फ्रान्समधील नीस या शहरात नुकताच झालेला दहशतवादी हल्ला मन सुन्न करणारा आणि अंगावर शहारे आणणारा आहे. भारताला तसे दहशतवादी हल्ले नवीन नाहीत. बॉंम्फस्फोट, संसदेवरचा हल्ला, २६/११ अशा प्रकारांना आपण सातत्याने तोंड देत आहोत. पण मोठ्या देशांनाही आता त्याची झळ बसू लागली आहे हे विशेष. म्हणजे दहशतवादी देशांना पाठीशी घालणार्या अमेरिका, फ्रान्स आदी देशांना दहशतवाद नेमका काय असतो ते तरी आता समजेल. फ्रान्समध्ये गर्दीत ट्रक घालून करण्यात आलेल्या या हल्ल्यात तब्बल ८४ जण बळी पडले आहेत. पन्नासहून जास्त जण जखमी झाले आहेत. त्यापैकी १८ जणांची स्थिती गंभीर आहे हे पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
यावर फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांनी हा दहशतवादी हल्ला आहे हे नाकारण्यात काही अर्थ नाही असे म्हटले आहे. म्हणजे गर्दीत ट्रक घुसवून लोक मारण्याची ही नवीच घाणेरडी क्लृप्ती दहशतवाद्यांनी शोधून काढलेली दिसते. तसा फ्रान्सवर झालेला हा काही पहिला दहशतवादी हल्ला नाही. गेल्या वर्षीच नोव्हेंबरमध्ये पॅरिसवर झालेल्या तिहेरी हल्ल्यात १३० जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यात साडे तीनशेहून अधिक जखमी झाले होते. त्यापूर्वी २०१२ पासून या देशाने असे अनेक हल्ले झेलले आहेत. त्यातील अलीकडच्या काळातील काही हल्ले इस्लामी अतिरेक्यांनी केले आहेत वा त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. फ्रान्सवर असे बरेच हल्ले झाले असले तरी नाईसमध्ये जो हल्ला झाला तसा हल्ला कोठेही झाल्याचे उदाहरण नाही.
इसवी सन १८०० पासून १४ जुलै हा फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिन किंवा बेसिल डे म्हणून पाळला जातो. पॅरिससह संपूर्ण फ्रान्समध्ये लष्कराच्या कवायती आदी कार्यक्रम होतात. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी लोक सहकुटुंब जमले असताना हा ट्रक अचानक गर्दीत घुसला आणि लोकांना चिरडत सुमारे दोन किलोमीटर पुढे जात राहिला. अखेरीस एका माणसाने धैर्य दाखवून या ट्रकला अडविण्याचा प्रयत्न केला.
त्याचवेळी पोलिसांनी ट्रकवर गोळ्यांचा पाउस पाडला. त्यात हा दहशतवादी चालक ठार झाला. मात्र ट्रक ज्या मार्गाने पुढे गेला तेथे अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता आणि मांसाचा चिखल झाला होता. लोक भयकंपित होऊन पळत सुटले होते.
या हल्ल्याचे वेगळेपण अतिशय धोकादायक आहे. कारण पॅरिसवर किंवा इतरत्रही झालेल्या हल्ल्यांचे स्वरूप जमावावर गोळीबार किंवा रेल्वेत अथवा गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट किंवा फार तर अमेरिकेत ९-११ चा हल्ला झाला तसे विमान अपहरण करून झालेला हल्ला असे होते. याला फार तयारी लागते. तो उधळला जाण्याची किंवा आरोपी पकडले जाण्याचीही शक्यता असते.
येथे मात्र एक दहशतवादी ट्रकचा ताबा घेतो आणि गर्दीत घुसवतो हा तुलनेने सोपा आणि हानी करण्याच्या दृष्टीने मोठा व परिणामकारक प्रकार आहे. तो कोणालाही सहज करता येण्यासारखा असल्याने ती भीतीची टांगती तलवार आता जगभरच्या सुरक्षा यंत्रणांच्या डोक्यावर सतत राहील.
आपल्याकडे उत्सव, गर्दी हे नेहमीचे प्रकार आहेत. त्यामुळे आज फ्रान्स जात्यात असला तर आपण सुपात आहोत इतकाच फरक आहे. त्यामुळे या घडीला फ्रान्सच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचे सदस्य या नात्याने आपले कर्तव्य आहे. दहशतवादी रक्तपात घडवण्यासाठी नवनवे मार्ग अवलंबत असताना आपण किती सजग राहिले पाहिजे हे यातून दिसून येते.
इसिससारख्या उलटया काळजाच्या दहशतवादी संघटना कोठेही आणि कसाही धुमाकूळ घालू शकतात हे सिध्द झाले आहे. त्यांचा धोका रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एक व्हायला हवे ही भारताची कायमची भूमिका आहे. पण जोपर्यंत असे हल्ले भारतावर होत होते तोपर्यंत अमेरिका, फ्रान्स, इटली या देशांनी फारसे गांभिर्याने याकडे बघितले नाही. परदु:ख शीतलम असते तशी भूमिका या देशांनी घेतली होती. त्यामुळे ९/११ हा २००१ चा आणि फ्रान्सवरचे गेल्या चार वर्षातील हल्ले झाल्यापासून त्यांचे थोडे डोळे उघडले आहेत असे म्हणायला हरकत नाही. पण एकत्रित येवून दहशतवादाशी मुकाबला करणे गरजेचे आहे या भारताच्या मतावर सर्वांना ठाम रहावे लागेल. कारण दहशतवाद्यांचे जेवढे हल्ले भारताने सहन केले आहेत तेवढे क्वचितच कोणाला सहन करावे लागले असतील. मात्र दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी जगाने एक सुरात बोलले पाहिजे असे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत किंवा सुरक्षा परिषदेत कितीही घसा फोडून सांगितले तरी त्याला एकमुखी प्रतिसाद कधीच मिळत नाही. या हल्ल्याचा निषेध करणारी अमेरिका, पाकिस्तान हा दहशतवादाचा पुरस्कर्ता आहे हे ठाउक असूनही त्याला एफ-१६ विमाने देते. त्यातूनच फोफावलेल्या इस्लामी दहशतवादाचे इसीस हे हिडीस आणि जगाला वेठीस धरू पाहणारे भयंकर रूप पैदा झाले आहे. इराक आणि सीरियाच्याही बाबतीत अमेरिकेने दुटप्पीपणाच केला आहे. अफगाण काय किंवा इराक काय तेथील सध्याच्या अंदाधुंदीस अमेरिकाच मोठया प्रमाणात जबाबदार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा