासाठी केवळ निखळ भक्ती हवी. हा भक्तिमार्ग स्थापन करणारा तो वारकरी संप्रदाय. येथे कर्मकांडाला स्थान नाही तर येथे भक्तीला महत्त्व आहे. मनुष्यातील आत्मा, परमात्मा आणि देव जाणण्याची ही प्रक्रिया आहे.
या हरिपाठातील चार अभंगांत ज्ञानदेव म्हणतात की, योग याग विधी येणें नव्हे सिद्धी। वायाचि उपाधी दंभ धर्म॥ १॥ भावेंवीण देव न कळे नि:संदेह। गुरुवीण अनुभव कैसा कळे॥ २॥ तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त। गुजेवीण हित कोण सांगे॥ ३॥ ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात। साधूचे संगती तरुणोपाय॥ ४॥
म्हणजे अष्टांगयोग व यज्ञ याचे यथाविधी आचरण केल्याने हरीची प्राप्ती होणार नाही. कारण ही सर्व हरी प्राप्तीविषयी बहिरंगे आहेत. दूरची साधने आहेत. याचे अनुष्ठान करणाºयांमध्ये मी मोठा योगी आहे, याज्ञिक आहे, माझी सर्वत्र ख्याती व्हावी, अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याचे इच्छेने तो योग, यज्ञ वगैरे करतो व त्यामुळे खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ दांभिकधर्म मात्र होतो. असे ज्ञानदेव पहिल्या अभंगात म्हणतात.
भावावाचून साधकास देव केव्हाही नि:संशय कळायचा नाही, म्हणजे देववचन, गुरुवचन याच्यावर दृढ विश्वास असल्यावाचून देवाचे नि:संशय ज्ञान होणार नाही. कारण देवस्वरूपाचा जो अनुभव होतो तो गुरूंनी केलेल्या महावाक्योपदेशानेच होतो; आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरुद्वाराच मिळालेला आहे, म्हणून त्यावाचून देवाचा अनुभव कसा कळेल? हे दुसºया कडव्यात ज्ञानदेव सांगतात.
ज्ञानदेव याच अभंगातील तिसºया कडव्यात म्हणतात की, तपावाचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्यावाचून काही मिळणार नाही, म्हणजे कर्म करावे तसे फळ मिळते. हित सांगणाºयांमध्ये जर गूढ आत्मज्ञान (गुज) नसेल, तर तो काय सांगेल? कारण आत्मज्ञान होणे हेच सर्वांचे हित आहे. गुजचा एक अर्थ प्रेम असाही होतो. हित सांगणाºयांमध्ये जर प्रेम नसेल, तर तो काय जे सांगेल ते कोरडेच असेल.
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व जीवांना संसारातून तारण्याचा उपाय, साधूची संगत करणे हाच होय असे माझ्या अनुभवावरून मी जाहीर करतो. ज्ञानेश्वर कधीही आपल्या सत्कर्माचे श्रेय स्वत:कडे घेत नाहीत. ते आपल्या गुरुला, परमेश्वराला देतात. म्हणून याच विचाराने जाणारी पंढरीची वारी आणि त्यातील वारकरी हा देव शोधायला, देवाच्या दर्शनाला नाही तर देवस्वरुप होण्यासाठी आणि त्याचे दिव्यत्व दाखवण्यासाठी चालतो आहे. या वारीमध्ये हरिपाठाला फार महत्त्व आहे. प्रत्येक वारकरी यातील हरिपाठ समजून घेतो आणि हरिमय होतो. पंढरपूरच्या वारीचा आनंद सोहळा हा हरिपाठाने होत असतो. हरिमुखे म्हणा हरिमुखे, पुण्याची गणना कोण करी असा विचार करत वारकरी रममाण होतात.
प्रफुल्ल फडके/संतकृपा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा