विरोधी पक्षांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे चांगलेच वेध लागले आहेत. या निवडणुकीत भाजपला कसे घालवता येईल आणि मोदी राजवट कशी संपुष्टात आणता येईल यासाठी सगळेच विरोधी पक्ष कामाला लागले आहेत. भाजप विरोधी मतांची विभागणी होऊ नये यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असताना शरद पवार यांची आगामी काळातील भूमिका ही महत्वपूर्ण असणार यात शंका नाही. त्यादृष्टीने त्यांनी आतापासूनच पावले टाकायला सुरुवात केली आहे. ‘आता नाही, तर कधीच नाही’ या भूमिकेत ते पॅड बांधून मैदानात उतरले आहेत. रालोआ किंवा भाजप सरकारकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार आहे, त्यामुळे पत्रकारांनाच नाही तर सर्व विरोधी पक्षांनाही आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हा प्रश्न त्यामुळेच सतावतो आहे. त्यामुळे काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी इच्छुक असणारा प्रत्येक पक्ष हाच प्रश्न उपस्थित करताना दिसतो आहे. तोच प्रश्न जेव्हा पवारांपुढे येतो तेव्हा ते स्पष्ट म्हणतात की, भाजपला आधी सत्तेतून घालवू, त्यानंतर देशाचा पंतप्रधान कोण हे ठरविता येईल. सोमवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी हे स्पष्ट केले. पवारांनी सांगून टाकले की भाजपच्या विरोधात आता वातावरण तयार झाले असून, सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. अर्थात समविचार म्हणजे भाजपला हरवण्याचा विचार करत असलेले आणि २०१४ पासून विविध ठिकाणी झालेल्या निवडणुकीत सत्तेपासून दूर राहिलेले पक्ष म्हणावे लागतील. भाजपच्या शत प्रतिशतच्या घोडदौडीत अनेक प्रादेशिक पक्ष गेल्या चार वर्षात विविध विधानसभा निवडणुकीत सत्तेपासून दूर गेले. त्यांना जवळ करणे हे शरद पवारांचे मोठे ध्येय असणार आहे. कारण या आघाडीतील सर्वात मोठा पक्ष हा अर्थातच काँग्रेस असणार आहे. त्यामुळे संख्याबळाचे दृष्टीने आघडीत काँग्रेसचे वर्चस्व राहू शकते. साहजिकच काँग्रेसकडून पंतप्रधान पदावर दावा केला जाणार हे निश्चित. त्यासाठी संख्याबळासाठी काँग्रेसचा वापर तर झाला पाहिजे, पण पंतप्रधानपदापासून काँग्रेस कशी दूर राहील ही खरी ‘पवारनीती’ या निवडणुकीत पहायला मिळेल असे दिसते. म्हणजे शरद पवारांसाठी ही निवडणूक एकाचवेळी दोन आघाड्यांवर असणार आहे. ती म्हणजे पंतप्रधानपदापासून मोदींना रोखण्याबरोबरच राहुल गांधींनाही कसे दूर सारता येईल याचा पवार विचार करत असणार. ही खेळी म्हणजे एका धूर्त राजकारणाचे दर्शन आपल्याला येत्या काही महिन्यात पहायला मिळेल यात शंका नाही. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच यावेळी त्यांनी देशभरातील विरोधकांची एकजूट बांधण्यासाठी नेटाने प्रामाणिक प्रयत्न करण्याचे संकेत दिले आहेत. हे नेटाचे प्रयत्न म्हणजेच ‘पवारनीती’ असणार आहे. ज्या संख्याबळाची थट्टा करून राहुल गांधींनी २००९ मध्ये शरद पवारांना डिवचले होते, त्याचा वचपा काढायची संधी १० वर्षांनी शरद पवार घेतल्याशिवाय राहणार नाहीत, हे निश्चित. २००४ च्या लोकसभेत राष्टÑवादीचे फक्त ८ खासदार होते. २००९ च्या निवडणुकीतही त्यात काही फारसा बदल होण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्या तुलनेत काँग्रेस २०० च्या आसपास पोहोचण्याची शक्यता होती. झालेही तसेच. काँग्रेसला २०५ जागा मिळाल्या आणि युपीएतील मोठा पक्ष ठरला. पण या निवडणुकीत शरद पवारांना पंतप्रधानपदाची संधी मिळेल का असे एकाने राहुल गांधींना विचारले होते. तेव्हा ‘त्यांचे सर्वात जास्त खासदार निवडून आले, तर होतील ते पंतप्रधान’ असे खोचक उत्तर दिले होेते. शरद पवारांच्या राष्टÑवादीने तेवढे उमेदवारही उभे केले नव्हते, त्यामुळे पंतप्रधानपदाचे स्वप्न त्यांनी सोडलेच होते. दोन दिवसांपूर्वीही बारामतीत एका कार्यक्रमात काही अती उत्साही कार्यकर्त्यांने जाहीर सभेत पवारांनी पंतप्रधान व्हावे अशी अपेक्षा केली तेव्हा पवारांनी चक्क कपाळाला हात लावला होता. साहजिकच ही सल कुठेतरी सलतेय आणि काहीतरी मनात खदखदते आहे याची जाणिव आता सर्वांनाच होऊ लागली आहे. राष्टÑवादीची सोमवारची बैठक ही लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची होती. यात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करताना असे ठरले की काँग्रेसबरोबर येत्या काही दिवसांमध्येच जागा वाटपाबाबत बोलणी पूर्ण करून घ्यावीत. काँग्रेस नेते अशोक गेहलोत व अशोक चव्हाण यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल व जयंत पाटील यांनी बोलणी करावीत व जागा ठरल्या की तत्काळ तयारीला लागावे. भाजपकडे निवडणुकीचे साधने मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याला शह देण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज उभी करावी, असेही ठरले. यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की महाराष्टÑात राष्टÑवादीची खासदारांची संख्या सध्या काँग्रेसपेक्षा जास्त आहे. म्हणजे तब्बल दुप्पट खासदार राष्टÑवादीचे आहेत. काँग्रेसचे दोन, तर राष्टÑवादीचे चार. त्यामुळे जागा वाटपात काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा मिळवणे हा एक राष्टÑवादीचा डाव असेल. म्हणजे काँग्रेसच्या मतांची टक्केवारी राष्टÑवादीच्या पदरात अघाडी धर्मातून पाडून घ्यायची आणि महाराष्टÑातील काँग्रेसचे प्राबल्य कमी करणे हा दुसरा प्रमुख उद्देश. आपण जास्त उमेदवार लढवू शकत नाही, तरी दोन अंकी संख्याबळ गाठण्याचे त्यांचे उद्दीष्ट आहे. काँग्रेसचे संख्याबळ संपूर्ण देशभरात कसे कमी होईल आणि अन्य प्रादेशिक पक्षांच्या सोबत कसा सूर मिळविता येईल हे ‘पवारनीती’चे नियोजन सुरू आहे. भाजप विरोधी सर्व प्रादेशिक पक्षांत राष्टÑवादीचे संख्याबळे कसे अधिक राहील आणि सर्वांची मिळून संख्या काँग्रेसच्या खासदार संख्येपेक्षा कशी मोठी असेल, याचा पवार विचार करीत आहेत. अशा पक्षांची वेगळी आघाडी हेच आमचे संख्याबळ असे दाखवून काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा दावा खोडून काढत ही निवडणूक दुहेरी तत्वाने पवार यांना लढवावी लागणार आहे. त्यामुळे येत्या काही काळात शरद पवार जी पावले टाकतील ती भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आणि काँग्रेसला पंतप्रधानपदापासून रोखण्यासाठी टाकतील. निवडणुकीतील पवारांचा विरोधी पक्ष भाजप असेल, तर सत्तास्थापनेसाठी विरोधी पक्ष काँग्रेस असेल. सत्यवानाचे प्राण, पुत्र आणि सासू-सासºयाला दृष्टी मिळवण्यासाठी सावित्रीने जे चातुर्य दाखवले तेच पवारांना आता दाखवायचे आहे. म्हणूनच पवारांची ‘मन की बात’ आज तरी कोणी जाणू शकत नाही.
बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८
लोकसभा निवडणुकीची ‘पवारनीती’
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा