ठाण्यात एकतर्फी प्रेमातून किंवा प्रेमप्रकरणातून एका कॉलेज युवतीची चाकूहल्ला करून निर्घृण हत्या करण्याची घटना शनिवारी सकाळी भररस्त्यात घडली. शनिवारी दिवसभर यावर चर्चा होत राहिली. तशा अशा घटना आपल्याकडे सातत्याने घडताना दिसतात. १९९० नंतर हे प्रकार फारच वाढले होते. नव्वदच्या दशकात शाहरूख खानची प्रतिमा अशीच झालेली होती. डर या चित्रपटातून एकतर्फी प्रेमाची आणि हत्येची, हल्ल्याची कल्पना आल्यानंतर हे प्रकार वाढले म्हणून त्या काळात शाहरूखच्या चित्रपटांवर बंदीही घालण्याची मागणी काही संघटनांनी केली होती. १९९० पासून गेल्या तीन दशकांत हे प्रकार सातत्याने घडत आहेत. यातील रिंकू पाटील हे उल्हासनगरमधील प्रकरण खूप गाजले होते. त्यानंतर सांगलीतील आरती देशपांडे या मुलीचीही त्याच सुमारास भररस्त्यात अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने असे प्रकार कुठे ना कुठे घडताना दिसत आहेत. शनिवारी ठाण्यात घडला तसाच प्रकार चारच दिवस अगोदर ३१ जुलैला नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे गावातील मुलीच्या बाबतीत घडला होता. असे प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे संपूर्ण राज्यात एकप्रकारचे चिंतेचे वातावरण निर्माण होते. अशा प्रकारच्या हत्या करण्यास तरुण का प्रवृत्त होतात? हत्या करून त्यांना काय मिळते? हत्या केल्यानंतर पोलीस कोठडी आणि शिक्षा ही तर होणारच आहे. त्यामुळे आपले आयुष्य बरबाद करून घेण्यात तरुणांना कसला विकृत आनंद मिळतो? अशा घटना एकतर्फी होतात का, याचा शोध सगळय़ा समाजाने घेतला पाहिजे.भररस्त्यात दिवसाढवळय़ा असे हल्ले होत असताना मदतीला कोणीच धावून येत नाही आणि सेल्फी, फोटो, मोबाईल कॅमे-यात घटनेचे चित्रीकरण करण्यात धन्यता मानणारा समाज हा निष्ठूरपणाचाच कळस म्हणावा लागेल. अमूक एक घटना डोळय़ांसमोर घडताना पाहिली, त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले हे सांगण्यात पुरुषार्थ आहे की समोर घटना घडत असताना मी मदतीला धावलो, त्यामुळे दुर्घटना टळली हे सांगण्यात पुरुषार्थ आहे हे समजले पाहिजे. अशा घटनांमध्ये एकतर्फी प्रेमाचा रंग दिला जात असला तरी त्यामध्ये पूर्वीपासून आशेवर ठेवणे, थोडाफार प्रतिसाद देणे, मुलांना खेळवणे असे प्रकार घडल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे असे प्रकार शंभर टक्के अनोळखी मुलांकडून एकाएकी होतात असे नाही. त्यामुळेच अशा घटना सहजपणे थांबवता येऊ शकतात. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. जेवढय़ा म्हणून अशा हत्या किंवा बलात्कारांच्या घटना घडतात त्यामध्ये ओळखीच्या, नात्यातील व्यक्तींकडूनच मोठय़ा प्रमाणात घटना झाल्याचे दिसून आलेले आहे.त्यामुळे आपल्या ओळखीतील तरुणांना आपल्या घरातील मुलींपासून किती जवळ आणि लांब ठेवायचे हे प्रत्येक पालकाला आई-बापाला समजले पाहिजे. एखादा मुलगा वारंवार आपल्या मुलीला भेटायला येत असेल, ती तासन्तास त्या मुलाशी फोनवर बोलत असेल तर नेमके काय, कोणाशी बोलते आहे यावर लक्ष असले पाहिजे. आई-वडील आणि मुलगी यांच्यात संवाद असला पाहिजे. अशा प्रकारे कोणी मागे लागत असेल, तो आवडत असेल अथवा नसेल, काहीही असले तरी मोकळेपणाने घरच्या जबाबदार व्यक्तींशी चर्चा केली पाहिजे. त्यात लाज वाटण्याचे काहीच कारण नाही. आपल्या इच्छेविरोधात कोणी गळय़ात पडायचा, प्रेमाचा आग्रह धरत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आई- वडिलांची मदत घेतली पाहिजे. ठाण्यातल्या प्राची झाडे हत्या प्रकरणात याच तरुणाने जून महिन्यात या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर त्या मुलीने पोलिसात तक्रारही केली होती, असे सांगण्यात येते. त्यामुळे या मुलीला संरक्षण देण्यात ठाणे पोलिसांनी दुर्लक्ष केले हे तितकेच खरे आहे. ही घटना अचानक घडलेली नव्हती. त्या मुलीच्या मागावर तो मुलगा अनेक दिवस होता. त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल असतानाही पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले ही गोष्ट संतापजनक आहे. त्या तरुणाला तक्रारीनंतर समज दिली असती, तर ही घटना घडली नसती. त्यामुळे अशा घटना घडण्यास समाजातील अनेक प्रवृत्ती संधी देत असतात. रस्त्यावरील बघ्याची भूमिका घेणारे लोक असोत वा पोलीस. आई-वडील, नातेवाईक आणि तितकेच महत्त्वाचे म्हणजे ती ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्या कॉलेजचे व्यवस्थापनही जबाबदार आहे.आज प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये मुलींच्या संरक्षणासाठी निर्भया पथकांची स्थापना केलेली आहे. असे असतानाही या पथकाचा वापर या मुलीला का करता आला नाही? मुलींना अगदी सातच्या आत घरात या, असे कोणीच म्हणत नाही. निदान मुंबई-ठाण्यात तर ते शक्य नाही. कारण इथले राहणीमान व्यस्त असते, उशिरापर्यंत बाहेर राहावे लागते. त्याशिवाय मुली नोकरी करूनही शिक्षण घेत असतात. अशा वेळी आपल्या मुली जिथे नोकरी करतात तिथले वातावरण कसे आहे, तिथे कोण कोण आसपास आहेत, तिच्या जाण्या-येण्याचा मार्ग काय आहे, त्यासाठी किती वेळ लागतो, त्या मार्गावर येणारे-जाणारे किती लोक आहेत, त्यामध्ये आपल्या ओळखीची काही ठिकाणे आहेत का? याची सर्व माहिती असली पाहिजे. त्याचप्रमाणे मुलींना येण्यास उशीर होत असेल तर का लागला, तिचे फोनवरून कोणाशी बोलणे होते, तिच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कोण कोण आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिची प्रायव्हसी आणि स्पेस सोडून तिच्या सुरक्षिततेसाठी या गोष्टी आवश्यक आहेत, हे सांगून चौकशी केली पाहिजे. अगदी एखादा मुलगा आवडला, मागे लागतो, नाही आवडला, त्याला टाळायचे कसे हे मुलींनी आता मोकळेपणाने घरी सांगितले पाहिजे. जो मुलगा मागे लागत आहे त्याला प्रेमाने बोलावून घेत समजावून सांगून प्रकरण तिथल्या तिथे संपवण्याची आवश्यकता आहे. त्याच्या घरच्यांशी संपर्क साधून पुढे काय परिणाम होतील, याचे गांभीर्य समजावून सांगता येते. त्यासाठी मुलींनी आई-वडिलांना विश्वासाने सगळे सांगितले पाहिजे. हा कौटुंबिक संवाद होत नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहणारच.
मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८
कौटुंबिक संवाद महत्त्वाचा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा