सांगली आणि जळगाव महापालिकेचा निवडणूक निकाल शुक्रवारी लागला. जळगावमध्ये गेली ३५ वर्षे सत्तेत असलेल्या सुरेश जैन गटाला धक्का देत भारतीय जनता पक्षाने (भाजप) जळगाव महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तीन दशकांनंतर या महापालिकेत सत्तांतर घडवून आणण्यात भाजपला यश आलेले आहे. त्यामुळे अजूनही भाजपची हवा संपली म्हणणा-यांना चांगलेच उत्तर यातून मिळाले आहे.विशेषत: अंगात ताकद नसलेल्या सुदाम पेहेलवानाप्रमाणे षड्ड ठोकून स्वबळाची भाषा करणा-या शिवसेनेला या निवडणुकीत मतदारांनी जागा दाखवून दिलेली आहे. जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तब्बल ५७ जागांवर भाजपने आघाडी मिळवत एकहाती सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे जळगावातील सगळीच सत्ता-समीकरणे बदलली असून नव्या नेतृत्वाचा उदय हे या निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. या निकालामुळे सुरेश जैन आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. धक्का बसला आहे म्हणण्यापेक्षा धक्का दिलेला आहे. हा मतदारांनी दिलेला आहे. भ्रष्ट नेते आणि वाचाळ नेते आम्हाला नकोत असेच चित्र मतदारांनी उभे केलेले आहे. सुरेश जैन यांना पूर्णपणे आपले निर्दोषत्व सिद्ध करून आपली प्रतिमा स्वच्छ असल्याचे दाखवता आलेले नाही. त्याचप्रमाणे शिवसेनेलाही मतदारांनी गर्जेल तो पडेल काय असा धक्का दिला आहे. जळगावात एकनाथ खडसे यांचे भाजपचे नेतृत्व मागे पडून आता गिरीश महाजन यांचे नेतृत्व उदयास येताना दिसत आहे. भाजपचा तारणहार म्हणून महाजन यांनी आपली प्रतिमा निर्माण करून पक्षातील महत्त्व या निवडणुकीतून पक्के केले आहे. पालघर लोकसभा निवडणूक असो वा शेतकरी आंदोलन, दुधाचे आंदोलन, आरक्षणाचे आंदोलन असो, यात भाजपने सरकारचा प्रतिनिधी आणि समन्वयक म्हणून गिरीश महाजन यांना पुढे केले आणि त्यांची शिष्टाई उपयोगी पडत गेली. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत जळगावातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे नेतृत्व खंबीर झाल्याचे यातून दिसून आलेले आहे. त्याचवेळी स्वबळाची घोषणा करणा-या शिवसेनेचा फुगा पार फुटलेला आहे. शिवसेनेचा जळगावातील चेहरा हा सुरेश जैन होता. घरकूल घोटाळा या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या प्रकरणातील आरोपी हा शिवसेनेचा चेहरा होता. शिवसेनेचे स्वबळ म्हणजे भ्रष्ट चेह-यांना संधी. अशा या भ्रष्टाचाराचे समर्थक शिवसेनेला मतदारांनी सत्तेपासून दूर केले आहे. त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. त्यामुळे शिवसेनेचे अपयशाचा आलेख आता उंचावत आहे. स्वबळावर मुंबईचीही सत्ता आणू न शकलेल्या शिवसेनेला जळगावातून पार दूर केले आहे. त्याचप्रमाणे भाजपत असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था असलेल्या एकनाथ खडसे यांनाही या निकालाने धक्का दिलेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे नेते असलेल्या खडसे यांना पर्याय निर्माण झाल्यामुळे खडसे यांनाही विचार करावा लागेल. जळगावप्रमाणेच भारतीय जनता पक्षाने सांगलीतही जोरदार मुसंडी मारली आहे. सांगलीमध्ये भाजपला मिळणारे संख्याबळही लक्षणीय म्हणावे लागेल. पश्चिम महाराष्ट्रात भाजपची फारशी ताकद नसताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाने आपले पाय मजबूत केल्याचे दिसते आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी ताकद पणाला लावून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मोहीम उघडलेली असताना सांगली महापालिकेत एकहाती सत्तेच्या दिशेने चाललेली भाजपची वाटचाल फार महत्त्वाची आहे. सांगली हा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या विचारांचा वारसा जपणारा मतदारसंघ. पण दादांनी रुजवलेली काँग्रेस आता पूर्णपणे उखडून टाकण्याचे काम या ठिकाणी घडले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा पूरता माज या ठिकाणी मतदारांनी उतरवलेला दिसून येतो. वसंतदादा पाटील यांच्या घराण्याला आणि काँग्रेस- राष्ट्रवादीला हा फार मोठा धक्काच म्हणावा लागेल. दादांनंतर इथे नेहमीच परिवर्तनाचे वारे वाहिले. त्यात संभाजी पवारांनी जनता दलातून विजयी होऊन धक्का दिला. आता धनंजय गाडगीळ, चंद्रकांतदादा पाटील यांनी उभे केलेले आव्हान हे पूर्णपणे काँग्रेसला मुळासकट उखडून काढले आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला, त्यात सातारा, सांगली हे काँग्रेसचे जिल्हे. पण या भागातून काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येताना दिसत आहे. सांगली महापालिकेवर पारंपरिक असलेली काँग्रेसची सत्ता भाजपने खेचून आणली आहे. त्यामुळेच या निवडणुकीने सर्वांनाच विचार करायला लावला आहे. सांगली आणि जळगाव अशा दोन महापालिका आपल्या ताब्यात घेऊन भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेले आहे. जळगावात ७५ पैकी ५७ जागांवर विजय मिळवत भाजपने जे यश मिळवले आहे ते सर्वच पक्षांना विचार करायला लावणारे आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस- राष्ट्रवादीला शून्य करत या महापालिकेत झालेली एमआयएमची एन्ट्री हा सुद्धा विचार करायला लावणारा विषय आहे. एमआयएमसारखी धर्मांध शक्ती हळूहळू सगळीकडे घुसत आहे, यावरून भविष्यात काय चित्र असेल याचा विचार करावा लागेल. सत्तेत राहून, सत्तेची फळे चाखून शिवसेना पुन्हा पुन्हा भाजपला अडचणीत आणण्याचे काम करीत होती. स्वबळाची भाषा बोलत होती. त्या शिवसेनेला मतदारांनी त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे. केवळ मुंबईपुरते अस्तित्व असलेल्या शिवसेनेला मुंबई महापालिकेत स्पष्ट कौल मिळवता आला नाही, तीच शिवसेना विधान भवनावर भगवा फडकवण्याची भाषा स्वबळावर करते आहे. पण हा भगवा नेमका कोणाचा ते आता येता काळ ठरवेल. कारण भाजपचा रंगही भगवाच आहे. या भाजपने गेल्या दोन वर्षात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त महापालिका जिंकलेल्या आहेत. नगरपालिकांमध्येही आपले अस्तित्व निर्माण केलेले आहे. तोच विजयी आलेख कायम राखत सांगलीत भाजपने केलेली कामगिरी ही कौतुकास्पद अशीच आहे. भाजपला स्पष्ट बहुमत सांगलीत मिळाले नसले तरी एक- दोन कमी पडणा-या जागा मिळवून भाजप सत्तेपर्यंत जाईल यात कसलीच शंका नाही. एकूणच गरजणा-या पक्षांना हे दोन्ही महापालिका निकाल विचार करायला लावणारे आहेत. कर्नाटक निवडणुकीनंतर भाजप संपली म्हणणा-या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला भाजपने आमची हवाच नाही तर वादळ कायम आहे हे दाखवत विरोधकांचीच हवा काढून घेतली आहे.
शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८
विचार करायला लावणारा निकाल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा