शुक्रवार, १५ जुलै, २०१६

अर्थ आषाढीचा


  •    आज आषाढी एकादशी. महाराष्ट्राचे डोळे आज पंढरपूरकडे लागलेले आहेत. जे आठ-दहा लाख लोक आज पंढरपुरात आहेत ते शरीराने आणि मनाने तिथे आहेत आणि जे शरीराने तिथे नाहीत तेही मनाने आज पंढरपुरात आहेत. आजचा हा दिवस भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणार्‍यांचा सगळ्यात मोठा सण आहे. पण सण असूनही तो चित्त शुद्धीशी जोडलेला आहे. आषाढी उपवासाचा सगळयात मोठा अर्थ शरीरशुद्धी आणि चित्तशुद्धीतून विठुरायाच्या पावलाशी लीन होणे आणि नामदेवाच्या भाषेत ‘विठ्ठल पाहणे’, त्या नामस्मरणाचा हा दिवस आहे. जगातल्या सगळया धर्मात उपवास आहेत. ते चित्तशुद्धीकरिता आहेत, शरीरशुद्धी करता आहेत. आजचा उपवास हा चिंतनाकरिताही आहे.
  •    चिंतन, मनन आणि भजन यातून आत्मशुद्धी होत असते. हा उपवास विठुरायाशी जोडलेला आहे. या उपवासाची जी रचना आहे ती बघितली तर आषाढी, कार्तिकी आणि महाशिवरात्र हे तिन्ही उपवास बरोबर १२० दिवसांच्या फरकाने आलेले आहेत. आषाढीच्या आधी शेतीची कामे आटोपलेली आहेत आणि मग श्रमशक्तीला विश्रांतीची जोड दिलेली आहे. शिवाय बदलत्या ऋतुचक्रात पचनशक्तीला विश्रांती हा आणखी एक महत्त्वाचा शास्त्रीय उद्देश आहे. दुसरा उपवास कार्तिकीचा तो शिशिर ऋतूच्या म्हणजे हिवाळयाच्या टप्प्यावर आणून ठेवलेला आहे. तिसरा उपवास महाशिवरात्रीचा. तो उन्हाळयाच्या टप्प्यावर आलेला आहे. या प्रत्येक उपवासाचे अंतर १२० दिवसांचे आहे आणि ते शास्त्रीय आहे. त्याला धर्माचा संदर्भ घातला त्याचे पालन व्हावे म्हणून; पण तिन्ही उपवासांचा संदर्भ शास्त्रीय आहे. निसर्गाच्या बदलत्या ऋतुचक्राशी जोडलेला आहे.
  • आजच्या एकादशीचा मुख्य उद्देश नामस्मरणाशी जोडलेला आहे. विठूचा गजर करण्याशी जोडलेला आहे. आत्मज्ञान होण्याशी जोडलेला आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणारी ही जी संत मंडळी आहेत त्यांना आदराने, सन्मानाने आणि भावनेने संत म्हटले तरी मुळात ते सर्व तत्त्ववेत्ते आहेत. शिकलेले नसले तरी हरीनामाच्या सामर्थ्यांने त्यांना आलेले जीवनातील अनुभव जीवनाचे तत्त्वज्ञानच बनले आणि त्यांच्या वाणीतून आत्मज्ञान प्रगट झाले. ज्ञानोबा, तुकोबा यांची गोष्ट फारच वेगळी आहे. संत परपंरेचा पाया ज्ञानोबांनी रचला आणि तुकोबा कळस झाला. मधल्या चारशे वर्षात नामदेव आले, त्यांनी ‘पहावा विठ्ठल’ सांगून द्वैत-अद्वैताचा भ्रम दूर करून टाकला. म्हणून या परंपरेत नामदेव खूप मोठे झाले. विठूच्या गजरात नामाचाही गजर आहे. बाकी अठरापगड जातीतले जे संत निर्माण झाले ते कोणत्या विद्यापीठात शिकले होते? पण त्यांच्या तत्त्वज्ञानाला आत्मज्ञानाचे केवढे मोठे सामर्थ्य होते. गोरा कुंभार होता. मडकी करत होता. कच्चे मडके भाजत होता, पक्के करत होता आणि अंगठया जवळच्या दोन बोटांनी त्या भाजक्या मडक्यावर ठोकून ‘मडके कच्चे की पक्के’ असे विचारत होता. हे विचारता विचारता गोरोबाला आत्मज्ञान आहे. आपल्याच डोक्यावर दोन बोटे आपटून एक प्रश्न विचारला, ‘अरे, मी इतकी मडकी भाजतो आहे. कच्चे की पक्के विचारतो आहे. पण माझे हे मडके कच्चे की पक्के?’ तिथे गोरोबाला आत्मज्ञान झाले.
  •    सावता माळी मळयातल्या भाजीमध्ये आलेले तण उपटणारे. तो आत्मज्ञानाची भाषा बोलू लागला. ‘कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी.’ आणि मग तो म्हणू लागतो, ‘जमिनीतले तण मी उपटले. पण माझ्या मनातल्या अविचारांचे तण मी उपटले काय? ते तसेच आहेत.’ 
  •    संत सेना महाराज त्यांच्या व्यवसायाप्रमाणे लोकांची डोकी साफ करीत. ती करता करता तो तत्त्वज्ञान सांगतो आहे. ‘माझ्या डोक्यातला मळ मी साफ केला आहे का?’ गोरा, सावता, सेना, रोहिदास महाराज या विविध जातीजमातीतल्या संतांना आत्मज्ञान झालेले आहे. 
  •    तुकोबा तर त्याच्या पुढे गेले? आणि त्यांनी विठ्ठल मनामनात बसलेले असल्याचा दृष्टांत दिला. गाडगेबाबा त्यांच्या पुढचे. गाडगेबाबांनी सांगितले की अरे, ‘तू म्हणजेच देव.’ गाडगेबाबा कीर्तनातून सांगायचे, ‘देवळात गेलो, देवाच्या गाभार्‍यात काळोख. देव दिसेना. मग बापूरावाला सांगून दिवा आणला. देव दिसला. कोणामुळे दिसला. दिव्यामुळे दिसला. मग देव मोठा की दिवा मोठा?’ गाडगेबाबांचे हे तत्त्वज्ञान देव एक आहे. त्याची रूपे अनेक असतील. धर्म अनेक आहेत पण त्यांची शिकवण एक आहे. 
  • जगाची सूत्रे चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे, असे एकदा मान्य केले तर मग त्याला नाव काहीही द्या. त्या अदृश्य शक्तीचा धाक हाच तुम्हाला सरळ मार्गाने चालायला प्रेरित करणार आहे. शेवटी अहंकाराने भरलेले आपण सर्व काही इथे टाकून जाणार आहोत. जगाचा सगळयात मोठा अनर्थ तेव्हा झाला असता जर माणसाला मरणाची तारीख समजली असती. आपली मालमत्ता वर घेऊन जायला परवानगी असती. या दोन गोष्टींचे बंधन नसते तर माणसाने कुणालाच जुमानले नसते. ते जुमानण्यासाठी हरीनाम आणि त्याकरिता उपवास. आपले दैनंदिन जीवन शुद्ध ठेवायचे, असे संत शिकवतात. ‘जेवढे जीवन हातात आहे, ते सत्प्रवृत्तीने जगा,’ असे आषाढी सांगते. संयमाने जगा. आहारामध्ये, विहारामध्ये, बोलण्यामध्ये खाण्यामध्ये संयम आणि सभ्यता ठेवा. मग एका आत्मिक बळाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या आषाढीचा तोच खरा अर्थ आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: