राजकारणात केव्हा कोणाला महत्व येईल आणि कोणाचे अस्तित्व संपुष्टात येईल हे काय सांगता येत नाही. काही व्यक्ती आपण राजकारणात आहोत की समाजकारणात आहोत याबाबत नेहमीच संभ्रमावस्थेत राहतात. तर काही व्यक्ती या कायम आंदोलक म्हणून राहतात. साधारणपणे ढोबळमानाने आपल्याकडे डावे पक्ष हे कायम आंदोलक किंवा विरोधात राहिले आहेत. त्याच दिशेने आता राज ठाकरे यांची वाटचाल सुरु असून मेधा पाटकर यांच्यासारखीच परिस्थिती काही दिवसांनी राज ठाकरे यांच्याबाबतीत निर्माण होईल की काय असा प्रश्न पडतो. कारण मेधा पाटकर या प्रकल्पातील विस्थापितांसाठी लढतात आणि आज राज ठाकरे राजकीय विस्थापितांसाठी लढताना दिसत आहेत.काही तरी करून दाखवायचे या हेतुने राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, पण भूमिका नेमकी नसल्यामुळे आज त्यांचा पक्ष चाचपडताना दिसतो आहे. आपला पक्ष शिवसेनेला विरोध करण्यासाठी आहे की भाजपला? आपला पक्ष मोदींना विरोध करण्यासाठी आहे की भाजपला? आपण काँग्रेसचे विरोधक आहोत की भाजपचे विरोधक आहोत? आपण शरद पवारांचे समर्थक आहोत की त्यांच्या विरोधात बोलण्याची इच्छा आहे? हे काहीही स्पष्ट नसल्यामुळे महाराष्टÑ नवनिर्माण सेना हा राज्यातील भरकटलेला पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची अवस्था मेधा पाटकर यांच्यासारखी एकाकी लढ्याची झालेली आहे. शिवसेनेने मेधा पाटकर यांची कायम हेटाळणी केली. मेधा पाटकर यांच्या आंदोलन आणि भूमिकांची कायम थट्टा केली. ‘मार्मिक’मधून मेधा पाटकर यांच्यावर काढलेली व्यंगचित्रेही मेधा पाटकर यांची खिल्ली उडवणारी आणि त्यांच्या भूमिकेला विरोध करणारी होती. त्या काळात राज ठाकरे हे शिवसेनेतच होते. त्यामुळे मेधा पाटकर होणे म्हणजे काय हे ते पक्के जाणून आहेत. तरीही राज ठाकरे यांची वाटचाल ही मेधा पाटकर यांच्या दिशेने होताना दिसते आहे.चांगले प्रभावी वक्तृत्व आहे, पण नेमकी भूमिका काय घ्यायची याबाबत ठाम नाहीत अशी राज ठाकरे यांची अवस्था आहे. त्यामुुळेच महाराष्टÑाच्या राजकारणात चांगला प्रभाव निर्माण करु शकतील ही अपेक्षा राज ठाकरे यांच्याबाबतीत संपुष्टात आली आहे. जो पक्ष पहिल्याच निवडणुकीत म्हणजे २००९ च्या विधानसभेत १३ आमदार निवडून आणू शकतो, त्या पक्षाची १० वर्षातील कामगिरी लक्षणीय असायला पाहिजे. सत्तेच्या जवळ पोहोचणारी कामगिरी असली पाहिजे किंवा किंगमेकरची भूमिका तरी त्या पक्षाला करता आली पाहिजे. पण नेमके नियोजन चुकले आणि आपल्याच भ्रमात राहिल्यामुळे अवघ्या पाच वर्षात हा पक्ष रसातळाला गेला. नाशिकसारखी महापालिका ताब्यात असूनही पुढच्या पाच वर्षात तिथली सत्ता टिकवता आली नाही. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील संख्याबळ कमी कमी होत गेले आणि पक्षाला घरघर लागली. ज्या इंजिनाच्या मागे १३ डबे होते ते इंजिन आता एकटे धावते आहे किंवा बराच काळ मालगाडीप्रमाणे बंद राहते. ही अवस्था चिंताजनक आहे. विशेषत: राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणाºया, राज ठाकरे यांच्यात शिवसेनाप्रमुखांना पाहणाºया मराठी माणसांच्या दृष्टीने ही बाब वेदनादायक आहे. साहजिकच राज ठाकरे यांची अवस्था किंवा वाटचाल ही फक्त एकाकी मेधा पाटकरांप्रमाणे होणार का असा प्रश्न महाराष्टÑाला पडलेला आहे.मेधा पाटकर या एकच एक मुद्दा घेऊन बसतात. आपल्या सोयीचा असेल तोपर्यंत तो लावून धरतात. नंतर तो मुद्दा सोयीस्करपणे सोडून देतात. आज मनसेप्रमुख राज ठाकरे तसेच करताना दिसतात. मेधा पाटकर यांनी पंचवीस वर्ष नर्मदा बचाव, सरदार सरोवर परिसरातील आदिवासींसाठी लढा दिला. त्यांच्या पुनर्वसनावर त्या लढल्या. त्या प्रकल्पाला विरोध करत बसल्या. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. ना त्यांच्या लढ्याला यश आले ना तो प्रकल्प थांबला. आपल्या संघटनेची ताकद दाखवून चर्चेत राहिल्या. प्रकल्पाला विरोध करुन विकासकामे बंद पाडायची का? पण याचा विचार त्यांनी केला नाही आणि त्या नर्मदेच्या खोºयात हिंडत राहिल्या. आंदोलन उभे केले. पण त्यांच्या आंदोलनामुळे किती जणांना न्याय मिळाला हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. फक्त सरकार विरोधी ही भूमिका असल्याने त्या त्या काळात जे सरकार असते त्याच्या विरोधातील राजकीय पक्षांनी आपल्या मंचावर बोलावून आणि आपल्या सोयीनुसार मेधा पाटकर यांचा वापर करुन घेतला. मग कधी काँग्रेसने, तर कधी भाजपने, कधी अन्य पक्षांनी. पण मेधा पाटकर मात्र आहेत तिथेच राहिल्या. सभागृहात जाण्याचे त्यांचे स्वप्न काही केल्या पूर्ण झाले नाही. आज राज ठाकरे यांच्या खळ्ळखट्याक आंदोलनाचेही असेच झाले आहे. पक्ष स्थापनेनंतर काही काळ राज ठाकरे यांनी मराठी पाट्यांचा मुद्दा उचलला. मुंबईत थोडे फार खळ्ळखट्याक केले. काही पाट्या मराठी झाल्या, सर्व नाही. पण ज्या ठिकाणी मराठी पाटी लागणे आवश्यक होते आणि मराठी अस्तित्व दाखवून देणे गरजेचे होते, त्या बेळगावांत मराठी पाट्यांचे आंदोलन करावे हे न सुचल्याने राज ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेप्रमाणेच ठाकरे फॅमिली मुंबई लिमिटेड असा झाला. त्यामुळेच त्यांच्या आंदोलनामुळे ना १०० टक्के मराठी पाट्या झाल्या ना त्याचे श्रेय त्यांच्या पक्षाला मिळाले. मेधा पाटकर यांच्याप्रमाणेच त्यांची अवस्था झाली.नर्मदा बचाव आंदोलनाचा गाशा गुंडाळल्यानंतर मेधा पाटकर या अण्णा हजारेंच्या तंबूत शिरल्या. अण्णांची जी कोअर कमिटी होती आणि २०११ ला दिल्लीत उपोषणाला बसली होती त्या व्यासपीठावर डोक्यावर ‘मै अण्णा हूँ’ची टोपी घालून हातात माईक घेऊन बसल्या. पण त्या आंदोलनाचा अरविंद केजरीवाल यांनी जसा लाभ उठवला, तसा लाभ मेधा पाटकर यांना उठवता आला नाही. त्यानंतर आम आदमी पार्टी पक्षातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. पण त्यात त्यांचा दारुण पराभव झाला. हे केवळ भूमिका स्पष्ट नसल्यामुळे झाले. आज राज ठाकरे यांचे नेमके तसेच झालेले दिसते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत अशी भूमिका जाहीरपणे मांडणारे राज ठाकरे हे पहिले नेते होते. पण मोदी लाटेचा फायदा आपल्या उमेदवारांना मिळावा यासाठी त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे उमेदवार हे संत्र्याच्या फोडींप्रमाणे साल सोलल्यावर सुट्या होतात तसे झाले. प्रत्येकजण आपापल्या परीने काम, प्रचार करत राहिला, पण त्यांचा आवाका हा अपक्ष उमेदवारासारखा होता. या अन्य पक्षांच्या गर्दीत आपण पराभूत होण्यासाठी निवडणूक लढवत आहोत, या पराभूत मानसिकतेत प्रत्येक उमेदवार निवडणूक लढवत राहिला. यामध्ये राज ठाकरे यांचे कवच कुठेही उमेदवारांना मिळाले नाही. साहजिकच मोदींची शिफारस करुनही मोदी लाटेचा फायदा मनसेला झाला नाही, मात्र तो फायदा शिवसेनेने उठवला. मोदी समर्थन राज ठाकरे यांनी केले आणि फायदा शिवसेना घेऊन गेली. मनसेला कसलाच फायदा झाला नाही. हा प्रकार मेधा पाटकरांनी आंदोलन करायचे, गर्दी जमवायची आणि तिसराच कोणीतरी हिरो होऊन जातो तसाच झाला. त्यामुळे राज ठाकरे यांची वाटचाल मेधा पाटकरांच्या वाटेने चालली आहे असेच वाटते.मेधा पाटकर यांची ओळख आज प्रकल्पग्रस्तांच्या नेत्या अशी आहे. कोणताही प्रकल्प, धरण आले की संभाव्य विस्थापीत आणि त्याचे विरोधक हे मेधा पाटकरांना भेटतात. त्या आपली नेहमीप्रमाणे शबनम अडकवतात आणि त्या ठिकाणी भेट देतात. कधी भांडवलदारांच्या विरोधात आवाज उठवतात, तर कधी पर्यावरणाचा मुद्दा उचलून लवासातील भांडवलदारांविरोधात लढा द्यायला जातात. तिथे पाहणी केल्यानंतर विस्थापितांकडे पाठ करून लवासाला क्लीन चीट देतात. आज राज ठाकरे यांच्याकडे असेच राजकीय विस्थापित येतात. मग ते कधी भाजपच्या लाटेत सत्तेच्या बाहेर फेकले गेलेले असतील, कधी राष्टÑवादीचे नेते शरद पवार असतील. ते नेते आपल्याला जे बोलता येत नाही ते राज ठाकरे यांच्या तोंडून वदवून घेतात. त्या बोलण्याचा फायदा राज ठाकरेंना काडीमात्र होत नाही. त्याचा फायदा शरद पवारांना मात्र होतो. सध्या शरद पवारांनी असाच राज ठाकरे यांचा वापर करायला सुरवात केली आहे. आपले राजकीय पुनर्वसन व्हावे यासाठी चांगल्या प्रकारे आवाज उठवणारा कोणीतरी पाहिजे म्हणून राज ठाकरे यांचा वापर करुन घेणारे शरद पवार राज ठाकरे जेंव्हा अडचणीत असतील तेंव्हा त्यावर कधीही भाष्य करत नाहीत, हे राज ठाकरे यांच्या लक्षात येत नाही. मराठी माणसांचा अधिकार, रेल्वे नोकर भरतीतील आंदोलनामुळे तमाम मराठी तरुण राज ठाकरे यांच्या पाठिशी होता. युवकांचे आयकॉन अशी त्यांची भूमिका होती. अनेक कोर्टातून त्यांच्यावर खटले होते. तेव्हा सर्वच मराठी तरुणांना त्यांचा अभिमान वाटत होता. त्याचवेळी आजचे राजकीय विस्थापित शरद पवार हे राज ठाकरेंवर टीका करत होते. आज अनेक कार्यक्रमात राज ठाकरे आणि शरद पवार एकत्र येताना दिसतात. जे विषय बाहेर काढायचे आहेत पण त्यावर आपल्याला मौन बाळगायचे आहे त्या विषयांवर बोलण्यासाठी राज ठाकरे यांचा वापर शरद पवार करुन घेतात. अगदी चार महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणांचा प्रश्न अंतिम टप्प्यात आलेला असताना पुण्यातील मुलाखतीत आर्थिक आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करुन राज ठाकरे यांचा नेमका वापर शरद पवारांनी केला. मराठा समाजाची नाराजी राज ठाकरे यांच्यावर शेकली तर आर्थिक आरक्षणासाठी इच्छुक असलेल्यांची सहानुभूती शरद पवारांना मिळाली. त्यामुळे आंदोलनकर्त्या मेधा पाटकर, अण्णा हजारे यांचा जसा राजकीय वापर विविध पक्षांनी नेत्यांनी केला तसाच वापर राज ठाकरे यांचा होत असेल तर ते राज ठाकरे यांच्यादृष्टीने घातक आहे. फक्त सरकारच्या विरोधात ओरडायला राज ठाकरे, त्यातून निर्माण झालेल्या नाराजी फायदा घेण्यासाठी अन्य पक्ष आहेत. त्यामुळे मेधा पाटकर या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या विस्थापितांसाठी लढणाºया नेत्या आहेत तर राज ठाकरे हे मोदी लाटेत विस्थापित झालेल्या राजकीय पक्षांचे नेते बनत आहेत. याचाच अर्थ राज ठाकरे यांची वाटचाल मेधा पाटकरांच्या वाटेने होत आहे का, अशी शंका आल्या वाचून राहात नाही.
रविवार, ५ ऑगस्ट, २०१८
मेधा पाटकरांच्या वाटेने राज ठाकरे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा