- प्रसारमाध्यमांपासून ते विविध कॉमेडी शोमधील रामदास आठवले हे चर्चेतले आणि नकला करण्यास आणि हमखास हशा मिळवणारे व्यक्तिमत्व असले तरी मंत्रीपदाची धुरा मिळाल्यावर ते खूप चांगले काम करतील आणि नवे काही तरी करून दाखवतील यात शंकाच नाही. रामदास आठवले म्हणजे एक फार मोठा अवलिया माणूस आहे. दिवस-रात्र, उन्हाळा-पावसाळा काहीही असो सदैव ते आपल्याच तंद्रीत असतात. एका विचारात असतात. तो विचार वास्तवात आणण्यासाठी त्यांना मिळालेली ही फार मोठी संधी आहे. त्या संधीचे ते सोने करतील यात शंकाच नाही. बुहजनांचे किंवा मागासवर्गीयांचे नेते म्हणून त्यांना ओळख असली तरी ते खर्या अर्थाने सर्वसमावेशक असे नेते आहेत. त्यांना दलितपणात गुंतवून ठेवणे हा त्यांच्यावरचा अन्यायच ठरेल. त्यामुळे आठवले यांना समजून घेतले पाहिजे आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
- मागच्या आठवड्यात राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक अशोका हॉलमधील ते दृष्य. राष्ट्रपती शेजारी उभे आहेत. समोर दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरूण जेटली, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासारखी दिग्गज बसलेले आहेत. राष्ट्रपती महोदयांनी राज्यमंत्रीपदाची शपथ द्यायला सुरवात केली आणि रामदास आठवले यांच्या हातात कागद दिला. राष्ट्रपतींनी मी म्हटल्यानंतर आठवले सुरू झाले. मात्र, ‘मी’ नंतर स्वतःचे नाव घेण्याचे ते विसरले. राष्ट्रपती महोदयांनी स्वतःचे नाव घेण्यास सांगितल्यानंतर त्यांनी नाव घेतले. याची अनेकांनी टिंगल केली, प्रसारमाध्यमांनी त्याची खिल्ली उडवली. पण ही एक स्वाभावीक गोष्ट आहे. तळागाळातून येऊन इतक्या उंचीपर्यंत आल्यावर या औपचारीकतेमध्ये सामान्य माणूस गुदमरुन जातो. आठवले यांचे तसेच झाले. पण त्यात नावे ठेवण्याचे काहीच कारण नाही. आर. आर. पाटीलही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना थरथरत होते. त्याचे त्यावेळी कौतुक झाले होते. पण आठवलेंबाबत तसे झाले नाही. त्यावर थट्टा करण्याचा प्रकार वाहिन्यांकडून केला गेला ही फार लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल.
- म्हणजे, मेंदुला वाळवी लागलेल्या या चॅनेलवाल्यांनी लगेच रामदास आठवले यांची ‘पात्रता’ काढायला सुरुवात केली. शपथ घेताना ते पाचवेळा चुकले. सोशल मिडीयावरसुध्दा त्यांची खिल्ली उडविण्यात आली. परंतु, रामदास आठवले साहेबांनी याचं किंचितही वाईट वाटून घेतलं नाही. हो फार मोठा गुण आहे रामदास आठवले यांचा. कसला राग लोभ मनात न ठेवता ते तितक्याच दिलदारपणे त्याच वाहिन्यांवर मुलाखती देण्यास गेले हे विशेष. हे फार कमी लोकांना जमते. दुर्लक्ष करून म्हणजे अनुल्लेखाने कसे मारायचे हे त्यांनी नेमके मोदी सरकारमध्ये आल्यावर अंगी बाळगले हे फार मोठे काम आहे.
- वास्तविक शपथ घेताना आठवले स्वतःचं नाव घ्यायला विसरले हीच माहिती चुकीची आहे. रामदास आठवलेंनी स्वतःचे नाव जाणीवपूर्वक घेण्याचे टाळले. तसे त्यांनी नंतर सांगूनही टाकले. नावात काय ठेवले आहे. तुमची वागणूक, तुमचे कर्तव्य महत्वाचे असं त्यांना वाटतं. म्हणून त्यांनी नाव गाळलं. काही लोकांना त्यांच्या सान्निध्यात राहण्याची संधी लाभली आहे. त्यांच्यामते, राष्ट्रपती महोदयांनी नाव घेण्यास सांगितल्यानंतर आठवले यांनी नाव घेतले हेच फार महत्वाचे होते. त्यानंतर त्यांनी कुठलाही प्रश्न न करता स्वतःचे नाव घेवून शपथ घेतली. हेच त्यांचे मोठेपण आहे. मोठी माणसं मर्यादा सोडून कधीही वागत नसतात. आपण मर्यादा पाळू तर आपले अनुयायी सुध्दा त्याचे पालन करतील हे त्यांना ठाउक असतं. अशा गोष्टी या नैसर्गिक असतात. त्याला किती महत्व द्यायचे याचे भान उपस्थितांनी ठेवायला पाहिजे होते. माध्यमांना असायला पाहिजे होते. पण बातमीतील बातमी शोधायची आणि महत्वापेक्षा रंजकतेला अधिक प्रसिद्धी देण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे या गोष्टींना महत्व दिले गेले. उद्या जर एखाद्याला शिंक आली, खोकला आला आणखी काय झालं तर त्याची कशी काय बातमी करायची? ती तर नैसर्गिक बाब आहे. तसेच कामाच्या, विचारांच्या बाबत आहे. विचारांच्या ओघात लागलेली तंद्री, अनेक आव्हाने समोर असताना आपण हे केलं आहे असे अनेकदा वाटत जाते. त्यात नाव घेण्याचे राहून गेले. पण याच लोकांना आठवले आपले काम चांगले करून उत्तर देतील यात शंकाच नाही.
- पद आणि गोपनियतेची शपथ घेणे म्हणजे निव्वळ भंपकपणा आहे असं कोणाला वाटलं तर त्यात नवल नाही. न्यायालयात गीतेवर किंवा धर्मग्रंथावर हात ठेवून खरं बोलण्याची शपथ दिली जाते. पण कुणीतरी खरं बोलतं काय? खोटंच बोलतात! मंत्री सुध्दा शपथ घेतात. मात्र, दहा वर्षांनंतर त्या मंत्र्याचे प्रगतीपुस्तक पाहिले तर शपथेशी ते प्रामाणिक आहेत काय असा प्रश्न उत्पन्न होतो. विशेष म्हणजे आपली मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे हे माहित असूनही राज्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारण्यासाठी रामदास आठवले साहेब चाळीस मिनिटे उशीरा गेले. पण त्यामागेही फार मोठा अर्थ होता तो सरकाने वेळीच समजून घेतला पाहिजे. भविष्यात जेव्हा लोकसभा आणि राज्यसभेत रामदास आठवले मंत्री म्हणून बोलायला उभे होतील तेव्हा संपूर्ण देशाला त्यांचे महत्व कळेल. काहीतरी वेगळं करणारा हा माणूस आहे हे लोकांना समजेल.
शुक्रवार, १५ जुलै, २०१६
आठवलेंचे महत्व लवकरच समजेल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा