सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना शिवसेनेची भूमिका या आंदोलनाबाबत मराठाविरोधी आहे. मराठा आरक्षण मिळू नये यासाठी आरक्षणाला विरोध करण्याची भूमिका आहे. त्यामुळे शिवसेनेचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असा चेहरा आता स्पष्ट झालेला आहे. ज्या छत्रपती शिवरायांच्या नावावर शिवसेनेने स्वत:ला मोठे केले त्याच छत्रपतींच्या मावळय़ांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवसेना करते आहे. हा चेहरा शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनीच पुढे आणलेला आहे. जाहीरपणे त्यांनी भाषण करून आपल्या पक्षातून कशी मराठाविरोधी भूमिका आहे हे दाखवून दिले. त्यामुळे आज जो मराठा समाज शिवसेनेच्या मागे उभा आहे, त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, आपण कोणाच्या मागे चाललो आहोत. ही शिवसेना मराठी माणसांची नाही, ही शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नाही, तर सध्याची शिवसेना मराठी माणसाचा घात करणारी आणि मराठा विरोधक आहे हे लक्षात घेतले पाहिजे.आमदार हर्षवर्धन जाधव यांची भाषणाची क्लीप सध्या बाहेर बरीच गाजते आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरून मला त्यांचा फोन आला आणि हर्षवर्धन तू मराठा आरक्षणाबद्दल काहीही बोलू नकोस, असे सांगितले. मला काहीही बोलायचे नाही, असे आदेश देण्यात आले. अत्यंत पोटतिडिकीने हर्षवर्धन जाधव मराठा समाजाच्या भावना मांडत असताना एकनाथ शिंदे यांच्या आडून उद्धव ठाकरे यांनी त्यांना गप्प करण्याचे काम केले. अर्थात शिवसेनेची ही भूमिका न पटल्याने हर्षवर्धन जाधव जनतेसमोर आले आणि शिवसेनेचे खायचे दात दाखवून दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची थेट हिंमत नसावी म्हणून कदाचित त्यांनी नथीतून तीर मारण्याचा प्रकार केला असावा. पण यातून मराठा समाजाचा विश्वासघात शिवसेनेने कसा केला आहे हेच समोर आले आहे. शिवसेनेची सर्वात प्रथमपासूनच मराठा आरक्षण विरोधी भूमिका होती. पण वरवर मात्र निवडणुकीच्या तोंडावर थापा मारून मराठा आरक्षण मिळेल, असे त्यांनी सांगितले होते. आज शिवसेना सरकारचा एक भाग आहे. असे असताना भाजप सरकार मराठा आरक्षणाला अनुकूल असताना आणि तशी पावले टाकण्यास सुरुवात केली असताना शिवसेनेने त्यात आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा तरुणांचे हीत, त्यांचे भले चिंतण्याऐवजी शिवसेनेला राजकारण आणि स्वत:ची खुर्ची महत्त्वाची वाटते आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींच्या नावाने मते मागून, शिवसेना म्हणजे आपण छत्रपतींचे मावळे आहोत, असे सांगून हा पक्ष मोठा केला. शिवप्रेमापोटी बहुसंख्येने मराठा समाज शिवसेनेकडे वळला. आपल्या दैवताप्रमाणे हा पक्ष न्यायभूमिका घेईल आणि शिवशाही येईल, अशी अपेक्षा तमाम मराठी माणसात निर्माण झाली. पण गेल्या काही वर्षात याच शिवसेनेने आपल्याच मराठी माणसांचा घात केला. आख्खी मुंबई दलालांच्या हातात सोपवली. मुंबईतील मराठी माणूस बाहेर काढला गेला. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याच्या टोकाला उपनगरात मराठी माणूस अक्षरश: शिवसेनेच्या धोरणाने बाहेर काढला गेला. मराठी माणसाचे अस्तित्व असलेल्या गिरणी कामगारांना देशोधडीला लावले, गिरण्या संपवल्या त्या ठिकाणी टॉवर आणि मॉल संस्कृती निर्माण करून बाहेरची माणसे आणली. अशात बेरोजगार झालेला आमचा मराठी माणूस आपल्या न्यायहक्कासाठी, आरक्षणासाठी संघर्ष करत असताना त्यात आडवे पडण्याचे काम शिवसेना करताना दिसत आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर दबाव टाकून त्यांची मुस्कटदाबी करणे म्हणजे मराठय़ांकडून मराठय़ांचा घात करण्याचा प्रकार केला जात आहे. समाजात दुही निर्माण करण्याचा, फूट पाडण्याचा प्रयत्न आज शिवसेना करत आहे. मराठी साम्राज्यात छत्रपतींच्या नंतर अशी फितुरी करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता. बादशहाची सुपारी घेऊन अनेकांनी मराठा साम्राज्याशी गद्दारी केली. आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या माघारी शिवसेना मराठय़ांचा असाच विश्वासघात करायला लागली आहे.शिवसेना नेते आपल्या मराठी माणसांचा विश्वासघात करत आहेत. बाहेरच्या लोकांना मुंबईत घुसवत आहेत. मराठी माणसांच्या रोजगाराच्या मुळावर येऊन शिवसेना भांडवलदारांची पाठराखण करत आहे. नाणार प्रकल्प कोकणात लादण्याचा असाच प्रकार शिवसेनेने केला. सगळय़ा मंजुरी आणि कागदपत्रांची पूर्तता शिवसेनेच्या मंत्र्यांनी केल्या आणि नंतर प्रकरण अंगावर शेकते म्हटल्यावर आपला या प्रकल्पाला विरोध आहे, असा पोकळ दावा सुरू केला. मराठा आरक्षणाबाबतही शिवसेनेची हीच दुटप्पी भूमिका आहे. पण शिवसेनेच्या पोटात आणि ओठात नेमके काय आहे याचा फुगा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी फोडला आहे. मराठी मतांचे, मराठी मातीचे आणि मराठा जातीच्या नावावर मोठी झालेली शिवसेना आज मराठी माणसांनाच संपवायला निघाली आहे. आज या आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांच्यापाठोपाठ अनेकजण आत्महत्या करत असताना शिवसेना मात्र आपली खुर्ची वाचवण्यासाठी दुटप्पीपणाची भूमिका घेताना दिसते आहे. आता शिवसेनेच्या भरवशावर असलेल्या मराठा तरुणांनी नीट विचार करून आपला बाणा, आपला स्वाभिमान जपण्यासाठी शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. आमच्या पाठीत खंजीर खुपसणा-यांना आम्ही लांब करतो आणि आमच्या पाठीशी राहणा-या स्वाभिमानी लोकांनाच संधी देणार हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे.आज मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्याच्या आणि अंतिम टप्प्यात असताना शिवसेना याला विरोध करून, त्यावर आपले मत मांडायचे नाही आणि आरक्षणाचे समर्थन करायचे नाही, असे सांगून मराठा समाजाला डिवचायचा प्रयत्न करते आहे. हे आरक्षण लांबणीवर पडून त्याचा भाजप सरकारला फटका बसावा म्हणून मराठय़ांचा बळी देण्याचा जो डाव शिवसेना खेळते आहे, तो मराठा तरुणांनीच उधळून लावला पाहिजे.
गुरुवार, २ ऑगस्ट, २०१८
शिवसेनेचे खरे दात दिसले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा